क्रोध, मोह, मत्सराने मानवी मनाचा ताबा घेतला आहे. या विकारांमुळे समाजात अस्वस्थता पसरली आहे. कुणाला जगावेसे वाटत नाही. त्यामुळे मुंबईसारख्या महानगरात एकाच दिवशी पाच माणसं वेगवेगळ्या कारणावरून आत्महत्या करतात. कुणी उंच इमारतीवरून उडी मारतो. संताप वाढल्याने कुणाला तरी जाळण्याचा प्रयत्न होतो. प्रवासात धक्का लागला म्हणून राग अनावर होतो. धक्क्याचा परिणाम बुक्का मारण्यात होते. गोंधळ, गडबड, ताणतणावात शांतचित्ताने जगणे हरवत चालले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुंबईत एका बातमीने सा-यांचे लक्ष वेधले होते. दोन दिवसांत वेगवेगळ्या कारणांसाठी पाच जणांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. त्या आत्महत्येची कारणे वेगवेगळी असली तरी नैराश्य आणि तणाव ही मुख्य कारणे सांगितली जातात. मुंबईसारख्या शहरांत अशा वेगवेगळ्या घटना रोजच घडतात, पण ४८ तासांत पाच जणांना आपले आयुष्य संपावेसे वाटणे, ही बाब संवेदनशील मनाला चटका लावणारी ठरते. मुंबईसारख्या वेगवान शहराने इथल्या जगण्याला जेवढे ऐश्वर्य दिले आहे, तेवढेच ताणतणावही डोईवर ठेवले आहेत, हेच या घटनेने अधोरेखित झाले आहे. आत्महत्या करणारे सारे २५ ते ४५ वयोगटांतील असल्याने या सा-यांच्या खांद्यावर कमी अधिक प्रमाणात जबाबदा-या होत्या. त्या जबाबदाऱ्या पेलवताना महत्त्वाकांक्षाही आपोआपच जन्माला येतात. त्या पूर्ण करताना संघर्ष करावा लागतो, धांदल उडते, अपयश येते. त्या अपयशाला पेलवता आले नाही तर जगणेच आपल्याला दुय्यम वाटते. मुळात ही निराशा आपल्या पदरात येऊ नये, यासाठी आपण मनाने तयार झालेलो नसतो. यश पचवणे सोप्पे असते, पण अपयश पचवण्यासाठी ताकद लागते. ही ताकद देणारी यंत्रणाच आम्ही महानगराच्या जंजाळात हरवून बसलो आहोत.
मुलांना शाळेत धाडताना आम्ही मोठमोठी स्वप्न बघायला लागलो आहोत. पैकीच्या पैकी गुण मिळवल्याचा आनंद साजरा करतो आहोत. मुलाच्या यशाचे कौतुक कुरवाळत आहोत. त्याचा उत्साह वाढवत आहोत. अपयश हा शब्दच मुलांच्या डिक्शनरीमधून पार हद्दपार करत आहोत. एखादवेळेस एक गुण कमी पडला तरी त्याचे दु:ख करतो. लहान वयातच त्याला फक्त पास व्हायचेच नव्हे तर सर्वाच्या पुढेच राहायचे, हे बिंबवित आहोत. एवढा अट्टहास करतानाच, आपल्या मुलाला एखाद्या पेपरमध्ये शून्य गुण मिळाले तर काय होईल, असा विचारही आपल्या मनात येत नाही. खरे तर मुलांच्या त्यांच्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे, त्यांच्या आवडी-निवडी तपासून पाहिल्या पाहिजेत. त्याला त्याच्या मनाप्रमाणे रमायची, खेळायची, बागडण्याची संधी दिली पाहिजे. पुस्तकातला गुणाकार-भागाकार त्याला समज आल्यानंतर कळेलही, पण आयुष्याची वजाबाकी त्याला शिकवली पाहिजे. पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आनंद तो साजरा करू शकतो, पण शून्य मिळाल्याचे शल्य त्याच्या बालपणातच अनुभवता आले पाहिजे. शून्यापासूनच यशाची पायरी कशी चढता येते, हे त्याला शिकवलेच पाहिजे. ती चाचणी घेण्यात आम्ही नापास ठरत आहोत का? हे तपासून पाहण्याची गरज आहे.
शाळेत मिळालेले गुण, त्याचे कौतुक आयुष्यभर पुरत नसते. आयुष्यात अनेक टप्पे गाठताना त्या यशाच्या पाय-यांत अडथडण्याची शर्यत लागलेली असते. त्या चढताना कधीकधी एक पायरी चुकून जाते. त्यातून सावरताना मग सारे यशच आठवते, अपयशातून यशाकडे जाण्याच्या मार्गाची वाट कधीच पाहिली नसते. त्यामुळे अपयश जिव्हारी लागते. ते जीवघेणेही ठरते. त्यामुळे आपल्या मुलाच्या यशाचे कौतुक करताना, त्याला अपयशही कधी आपली परीक्षा घेणार आहे, हे शिकवलेच पाहिजे. जग जवळ आले असले तरी आपले शेजारीच आपल्याला कोसो दूरचे वाटताहेत.
मी, माझे घर, माझा परिसर, माझे गाव, माझे शहर, माझा तालुका, माझा जिल्हा, माझे राज्य, माझा देश, माझे जग.. मीपासून सुरू झालेला हा जगण्याचा प्रवास जगाशी नाते सांगतो. अर्थात जगातल्या माणसांशी नाते विणतो. माणूस म्हणूनच जगायचे ठरवले असेल तर ‘मी’पणा सोडून माझ्या अवती-भवतीच्या माणसांचा विचार व्हायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. माझ्या घराच्या भिंतीपलीकडे काय चालले, त्याबद्दल आपल्याला काही घेणे-देणे नसते. आपल्या घरात कुणीही डोकावू नये, अशीच तजवीज आपणही करून ठेवलेली असते. त्यामुळे शेजा-यांशी असलेले नाते व्यावहारिकच झाले आहे. इतके व्यवहारी झाल्यानंतर आपल्या मनातले आंदोलन आपल्यालाच छळते. ते साचत जाते. एकलकोंडेपणा वाढतो. त्याचाच स्फोट होतो आणि हरलेल्या अवस्थेत आपण आयुष्यही संपवून टाकतो.
गावखेडयात एखाद्या हरलेल्या माणसांचे एकलकोंडेपण जाणती माणसे आपल्या अनुभवी नजरेतून पटकन हेरतात. त्याचे दु:ख ते दूर करू शकत नसले तरी त्याला नवी उमेद देतात. जगण्याचे बळ देतात. शहरांत, महानगरांत आपले एकलकोंडेपण भिंतीच्या पलीकडेही जात नाही. चार भिंतीतच गुदमरते. आपले अपयश, नैराश्य कुणाला तरी सांगावे, याचीही जणू आपल्याला लाजच वाटते. ही मनोवस्थाच आपला घात करणारी ठरते.
प्रत्येकाला जगायचे आहे आनंदात. तो आनंद मिळवण्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट उपसत असतो. त्यातून मिळालेल्या यशातून आपले स्वप्न विणत असतो. ते विणताना प्रत्येकाने राग, लोभ, मोह, मत्सर हे विकार बाजूला ठेवण्याचे ठरवले तर कुणालाच आत्महत्येचा पर्याय निवडावा लागणार नाही. आपल्याला जेवढे मिळाले, तेवढय़ात समाधानी राहता आले तर त्या समाधानाची कमाई आपले जगणे खरेच आनंददायी होईल.