पालघर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांतून निघणारा घातक रासायनिक घनकचरा बोईसर-चिल्हार मुख्य रस्त्यावरील वाघोबा खिंड, चरी व चिल्हार हायवेवर तीन ठिकाणी टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
औद्योगिक वसाहतील रासायनिक कंपन्यांतून निघणारा घातक घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी तळोजा येथील सामाईक घनकचरा प्रक्रिया केंद्रात पाठविणे बंधनकारक असते. परंतु, घनकचरा तळोजा येथे प्रक्रिया केंद्रात नेण्यासाठी लागणारे पैसे वाचवण्यासाठी कंपनी मालक रासायनिक घनकच-याची विल्हेवाट लावण्यासाठी केमिकल माफीयांकडे कामगिरी सोपवतात. त्यानुसार केमिकल माफीया पैशाच्या हव्यासापोटी नागरिकांच्या जिवाशी खेळत असून रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या वेळी घातक रासायनिक घनकच-याची विल्हेवाट लावत आहेत.
तारापूर औद्योगिक वसाहतीतून निघणा-या मुख्य रस्त्यावर बेटेगाव येथे असलेल्या चौकीवरून वाहने तपासणी न करताच चिरीमिरी घेऊन सोडत असल्याने बेकायदेशीरपणे केमिकल वाहतूक करणा-यांचे फावत आहे. विशेष म्हणजे या पोलिस चौक्यांवर असलेल्या सीसीटीव्हीत अशी वाहने दिसून येत नसल्यामुळे पोलिसांच्याच कामगिरीवर संशय निर्माण होत असून या अवघ्या ३० कि. मी. अंतरावर असलेल्या अणुशक्ती केंद्राबाबत देखील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे.
रात्रीच्या वेळी लहान मोठय़ा ट्रकमधून कंपनीतून निघणारा घातक घनकचरा वाहतूक करून बोईसर पूर्वेकडील भागात विल्हेवाट लावण्यासाठी नेण्यात येतो. त्यातच बोईसर-चिल्हार मुख्य रस्त्यावर रात्रभर वाहनांची वर्दळ असतानादेखील माफियांनी रस्त्यावर घनकचरा टाकल्याने माफियांना प्रदूषण महामंडळ व पोलिसांचे अभय असल्याचे दिसत आहे.
अज्ञात इसमांकडून बोईसर चिल्हार रस्त्यावर कंपनीतील टाकण्यात आलेले हजारडस्टचे नमुने तळोजा येथील सामाईक प्रक्रिया केंद्रात तपासणीकामी पाठविण्यात आले आहेत. तसेच तळोजा येथून हजारडस्ट वाहण्यासाठी असलेले वाहन बोलावून सदरचा घातक कचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी उचलण्यात आला आहे.
– अर्जुन जाधव
उप- प्रादेशिक अधिकारी तारापूर (२)