मोरोशी-तळेवाडीत एका टँकरने गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला असताना मोरोशी गावातील आणखी तीन वाडयांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
राजापूर- मोरोशी-तळेवाडीत एका टँकरने गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला असताना मोरोशी गावातील आणखी तीन वाडयांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे तालुक्यातील आता एकूण ९ गावांतील २३ वाडयांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आहे.
वाढलेल्या तापमानामुळे तालुक्यात पाणीटंचाईची भीषणता आतापासूनच स्पष्ट झाली आहे. ग्रामीण भागातून मोठया प्रमाणावर होणा-या टँकरच्या मागणीमुळे प्रशासनाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. पुढील दीड-दोन महिन्यांत टँकरच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागणी वाढल्यास टँकरने कुठे आणि कशा प्रकारे पाणीपुरवठा करायचा, असा प्रश्न प्रशासनासमोर ठाकला आहे.
प्रत्यक्षात टंचाई कृती आराखडयात असणा-या व मागील वर्षी ‘जलयुक्त शिवार अभियाना’त समाविष्ट करण्यात आलेल्या बहुतांश गावांतील वाडयांकडून टँकरची मागणी पुढे आल्याने तालुका पंचायत समितीचा या वर्षीचा टंचाई कृती आराखडा केवळ कागदी आराखडा असल्याचे पुढे आले आहे.
मार्चच्या सुरुवातीला तालुक्यातील कळसवली कोष्टेवाडी, मूर चिखलेवाडी आणि वाळवड व मोरोशी तळेवाडी यांनी टँकरची मागणी केली. या चारही गावांतील या वाडयांची पाहणी केल्यानंतर केवळ मोरोशी-तळेवाडीतच टँकरची आवश्यकता असल्याचे नमूद करून प्रशासनाच्या वतीने गुरुवारपासून टँकर सुरू करण्यात आला.
प्रारंभी टँकरची मागणी केलेल्या कळसवली कोष्टेवाडी, मूर चिखलेवाडी आणि वाळवड या गावांतील टँकरची मागणी प्रलंबित असताना आता खरवते धनगरवाडी, कारवली विठ्ठलवाडी, बौद्धवाडी, गाववाडी, मधलीवाडी, वरचीवाडी मोरोशी टेंबवाडी, मधलीवाडी, मिरासवाडी आणि बौद्धवाडी, हसोळ तर्फे सौंदळमधील कोंडलाडवाडी आणि बौद्धवाडी, झर्ये धनगरवाडी, पळसमकरवाडी, गुरववाडी, सुतारवाडी आणि बौद्धवाडी, ताम्हाणे धनगरवाडी, शेंडेवाडी, चव्हाणवाडी, तळवडे धनगरवाडी यांनी टँकरची मागणी केली आहे.
या सर्व गावांतील पाणीटंचाईच्या परिस्थितीची प्रशासनाच्या वतीने तहसीलदार व गटविकास अधिका-यांच्या संयुक्त समितीने पाहणी केली असून; यातील खरवते, झर्ये, ताम्हाणे, तळवडे या चारही गावांतील धनगरवाडयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. पुढील आठवडयापासून या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.
या वर्षी प्रशासनाकडून तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखडयात तालुक्यातील आठ गावांतील २३ वाडयांचा समावेश करण्यात आला होता. यात सरकारच्या ‘जलयुक्त शिवार अभियाना’तील पाच गावांचा समावेश होता. प्रत्यक्षात टंचाई कृती आराखडयाबाहेरील गावांतील वाडयांतून टँकरची मागणी होत आहे.