प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, गोब्राह्मणप्रतिपालक, हिंदूपदपातशाही संस्थापक, महाराजाधिराज महाराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज..
– रायगडावर भर दुपारी होळीच्या माळावर महाराजांच्या पुतळ्याजवळ उभे राहून माहिती देणा-या गाइडने त्याची नेहमीची ठरलेली टेप संपवताना महाराजांच्या नावाने असा जयघोष केल्यावर डोक्यावरचे रणरणते ऊन, समोरच्या बाजारपेठेचे भग्न अवशेष, कुठल्याही जतन-संवर्धन उपक्रमांविना हिंदवी स्वराज्याच्या एकेकाळच्या या राजधानीची आज झालेली दुरवस्था या सगळ्याचा क्षणभर विसर पडला, अंगावर रोमांच उभे राहिले, मान उगाचच अभिमानाने ताठ झाली आणि ओठातून आपसूक ‘की जय’ अशी ललकारी बाहेर पडली.
गेल्याच सोमवारी रायगड मुक्कामी होतो तेव्हाची ही गोष्ट. अनेक ऋतूंमध्ये, अनेक अंगांनी गड डोळे भरून पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अजूनही तो सफल संपूर्ण झालेला नाही. पावसाळ्यात तो सोनकीच्या पिवळ्या रानफुलांनी, हिरव्यागार तृणपात्यांनी बहरून येतो, धुक्याच्या पडद्यात, खळाळल्या ओहळांत, ताशीव कडयांवरून उडया घेणा-या शुभ्र निर्झरांच्या, धबधब्यांच्या पडद्याआड भग्नावशेषांचे दारिद्रय, दुरवस्था लपवू पाहतो. दुर्गप्रेमींना ही दुरवस्था व्यथित करत असते पण इथल्या दगडांमध्ये, शिलाखंडांमध्ये, महादरवाजाच्या चि-यांमध्ये दडलेला, इथल्या दरीखो-यांतून मनमुक्त हिंडणा-या वा-यावर स्वार झालेला स्फूर्तिदायक, प्रेरक इतिहास आपली खंत, व्यथा फार काळ टिकू देत नाही तरीही आतून काहीतरी टोचत रहातचं.
उन्हाळ्यात मात्र गडाची दशा खिन्न करते, अधिक जाणवते, त्रास देते. गडाच्या घे-यातील झाडोरा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. मोठया प्रमाणावर तोड होते आहे, वणवे लागत आहेत, लावले जात आहेत. हिरवाई दुर्मीळ झाल्याने रखरख वाढली आहे. महादरवाजाच्या वाटेने या नाहीतर हिरकणीवाडीकडून रोप वेने गड जवळ करा.. एकेकाळी हिरवागार, गर्द झाडीत लपलेला गड उघडा पडत चालल्याचे स्पष्ट जाणवते. देखभालीअभावी गडाची आबाळ होत असल्याची भावना माथ्यावर पोहोचल्यावर तर आणखी गडद होते. काय आहे आता गडावर? फक्त उघडेबोडके चिरे, पत्थरदिल दरवाजे आणि एकेकाळी हिंदवी स्वराज्याच्या राजाची पावले जिथे रुबाबात, दिमाखात पडत होती त्या बालेकिल्ला परिसराचे, दरबाराचे, राजवाडयाचे, राणीमहालांचे, खलबतखान्याचे, दिवाने खासचे पडझड झालेले अवशेष. गाइड घोकत असलेली माहिती ऐकून आणि हे माथ्यावर छप्पर नसलेले अवशेष पाहून आपण समजून घ्यायचे एकेकाळी गडावर नांदणा-या हिंदवी स्वराज्याचे सामर्थ्य. कल्पनेने उभे करायचे त्या काळातील वैभव, ऐश्वर्य.
महाराजांनी चखोटा गड, अवघड गड म्हणून स्वराज्याच्या राजधानीचा मान रायरीला दिला. त्यांच्या आज्ञेहुकूमबराबर हिरोजी र्फजदाने गड बांधून काढला. सभासद बखरीत नोंद आहे – ‘राजा खासा जाऊन पहाता गड बहुत चखोटा. चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दीड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे.. दशगुणी असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तख्तास जागा हाच गड करावा’ अर्थात, रायरी चढाईला अवघड, चहूबाजूंचे कडे ताशीव, पकड घेता येणार नाहीत असे आणि आभाळाएवढया उंचीचे. पाऊसकाळातही या कडय़ावर गवताचे पाते धरत नाही, कुठे पाय रोवायलाही फट नाही. सबब शत्रू कडे चढून येऊन हमला करणे अशक्य. राजांनी गड बांधून घेतला. चुना, गूळ, मातीने घट्ट बसवलेले चिरे आजही उन, वारा, पाऊस सा-याला तोंड देत आणि उपेक्षेला सामोरे जात इतिहासाचा वारसा कसाबसा सांभाळून आहेत.
गडाची देखभाल, जतन-संवर्धनाची जबाबदारी केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडे आहे. देखभालीच्या नावाने, संवर्धनाच्या नावाने बोंबच आहे हे गड फिरताना दिसतेच. भग्नावशेषांच्या ठिकाणी केवळ स्थलदर्शक पाटया लावून किंवा कुठे काही ढासळले तर तात्पुरती डागडुजी करण्यापुरतेच संवर्धन येथे सुरू असते. संपूर्ण गडमाथ्यावर जगदीश्वर मंदिराचा अपवाद वगळता कुठेही पिण्याचे पाणी नाही, गड पहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी, पर्यटकांसाठी स्वच्छतागृह नाही. सावलीला झाडमाड नाही, वृक्षारोपण नाही काहीही नाही. एकेकाळी गडाभोवती गर्द रान होते, गडावरही वृक्षवल्लींची छाया होती. आता त्यातले काहीही नाही. एकूण अवस्था पाहता असे काही उभारण्याची इच्छाशक्तीही दिसत नाही. सरकारी स्तरावर ही अक्षम्य उपेक्षा सुरू असतानाच इतिहास आणि महाराजांच्या वारशाच्या तुता-या वाजवणा-या वंशजांनीही फारसे काही केलेले गडावर दिसत नाही. ६ जूनच्या राज्याभिषेक दिनी वा अन्य उत्सवी समारंभांमध्ये मानाचे पान घेणा-या या वंशजांकडूनही दुर्गप्रेमींना सक्रिय कृतीची अपेक्षा आहे.
गडावर आणि गडाच्या घे-यात ज्या गडक-यांच्या वाडया आहेत त्यांच्यासाठीही कुठलीही सुविधा नाही. कुडामातीच्या भिंतींआड त्यांचे संसार गडावर येणा-यांना भाकरी-पिठलं, दही विकून येणा-या पैशावर सुरू आहे. हिरकणीवाडीसह अनेक वाडयांना पाण्याची कायमस्वरूपी सोय नाही. महाराजांविषयी आत्यंतिक आदर दाखवणा-या मंडळींना या हालअपेष्टा कधी दिसणार आणि गडाची व गडक-यांची दुरवस्था कधी दूर होणार याचे उत्तर द्यायला इथे लोकप्रतिनिधीही फिरकत नाहीत.
आचार्य अत्रे यांनी म्हटले होते, महाराष्ट्रातील किल्ल्यांना इतिहास आहे आणि इतर राज्यांतील किल्ल्यांना फक्त भूगोल.. रायगडाचा फक्त भूगोल शिल्लक राहू नये याची काळजी कुणी घ्यायची?
रायगड उत्तराची वाट पाहतो आहे!!