महाराष्ट्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टिका केली आहे.
मुंबई- महाराष्ट्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टिका केली आहे. ‘भाजपाचे सरकार हे शो बाजीचे सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रत्येक दोन महिन्याला एक इव्हेंट लागतो,’ असा जोरदार हल्ला त्यांनी यावेळी केला.
राज ठाकरे यांची बुधवारी मुंबईमध्ये आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी भाजपावर चांगलाच हल्ला चढवला. तर शिवसेनेवरही टीकेचे आसूड ओढले.
‘मेक इन इंडिया’मध्ये करार झाल्याचे सांगतात. पण करार झाले म्हणून गुंतवणूक आली असे होत नाही, मेक इन चायना कधी ऐकले आहे का ? मग ही शो बाजी कशासाठी?,’ असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
‘गुजरातचे मुख्यमंत्री असतांना मोदींनी हेच केले होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजूनही देशाचे पंतप्रधान वाटत नाहीत,’ असे यावेळी राज म्हणाले. ‘गिरगाव चौपाटीवर कार्यक्रम घेऊ नका, असे उच्च न्यायालय आणि अग्निशमन दलाने सांगितले असतांनाही तिथेच कार्यक्रम करण्याचा गरज का ? असा प्रश्न राज यांनी यावेळी विचारला.
शिवसेनेवर जोरदार टीका
‘सत्तेत असूनही सरकारच्या निर्णयाला विरोध करणारी शिवसेना विरोधात आहे की सत्तेत आहे, हेच कळत नाही. सत्तेत राहून सत्तेचे सर्व फायदे घ्यायचे आणि जनतेला दाखवण्यासाठी सरकारचा विरोधही करायचा. शिवसेनेची भूमिका नेहमी तळ्यात मळ्यातली असते,’ असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.
जेएनयू प्रकरण
‘कोण देशप्रेमी आणि कोण देशविरोधी हे भाजपाने ठरवू नये. देशभक्तीचे सर्टिफिकेट भाजपाने वाटू नये. देशविरोधी घोषणा करणा-यांना फोडून काढा.’ असे राज ठाकरे जेएनयू प्रकरणावर बोलताना म्हणाले.