देशात दिवसागणिक वाढत चाललेल्या महागाईला थोपवण्यात केंद्रातील रालोआ सरकार अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
नवी दिल्ली- देशात दिवसागणिक वाढत चाललेल्या महागाईला थोपवण्यात केंद्रातील रालोआ सरकार अपयशी ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. रेल्वे भाडेवाढ, रोजच्या आयुष्यात लागणा-या वस्तू, भाज्या आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली वाढ हे मुद्दे सोमवारपासून सुरू होणा-या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शनिवारी घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी या मुद्दयावर दोन्ही सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली.
येत्या १४ ऑगस्टपर्यंत चालणा-या या अधिवेशनात महागाई, रेल्वे भाडेवाढ आणि तामिळनाडूमधील मच्छीमारांचा प्रश्न उचलून धरण्याची तयारी विरोधी पक्षांनी केली आहे. उपस्थित केले नसल्याचे लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले. संसदेत अर्थसंकल्प आणि रेल्वे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महागाई आणि रेल्वे भाडेवाढीमुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीवर चर्चा होणे गरजेचे आहे, असे तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी सांगितले.
दरम्यान, ही बैठक मैत्रिपूर्ण वातावरणात झाली असून सर्व पक्षांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सभापती सुमित्रा महाजन म्हणाल्या. काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे, बीजेडीचे भार्तुहरी महाताब, कम्युनिस्ट नेते पी. करुणाकरण आणि समाजवादी पक्षाचे धर्मेद्र यादव आदी नेते या वेळी उपस्थित होते. तसेच सरकारकडून संसदीय कार्यराज्यमंत्री प्रकाश जावडेकर आणि संतोष गंगवार, अन्नमंत्री रामविलास पास्वान उपस्थित होते.