शेतीसाठी भूज जलाचा अधिक उपसा झाल्याने पाण्याची पातळी घसरत असल्याचे अनेक गावांत दिसून येत आहे.
पुणे – शेतीसाठी भूज जलाचा अधिक उपसा झाल्याने पाण्याची पातळी घसरत असल्याचे अनेक गावांत दिसून येत आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने (जीएसडीए) केलेल्या अभ्यासावरून जानेवारीअखेर राज्यातील २७९२ गावांमध्ये भूजल पातळी सरासरीच्या तुलनेत एक मीटरपेक्षा अधिक खोल गेल्याचे आढळले आहे. त्यातच धरणेही कोरडी पडू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट उद्भवण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने ३ फेब्रुवारी १९९९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार, तसेच भूजल अधिनियम १९९३ नुसार संभाव्य पाणीटंचाईबाबत एक तांत्रिक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या सूचनेतील गृहीतकांनुसार पर्जन्यमानात २० टक्के तूट असेल आणि भूजल पातळीत एक मीटरपेक्षा अधिक घट असेल, तर त्या भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईची शक्यता असते.
राज्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने भूजल पातळीत किती घट झाली, हे पाहण्यासाठी राज्यातील ३९२० विहिरींचे निरीक्षण केले. गत पाच वर्षातील सरासरी भूजल पातळीशी जानेवारी २०१४ अखेरच्या भूजल पातळीशी तुलना केली. यानुसार १४४ तालुक्यांतील २७९२ गावांत भूजल पातळी एक मीटरपेक्षा खोल गेल्याचे आढळले. यापैकी ४९७ गावांमध्ये भूजल पातळीत तीन मीटरपेक्षा अधिक घट, तर ७०८ गावांत दोन ते तीन मीटरनी, तर १५८७ गावांत एक ते दोन मीटरनी घट दिसून आली.
जायकवाडीचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर
मराठवाड्यासाठी वरदान ठरलेल्या जायकवाडी प्रकल्पात गतवर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के पाणीसाठा शिल्लकअसला, तरी पाणीसाठ्याची घट जलदगतीने सुरू आहे. महिन्याभरापूर्वी तीस टक्क्यांवरून जायकवाडी धरणाचा पाणीसाठा १५ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील गावागावांत चिंता वाढू लागली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात घट झाल्याने मे मध्ये स्थिती कशी असेल, हाच प्रश्न धरणक्षेत्रात चिंता वाढवणारा ठरला आहे. २१७१ दलघमी एवढी एकूण क्षमता असलेल्या जायकवाडी प्रकल्पात सद्य:स्थितीत ३१६ दलघमी एवढा म्हणजेच १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.