वाड्यापासून पाच किलोमीटर अंतरावरील पाली गावाजवळ एका बोलेरो गाडीला मध्यरात्री दोनच्या सुमारास भीषण अपघात झाला.
वाडा- खराब रस्त्यामुळे बलेरो जीपला झालेल्या अपघातात तालुक्यातील तरुणाचा पत्नीसह मृत्यू झाल्याची घटना वाडा- मनोर महामार्गावरील पाली गावाजवळ घडली. नारायण पाटील (३४), नम्रता पाटील (२८) अशी या दोघांची नावे आहेत. सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात घडल्यानंतर ग्रामस्थांत संतापाचे वातावरण होते. मंगळवारी सकाळी या दोघांच्या अंत्यविधीच्या वेळी त्याचा उद्रेक होऊन ग्रामस्थांनी महामार्गावर सकाळपासून सुमारे सहा तास ‘रास्तो रोको’केल्याने तणावाचे वातावरण होते. भिवंडी- वाडा- मनोर राज्य महामार्गाचे बीओटी तत्त्वावर चौपदरीकरण करणा-या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने निकृष्ट दर्जाचे काम केल्यानेच वारंवार अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी पडत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
अपघातात मृत्यू झालेल्या पती- पत्नीच्या अंतिम विधीसाठी जमा झालेल्या शेकडो लोकांच्या जमावाने सुप्रीम कंपनीच्या संचालकांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी कलमखांड येथे रास्ता रोको आंदोलन केले. वाडा पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
भिवंडी- वाडा- मनोर राज्य महामार्गावर अपूर्ण व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वारंवार अपघात होत आहेत. रस्त्याचे काम अपूर्ण असताना दोन ठिकाणी टोलवसुली सुरू आहे. या मार्गावर गेल्या दोन वर्षात दीडशेहून अधिक जणांचा बळी गेला आहे. येथील टोलवसुलीविरोधात अनेकदा आंदोलनेही झाली आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी व पोलिस या कंपनीलाच पाठीशी घालत असल्याने आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप गावकरी करत आहेत.
दोन वर्षात १५० जणांचा अपघाती मृत्यू
सोमवारी रात्री पाली गावाजवळ अपूर्ण असलेल्या रस्त्यामुळे नारायण पाटील यांची बोलेरो गाडी घसरून झालेल्या अपघातात नारायण पाटील व त्यांच्या पत्नी नम्रता पाटील हे जागीच गतप्राण झाले. तसेच या गाडीत प्रवास करत असलेला त्यांचा नऊ वर्षीय मुलगा (हिमांशू) हा गंभीर जखमी झाला आहे. याच ठिकाणी यापूर्वी मागील दोन वर्षात सात अपघात होऊन १५० जणांचा मृत्यू झाला आहे. या दाम्पत्यांच्या पश्चात नारायण पाटील यांचा नऊ वर्षीय मुलगा व त्याचे ७० वर्षीय आजोबा हे दोघेच कुटुंबात उरले आहेत.
आश्वासनानंतर आंदोलन मागे
सुप्रीम कंपनीचे प्रमुख विकी शर्मा व त्यांचे सहकारी तसेच या कंपनीला पाठीशी घालणारे सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सहा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रांत अधिकारी हरिश्चंद्र पाटील, वाडा तहसीलदार दिलीप संखे, पोलिस उपअधीक्षक श्रीनिवास घाडगे, वाडा पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन सुप्रीम कंपनी व संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.