नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळयाला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना निमंत्रित करण्यात आल्याने अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता नाराज झाल्याची चर्चा आहे
नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधी सोहळयाला श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांना निमंत्रित करण्यात आल्याने अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता नाराज झाल्याची चर्चा आहे. जयललिता या शपथविधी समारंभाकडे पाठ फिरवू शकतात अशी सूत्रांची माहिती आहे. जयललिता आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये चांगली मैत्री आहे.
२६ मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात होणा-या शपथविधी सोहळयासाठी सार्क परिषदेच्या सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षेही आहेत.
रालोआच घटक पक्ष असणा-या एमडीएमकेलाही राजपक्षे यांना निमंत्रित करण्याचा निर्णय पटलेला नाही. त्यांनी या निर्णयाला विरोध केला असून, राजपक्षे यांच्या उपस्थितीने तामिळी जनतेच्या भावना दुखावतील असे एमडीएमकेने म्हटले आहे.
काँग्रेसने श्रीलंकन सरकारला अनुकूल भूमिका घेतल्याने जनतेने त्यांना नाकारले असा दावा एमडीएमकेचे संस्थापक वायको यांनी केला. श्रीलंकेतील तामिळी नागरीकांच्या अधिकाराच्या मुद्यावरुन द्रमुक आणि अण्णाद्रमुक या तामिळनाडूतील दोन्ही प्रमुख पक्षांनी याआधीच्या संपुआ सरकारवर वारंवार दबाव आणला होता. या मुद्यावरुन संसदही अनेकदा बंद पाडली होती.