आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) तब्बल दोन हजार अकरा कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्याची बाब समोर आली आहे.
मुंबई – आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) तब्बल दोन हजार अकरा कोटी रुपये राज्य सरकारने थकवल्याची बाब समोर आली आहे. महामंडळाने तयार केलेल्या एका अहवालात ही बाब स्पष्ट झाली. आर्थिक अडचणीत सापडलेल्या एसटीला पैशांची निकड भासत असून, हे पैसे तत्काळ एसटीला मिळाले तर महामंडळासाठी तो एक मोठा आधार ठरणार आहे.
राज्य परिवहन महामंडळाचा नव्याने झालेला वेतन करार, डिझेलचे वाढते दर, प्रवाशांची कमी झालेली संख्या यामुळे गेल्या अनेक वर्षापासून आर्थिक संकटाशी दोन हात एसटीवर आर्थिक आणीबाणीच आली आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी एसटी महामंडळाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यात महामंडळाला यश येत नाही. त्यातच महामंडळाने तयार केलेल्या अहवालातून समोर आलेल्या या थकबाकीमुळे त्यांच्यासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.
गेल्या तीन वर्षात राज्य सरकारने तब्बल दोन हजार अकरा कोटी रुपयांची थकबाकी थकवली आहे. या थकीत रकमेमध्ये कामगारांसाठी मान्य केलेली रक्कम, सवलत रक्कम बस खरेदीविक्रीसाठी द्यावयाच्या रकमेचा समावेश आहे. २०१०-११ साली एक हजार दोनशे कोटी रक्कम राज्य सरकार देणे भाग होती. तीच रक्कम २०११-१२ ला १ हजार ६८२ कोटी झाली. तर २०१२-१३ मध्ये तो टप्पा २ हजार कोटींपर्यंत गेला. याबाबतची माहिती महामंडळाने तयार केलेल्या अहवालातून समोर आली आहे. ही थकीत रक्कम जर वेळेत मिळाली तर महामंडळाला मोठा दिलासा मिळणार आहे.