‘भारतमाता की जय’वरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत.
नवी दिल्ली- ‘भारतमाता की जय’वरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि योगगुरू रामदेव बाबा यांनी बेजबाबदार वक्तव्य केल्याचे पडसाद देशभरात उमटत आहेत.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाने अशी प्रक्षोभक वक्तव्ये करणा-यांविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. भाजपाला विविध स्तरावर आलेले अपयश झाकण्यासाठीच अशी वक्तव्ये करून मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष उडवण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही भाकपने केला आहे.
या वादात उडी घेऊन देशातील वातावरण आणखी गढूळ करण्यास हातभार लावणा-या दारूल उलूम, देवबंद या मुस्लिमांच्या सर्वोच्च संघटनेवरही इस्लाम धर्मियांतील अभ्यासक आणि ‘ऑल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाचे’ सदस्य खालिद रशीद फरंगीमहल यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
अशा संवेदशील प्रश्नावर ‘देवबंद’ने फतवा काढून देशातील धार्मिक व सामाजिक सलोखा बिघडवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. तर दुसरीकडे केंद्रीयमंत्री नजमा हेपतुल्ला यांनी अशा वादाला खतपाणी घालण्यापेक्षा विकासावर बोला, असा घरचा आहेर भाजपाला दिला आहे.
कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस एस. सुधाकर रेड्डी यांनी,‘ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रामदेव बाबा यांची बेताल वक्तव्ये व देवबंदने भारतमाता की जयवरून काढलेला फतवा म्हणजे दोन कट्टरपंथीय गटांची मॅचफिक्सिंग असून देशातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम जोरात सुरू असल्याचे म्हटले आहे.
भाजपा सरकारने अशी वक्तव्य करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे धारिष्टय़ दाखवावे, असे आव्हानही रेड्डी यांनी दिले आहे. रामदेव बाबा यांनी नुकतेच केलेले वक्तव्य बेजबाबदार नसून देशातील धार्मिक आणि सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे असल्याची टीका रेड्डी यांनी केली आहे.
जे‘भारतमाता की जय,’ बोलणार नाहीत त्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री फडणवीस आणि ‘देशात कायद्याचे राज्य आहे अन्यथा भारतमातेचा अवमान करणा-या एका व्यक्तीचे नाही, तर लाखो लोकांचे शिर उडवले असते’ अशी गरळ ओकणा-या रामदेव बाबांविरोधात हरियाणाचे माजी मंत्री सुभाष बात्रा यांनी रोहतक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
संवेदनशील विषयावर ‘देवबंद’ने फतवा काढू नये
लखनऊ- ‘भारतमाता की जय’सारख्या संवेदनशील विषयावर दारूल उलूम, देवबंदने फतवा काढू नये, असे आवाहन प्रख्यात मुस्लीम अभ्यासक खालिद रशीद फरंगीमल यांनी केले आहे. अशा फतव्यांमुळे देशातील सामाजिक सलोखा बिघडत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणूक डोळय़ांपुढे ठेवून असे विषय जाणीवपूर्वक उकरून काढले जात असल्याचे फरंगीमल यांनी म्हटले आहे. या विषयावर फतवा काढल्याने दोन गटांत तेढ निर्माण करणा-यांचा हेतू सफल होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
भारतीय संविधानाचा सन्मान राखण्याला आपले प्रथम प्राधान्य हवे. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देऊन देशप्रेमाचा पुरावा देता येणार नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.