‘‘वांद्रे पूर्व भागात प्राथमिक सुविधांचा प्रश्न जसा गंभीर आहे, तसाच बंद पडलेल्या एसआरए प्रकल्पांची समस्याही मोठी आहे.
मुंबई- ‘‘वांद्रे पूर्व भागात प्राथमिक सुविधांचा प्रश्न जसा गंभीर आहे, तसाच बंद पडलेल्या एसआरए प्रकल्पांची समस्याही मोठी आहे. गोळीबार रोड, भारतनगर, महाराष्ट्रनगर, निर्मलनगर, खेरनगर येथील अनेक प्रकल्प गेल्या दहा वर्षापासून रखडले आहेत.
अनेक प्रकल्प बंद पडले आहेत. आपण निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सर्वच्या सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास बिल्डरांना भाग पाडू’’, असे ठोस आश्वासन वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे यांनी दिले आहे.
तर मुंबई महापालिका आणि महाराष्ट्राच्या तिजोरीवर दरोडा घालणा-या शिवसेना-भाजपाच्या सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी नारायण राणे यांना निवडून द्या, असे आवाहन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केले.
वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी खेरनगर इमारत क्रमांक २७ समोर राणे यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
या सभेला अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव आमदार बाला बच्चन, श्योराज वाल्मिकी, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार विरेंद्र जगताप, आमदार सुनील केदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद गावडे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे देवेंद्र कवाडे, मिलिंद सुर्वे, राजेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना राणे पुढे म्हणाले की, निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने मी वांद्रे पूर्व विभागात फिरत आहे.
हा मतदारसंघ म्हणजे ‘मातोश्री’च्या अंगणातील मतदारसंघ असा प्रचार केला जात आहे. मग मला प्रश्न पडतो ‘मातोश्री’च्या अंगणात एवढी घाण कशी? बेहरामपाडा, नौपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वरनगर या भागांची अवस्था किती बिकट आहे.
माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणा-या प्राथमिक सुविधाही येथे नाहीत. या भागातील आणखी एक सर्वात मोठी समस्या म्हणजे एसआरए प्रकल्पांच्या नावाखाली केलेली स्थानिक रहिवाशांची फसवणूक. येथील लोकांनी मोठया विश्वासाने आपली घरे बिल्डर्सच्या स्वाधीन केली.
पाच वर्षात प्रकल्प पूर्ण करणार असे सांगितलेले असताना दहा-दहा वर्षे प्रकल्प बंद पडलेले आहेत. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना भाडे दिले जाईल, असा करार करण्यात आला होता. परंतु अनेक रहिवाशांना गेल्या सहा वर्षात घर तर मिळालेले नाहीच, परंतु बिल्डरने कबूल केलेले भाडेही दिलेले नाही.
याबाबत शिवसेनेने कधी आवाज उठवला आहे का? शिवसेनेने कधीही विकासाचे राजकारण केले नाही. तसे असते तर २२ वर्षे शिवसेनेची सत्ता मुंबई महापालिकेत असताना येथील लोकांना इतक्या घाणीत राहावे लागले नसते. मी केवळ आमदार होण्यासाठी इथे उभा नाही.
आमदारकी हे माझ्यासाठी फार मोठे पद आहे, असे मला वाटत नाही. या पूर्वी या राज्यातील अनेक पदे मिळविली आहेत. नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा मंत्री अशी सर्व पदे मी मिळवली आहेत. मला पदाचा सोस नाही.
मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी येथे मला उमेदवारी देऊन काम करण्याची संधी दिली आहे. त्यांनी दाखविलेला विश्वास सार्थ करून दाखवीन. या विभागातल्या सर्व प्रश्नांचा मी अभ्यास केला आहे. मी निवडून आल्यानंतर या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न करीन. मुख्य म्हणजे एसआरएचे सर्व प्रकल्प सहा महिन्यांत पूर्ण करीन, असे आश्वासनही राणे यांनी यावेळी दिले.