लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांनी जिथे ‘चायपे चर्चा’ घेतली त्या यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातील एका शेतक-याने आत्महत्त्या केल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.
नागपूर- लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नरेंद्र मोदी यांनी जिथे ‘चायपे चर्चा’ घेतली त्या यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी गावातील एका शेतक-याने आत्महत्त्या केल्याचे उजेडात आल्याने खळबळ उडाली आहे.
मोदी यांनी येथील शेतक-यांना गुलाबी स्वप्न दाखवले होते. पण काहीही आधार न मिळाल्याने शेतकरी कोसळू लागले आहेत.
शेतमालावर होणा-या गुंतवणुकीवर ५० टक्के नफा दिला जाईल ही मोदींची घोषणाही विदर्भातीलच आहे. पण तसे काहीही झालेले नाही, त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त होत चालला असून, यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतक-यांच्या आत्महत्या आहेत. पाच पन्नास हजार रुपयांच्या कर्जासाठी शेतकरी या जगाचा निरोप घेत आहेत.
उमरखेड तालुक्यातील विडूळ गावच्या सुभाष बिचेवार या शेतक-याने शेतात विषारी औषध घेऊन आत्महत्त्या केली. त्याच्यावर अवघे ७५ हजार रुपयांचे कर्ज होते. वर्धा तालुक्यातील दादा दाते यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून जीवन संपवले, त्यांच्याकडे १३ एकर शेती होती.
सततच्या नापिकीने ते त्रस्त होते. शनिवारी सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही शेतक-यांसाठी काही आशेचा किरण नसल्याची टीका शेतकरी वर्गातून होत आहे. राज्यात ६० टक्के खेडय़ांमध्ये दुष्काळ आहे. या खेडय़ांमधील खरीप पीक बुडाले आहे.
९० लाख शेतक-यांची ही समस्या असली तरी बजेटमध्ये त्यांच्यासाठी छदामही नसल्यामुळे शेतकरी निराश झाला असल्याची टीका शेतकरी नेते किशोर तिवारी व विजय जावंधिया यांनी केली आहे.