देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात ज्येष्ठ साहित्यिक व लेखकांनी दंड थोपटले असतानाच नामवंत गीतकार व दिग्दर्शक गुलजार हेही त्यात सामील झाले आहेत.
पाटणा – देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात ज्येष्ठ साहित्यिक व लेखकांनी दंड थोपटले असतानाच नामवंत गीतकार व दिग्दर्शक गुलजार हेही त्यात सामील झाले आहेत. देशातील धार्मिक असहिष्णुतेने आपण अस्वस्थ असून पुरस्कार परत करणे हा एकमेव निषेधाचा मार्ग लेखकांकडे आहे, असे मत गुलजार यांनी व्यक्त केले.
कन्नड लेखक एम. एम. कुलबुर्गी यांच्या हत्येने व विचारवंतांवर होणा-या हल्ल्याने लेखक व साहित्यिक संतप्त झाले आहेत. आतापर्यंत गप्प असलेले गुलजारही या हल्ल्याने दु:खी झाले.
आपल्या भावनांना वाट करून देताना ते म्हणाले की, लेखकाची हत्या हा अकादमीचा दोष नाही. मात्र, अकादमीने या हल्ल्याचा निषेध करायला हवा अशी त्यांची मागणी आहे. कुलबुर्गी यांच्या हत्येने आमच्या सर्वाच्या भावना दुखावल्या असून सरकार व यंत्रणेत काही त्रुटी आहेत. पुरस्कार परत करणे हा निषेधाचा मार्ग आहे.
लेखकाकडे निषेधाचा अन्य कोणताही मार्ग नाही. देशात सध्या सुरू असलेली धार्मिक असहिष्णुता यापूर्वी आपण कधीही पाहिलेली नाही. मात्र, आमच्या भावना आम्ही निर्भयपणे व्यक्त करू शकतो, हीच काय ती जमेची बाजू आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
देशात जातीय अहिष्णुता पराकोटीला पोहोचली आहे. पुरस्कार परत करण्याचा निर्णय हा राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मत अयोग्य आहे, असे ते म्हणाले. सध्या व्यक्तीला नावापूर्वी त्याचा धर्म विचारला जात आहे. यापूर्वी कधीही असे घडले नव्हते. लेखक कोणते राजकारण करू शकतो. लेखक फक्त हृदय, मन व आत्म्याने आपले म्हणणे मांडू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोगोई यांचीही टीका
देशात वाढत चाललेल्या वाढत्या असहिष्णुतेमुळे देशाचे नाव बदनाम होत आहे, अशी टीका आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांनी केली. देशात लेखकांचे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचा आरोप केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला होता. जेटली यांच्या विधानाचा गोगोई यांनी समाचार घेतला. जेटली यांचे विधान निषेधार्थ असून लेखकांचा अपमान करणारे आहे. अनेक लेखकांनी उत्स्फूर्तपणे हे पुरस्कार परत केले आहेत, असे गोगोई यांनी स्पष्ट केले. देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या विरोधात उजव्या विचारांचे साहित्यिक गप्प कसे, असा सवाल त्यांनी केला.