‘गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या’ च्या घोषणा देत भक्तीमय वातावरणात बुधवारी मुंबई-पुण्यात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
मुंबई- पुणेरी ढोल-डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, गुलालाने माखलेले चेहरे, पृष्पवृष्टीचे आकर्षक देखावे, भव्य गणेशमूर्तीसमोर येताच आशिर्वादासाठी जोडले जाणारे हात, रस्त्यावर उसळलेला जनसागर आणि ‘गणपती बाप्पा मोरया… पुढल्या वर्षी लवकर या…’ चा गजर अशा भावपूर्ण आणि भक्तीमय वातावरणात बुधवारी मुंबई-पुण्यात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.
दहा दिवसांचा मुक्काम आटोपून स्वगृही निघालेल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबई-पुण्यात रस्त्यावर जनसागर उसळला होता. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणरायाच्या दर्शनसाठी लालबागमध्ये गर्दी उसळली होती.
सकाळी विसर्जनासाठी निघालेल्या प्रसिध्द गणेश मंडळांच्या मोठया गणेशमूर्ती संध्याकाळी चार-पाचच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर पोहोचल्या. त्यावेळी समुद्राला ओहोटी होती. त्यामुळे संध्याकाळी साडेसहानंतर येथे मोठया गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
गिरगाव चौपाटीवर स्टिंग रे मासे आढळल्याने महापालिका प्रशासनाने विसर्जनासाठी समुद्रात उतरणा-यांना खबदारी घेण्याचे आवाहन केले होते. संस्कृतीचे माहेरघर असलेल्या पुण्यातही उत्साहात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. इथल्या कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी आणि गुरुजी तालिम मंडळाच्या मानाच्या तीन गणपतींचे संध्याकाळीच विसर्जन झाले.
बुधवारी मुंबईत रस्तोरस्ती गर्दी उसळणार असल्याने, विसर्जन स्थळांसह ठिकठिकाणी मोठया प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात होता. विसर्जन मिरवणूकांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले होते.
आपल्या लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर बाप्पाला निरोप देताना भक्तांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. तरीही गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात बाप्पाला उत्साहात निरोप देण्यात आला.
३७८६ गणेशमूर्तीचे विसर्जन
मुंबईत वेगवेगळया चौपाटया-तलावांवर रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण २५१८६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यात २३४११ घरगुती गणेशमूर्ती असून, १६३२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन झाले. पालिकेने तयार केलेल्या कृत्रिम तलावात सार्वजनिक गणेश मंडळांच्या २९ मूर्तींचे तर घरगुती गणपतीच्या २३२ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. मुंबईतील महापौर निवसात उभारण्यात आलेल्या कृत्रिम तलावात आतापर्यंत ९६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले आहे. इथे विसर्जनासाठी गणेशमूर्ती घेऊन येणा-या भाविकांनी पार्कींगची सुविधा नसल्याने नाराजी प्रगट केली आहे.
ठाण्यातही ढोल-ताशाच्या गजरात उत्साहात गणेश विसर्जन मिरवणुका पार पडल्या. ठाण्यात कोपरी पूर्व येथे पालिकेने विसर्जनाची उत्तम व्यवस्था ठेवली होती. खास विसर्जन सोहळा पाहण्यासाठी येथे स्पेनहून काही पाहुणे आले होते. येथे भाविकांची गर्दी उसळली होती.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात गणेश विसर्जनसाठी गेलेल्या तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.
[EPSB]
निरोपासाठी उसळली गर्दी… (फोटो गॅलरी)
बाप्पांना निरोप देण्यासाठी मुंबईतील रस्त्यांवर जनसागर उसळला आहे. लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेला लालबागचा राजा, गणेशगल्लीचा गणराया, तेजुकाय, आणि नरेपार्कच्या दर्शनासाठी लालबागमध्ये गर्दी उसळली आहे…
[/EPSB]
पोलिसांचा चोख बंदोबस्त
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विसर्जन स्थळी, समुद्रकिना-यांवर आणि प्रमुख रस्त्यांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मुंबई पोलिस दलातील २१,५०० पोलिस, १५०० वरिष्ठ पोलिस अधिकारी, २५०० वाहतूक पोलिस, शीघ्रकृती दलाच्या दोन, बीएसएफची एक, राज्य पोलिस दलाच्या चार आणि एसआरपीएफच्या २७ तुकडया विविध ठिकाणी तैनात होत्या. तब्बल ११ हजार सार्वजनिक आणि १ लाख घरगुती गणेशमूर्तींच्या निर्विघ्न विसर्जनासाठी मुंबईतील २७ चौपाटयांसह ७२ स्थळे सज्ज आहेत.
पुढच्या वर्षी बाप्पाचे आगमन ऑगस्टमध्ये
‘पुढच्या वर्षी लवकर या!’ ही गणेशभक्तांची मागणी बाप्पा पूर्ण करणार आहेत. गणरायाचे आगमन पुढच्या वर्षी लवकर होणार असल्याची खूशखबर आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात होणा-या गणरायाचे आगमन पुढील वर्षी २९ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे.