२०१५च्या विश्वचषकातील विजेत्या संघाला चषक प्रदान करण्याचा मान न दिल्याबद्दल नाराज झालेले आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमल यांनी बुधवारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ढाका – आयसीसीच्या कारभाराबद्दल जाहीर नाराजी दर्शवत आयसीसीचे अध्यक्ष मुस्तफा कमाल यांनी अखेर बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चषक प्रदान करण्याचा मान न मिळाल्यापासून कमाल नाराज होते.
‘‘मी अध्यक्षपदाचा राजीनामा आयसीसीकडे पाठवला आहे. मला माझ्या अधिकारांप्रमाणे काम करता येत नाही. अधिकार मिळणार नसतील तर मी काम करण्यात अर्थ नाही? सध्या वरिष्ठ पदांवर असलेल्या लोकांपासून (एन. श्रीनिवासन) क्रिकेट दूर राहणे गरजेचे आहे.
कारण खेळात मोठय़ा प्रमाणात राजकारण आणत आहेत. आयसीसीमधील संबंधितांनी खेळाला राजकारणापासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तरच लोकांना समजेल की मी राजीनामा का दिला ते? विश्वचषकाच्या अंतिम फेरीत चषक प्रदान करण्याचा माझा मान त्यांनी हिरावून घेतला. त्या रात्री मला झोपही लागली नाही,’’ असे कमाल यांनी म्हटले.
याआधी उपांत्यपूर्व फेरीत (वि. भारत) बांगलादेशच्याविरुद्ध काही निर्णय गेल्यानंतर कमाल यांनी मैदानावरील पंचांवर टीका केली होती. भारताला जिंकून देण्यासाठी पंचांना ‘फिक्स’ केले होते काय,असा आरोप त्यावेळी त्यांनी केला होता. तेव्हापासून श्रीनिवासन हे कमाल यांच्यावर नाराज असल्याचे कळते. दरम्यान, आयसीसीने कमाल यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
भविष्यात आयसीसी ‘इंडियन क्रिकेट कौन्सिल’ होईल
आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल नव्हे तर इंडियन क्रिकेट कौन्सिल म्हणून भविष्यात ओळखली जाईल, असे सांगतानाच कमाल यांनी आयसीसी चेअरमन एन. श्रीनिवासन यांना लक्ष्य केले आहे. श्रीनिवासन यांच्यावर अगदी वाईट शब्दांत त्यांनी टीका केली आहे. ‘‘श्रीनिवासन यांच्यामुळे आयसीसीमध्ये एकाधिकारशाही येईल. त्याची वेळीच दखल अन्य पदाधिकाऱ्यांनी घ्यावी,’’ असे मुस्तफा कमाल म्हणाले.