नेत्रदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करत राज्यात नेत्रदानाचे प्रमाण वाढवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
मुंबई- नेत्रदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करत राज्यात नेत्रदानाचे प्रमाण वाढवण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. परिणामी राज्यात नेत्रदान करणा-यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. एवढेच नव्हे तर आता राज्यात ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत चष्मे देण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे.
नेत्रदान मोहीम अधिक तीव्र करण्याकरता राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम समितीने पुढाकार घेतला आहे. आजही समाजात नेत्रदानाबाबत अंधश्रद्धा पाळली जाते. या अंधश्रद्धेनुसार मृत्यूनंतर नेत्रदान केल्यास आत्म्यास शांती लाभत नाही, असा गैरसमज पसरवला जातो. त्यामुळे मृत्यूपश्चात नेत्रदान करण्यास लोक धजावत नाहीत.
नेत्रदानाबाबतचे गैरसमज दूर केल्यामुळे राज्यात नेत्रदानाचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून सिद्ध होते. २०१२-१३मध्ये राज्यात ७,५०३ नेत्रदान झाले होते. तर २०१३-१४मध्ये ७,६५३ नेत्रदान झाले आहे. विशेष म्हणजे यात २,५३२ नेत्रदान हे अवघ्या मुंबईतून झाले आहे. राज्यात रस्ते अपघातात मृत्यू होणा-यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. कित्येकदा या अपघातातील मृतदेहाबाबत तीन महिने वाट पाहून त्यानंतर अंत्यविधी केला जातो. अशा बेवारस मृतांचे नेत्र मिळाल्यास त्याचा फायदा अंध व्यक्तींना होऊ शकतो.
विशेष म्हणजे आरोग्य विभागाच्यावतीने नॅशनल आय रजिस्ट्रीची स्थापना करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे मूत्रपिंड, यकृत प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्यांची नोंद ठेवली जाते. त्याचप्रमाणे आता डोळ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्यांकरता ‘नॅशनल आय रजिस्ट्री’ सुरू करण्यात आली आहे. राज्याचे प्रमुख कार्यालय मुंबई महानगरपालिकेच्या कामाठीपुरा येथील विशेष नेत्र रुग्णालयात असणार आहे. या रजिस्ट्रीनुसार किती जणांना नेत्रप्रत्यारोपण करण्यात आले इत्यादींची माहिती मिळणे शक्य होणार आहे.
४५ वर्षावरील नागरिकांना मोफत चष्मे
११व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेर राज्यात अंधत्वाचे प्रमाण ०.८ टक्के इतके आहे. २०२०पर्यंत हे प्रमाण ०.३ टक्के इतके आणण्यावर भर दिला आहे. यंदाच्या वर्षापासून ४५ वर्षावरील नागरिकांचे डोळे मोफत तपासून त्यांना चष्मे देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे ११व्या पंचवार्षिक योजनेत मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर अधिक भर देण्यात आला आहे. लहान मुलांमध्ये व वृद्धांमध्ये इतर नेत्र आजारांचीसुद्धा काळजी घेण्यात आली आहे. त्यांना अंधत्व येऊ नये यावर भर असणार आहे.