तालुक्यातील काळसुरी गावामध्ये थैमान घातलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात शुक्रवारी वन विभागाला यश आले.
म्हसळा – तालुक्यातील काळसुरी गावामध्ये थैमान घातलेल्या बिबटयाला जेरबंद करण्यात शुक्रवारी वन विभागाला यश आले. यामुळे परिसरातील शेतक-यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. गावातील पाण्याच्या टाकीजवळ जंगली जनावरांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळयात हा बिबटया अडकला.
काळसुरी गावापासून दीड-दोन किमी अंतरावर असलेल्या वारळ गावातील चंद्रकांत जानू म्हात्रे यांच्या मालकीच्या वासरावर गुरुवारी या बिबटय़ाने हल्ला करून फडशा पाडला होता. तर गायरोणे व कांदळवा येथे राहणा-या सुभाष पवार व हरेश शिंदे या शेतक-यांच्या गाय व बैलावरही अनुक्रमे १४ व २० सप्टेंबर रोजी या बिबटय़ाने हल्ला केला होता.
म्हसळा तालुक्यात एकही बिबटा नसल्याची नोंद तालुका वन विभागाने केली होती. मात्र मागील सहा वर्षात ४८ गुरेढोरे मारल्याची नोंद वन विभागाकडे असतानाच, या बिबटय़ाचा संचार आढळल्याने शेतक-यांत घबराट पसरली होती. दरम्यान, वारळ रोड शेजारील कातळावर बिबटय़ाला बछडय़ांसह पाहिल्याचा दावा एका ग्रामस्थाने केला आहे.