मोकाट गुरांमुळे रत्नागिरीत शाळकरी मुलीचा नाहक बळी गेला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी वेळीच मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचे नगर परिषदेने दर्शवले आहे.
रत्नागिरी – मोकाट गुरांमुळे रत्नागिरीत शाळकरी मुलीचा नाहक बळी गेला आहे. असे प्रकार यापुढे घडू नयेत, यासाठी वेळीच मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता असल्याचे नगर परिषदेने दर्शवले आहे. तसे न झाल्यास २ नोव्हेंबरपासून शहरात उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा, स्वाभिमान रिक्षा चालक-मालक संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.
यासंदर्भात संघटनेच्यावतीने जिल्हाधिका-यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. या वेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक वाडेकर, मुख्य सल्लागार बाबा ढोले, उपाध्यक्ष शब्बीर भाटकर, तालुकाध्यक्ष बंडय़ा शिवलकर, शहर अध्यक्ष रशीद हकीम आदी उपस्थित होते. रत्नागिरी शहरात मोकाट गुरांचा संचार दिवस-रात्र सुरू आहे. संबंधित यंत्रणांना वारंवार उपाययोजना करण्याचे सांगूनही काहीच उपाययोजना केल्या जात नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केल्याने, दुर्दैवाने एका शाळकरी मुलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. या मुलीच्या मृत्यूस जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. यापूर्वीही मोकाट गुरांच्या वावरामुळे अपघाती मृत्यू झाले आहेत.
त्यामुळे शहरातील मोकाट गुरांचा बंदोबस्त तातडीने होण्याची आवश्यकता असल्याची मागणी, संघटनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिका-यांकडे केली आहे.शहरात जागोजागी मोकाट असणा-या या गुरांचा बंदोबस्त करून पथमार्ग मोकळे करण्यात यावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे. यावर वेळीच कारवाई न केल्यास, २ नोव्हेंबरपासून उग्र आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा, संघटनेकडून देण्यात आला आहे.