नारायण राणे यांनी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रालय, विधान भवन आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयापासून थेट दिल्लीपर्यंत या राजीनाम्याचीच चर्चा होती.
मुंबई- जाहीर केल्यानुसार नारायण राणे यांनी सोमवारी उद्योगमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मंत्रालय, विधान भवन आणि राजकीय पक्षांच्या कार्यालयापासून थेट दिल्लीपर्यंत या राजीनाम्याचीच चर्चा होती. दिल्लीतही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी, राज्याला मुख्यमंत्री मिळाला पण नेता नाही. राणे यांना राजीनामा द्यावा लागतो हे दुर्दैव असल्याचे मत व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांवर शरसंधान केले.
राणे यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे कार्यालय असलेल्या गांधी भवनमध्ये शांतता होती. राष्ट्रवादी भवनमध्ये उपस्थित असलेल्या मोजक्याच नेत्यांमध्ये नारायण राणे पुढे काय करणार याचेच तर्क लढवले जात होते. मंत्रालयही त्याला अपवाद नव्हते. भाजपनेही तातडीने नारायण राणे यांना भाजप प्रवेशासाठी अनुकूलता दाखवली. विविध ठिकाणी या राजीनाम्याचे पडसाद उमटत असतानाच पत्रकार परिषदेमुळे राजीनाम्यानंतरच्या सर्व घडामोडींचे केंद्र हे ‘ज्ञानेश्वरी’ बंगला होते. राजीनाम्यानंतर नारायण राणे काय बोलतात याची उत्सुकता सर्वानाच होती. राजकीय पक्षांच्या कार्यालयात त्याबाबत जास्त उत्सुकता होती.
राणे हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत असताना त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला पक्षातून पाठिंबा देणारी वक्तव्य ऐकायला मिळत होती. नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजपनेही त्यांना पक्षात घेण्याबाबत अनुकूलता दर्शवली आहे.
राणे हे ज्येष्ठ नेते असून त्यांच्या पक्ष प्रवेशाचा निर्णय केंद्रीय नेते घेतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर राणे यांनी पक्षात यावे यासाठी कोकणातील भाजप नेते अनुकूल असल्याचे संकेत भाजपचे कोकण प्रभारी विनय नातू यांनी दिले. याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न असल्याचे जाहीर केले. मात्र निवडणुकीच्या तोंडावर तो लवकरात लवकरच सोडवला जावा, अशी भावना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि नारायण राणे यांच्यात होणा-या भेटीनंतर तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राणे यांच्यावर पक्षात अन्याय झाल्याची भावना काही जणांनी व्यक्त केली. राणे यांनी काँग्रेस सोडू नये, असेही काहींचे म्हणणे होते. मंत्रालयात सरकारी कर्मचारी आणि अधिका-यांमध्ये तसेच मंत्र्यांच्या दालनांमध्येही राणे यांच्या राजीनाम्याविषयीच चर्चा रंगल्या होत्या.
निवडणुकीच्या तोंडावर नारायण राणे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागतो यासारखे दुसरे दुर्दैव नाही. पक्षनेतृत्व देशाच्या राजकारणात लक्ष देत आहे. अशा वेळी राज्याची जबाबदारी स्वीकारणा-या मुख्यमंत्र्यांनी तिथला प्रश्न तिथेच सोडवणे गरजेचे आहे. त्यांनी सर्वाना एकत्र घेऊन प्रश्न सोडवले पाहिजेत. ती त्यांची जबाबदारी आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. – विलास मुत्तेमवार, ज्येष्ठ नेते, काँग्रेस