मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रेहमान लख्वीच्या सुटकेचा मुद्दयावर पुढील बैठकीत चर्चा करणार असल्याचे आश्वासन संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीने भारताला दिले आहे.
संयुक्त राष्ट्र – मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर रेहमान लख्वीच्या सुटकेचा मुद्दयावर पुढील बैठकीत चर्चा करणार असल्याचे आश्वासन संयुक्त राष्ट्र संघाच्या समितीने भारताला दिले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे दूत अशोक मुखर्जी यांनी यूएनएससी अल-कायदा मान्यता समितीचे दूत जिम मॅक्ले यांना पत्र लिहिले होते. या पत्रात भारताने लख्वीच्या सुटकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
पाकिस्तान न्यायालयाकडून करण्यात आलेली लख्वीची सुटका ही संयुक्त राष्ट्र संघाच्या १२६७ क्रमांकाच्या ठरावाचे उल्लंघन आहे. हा ठराव विशेष संस्था आणि व्यक्तींशी संबंधित आहे.असेही भारताने म्हटले आहे.
तसेच लख्वीच्या जामीनासाठी पाठवण्यात आलेली रक्कमही मान्यता समितीच्या नियमांच्या विरुद्ध आहे. मान्यता समितीमध्ये संयुक्त राष्ट्रांचे पाच स्थायी आणि १० अस्थायी सदस्य आहेत.
भारताने पत्र लिहून लख्वीच्या सुटकेबाबत नाराजी व्यक्त केल्यानंतर मॅक्ले यांनी या प्रकरणी पुढील बैठकीत चर्चा होणार असल्याचे आश्वासन दिले. काही दिवसांमध्येच ही बैठक होणार आहे.
लख्वीच्या सुटकेप्रकरणी अमेरिका, रुस, फ्रान्स आणि जर्मनी या देशांनीही चिंता व्यक्त केली आहे. लख्वी आणि त्याचे सहा साथीदार अब्दुल वाजिद, मझहर इक्बाल. हमद अमिन सदिक, शाहिद जमील रियाझ, जमील अहमद आणि युनुस अंजुम यांच्यावर हल्ल्याचा कट रचणे आणि तो अमलात आणल्याचा आरोप आहे. २००९ पासून या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे.