दिल्लीत खासगी बसमध्ये एका तरुणीवर झालेला बलात्कार व तिच्या हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वसामान्यांच्या उद्रेकाची सरकारने दखल घेऊन अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल, अशी कायद्यात दुरुस्ती करावी लागली. पण महिलांवरील अत्याचारांविरुद्ध देशभर एवढा प्रक्षोभ होऊनही हे गुन्हे कमी तर झाले नाहीतच, उलट बलात्कार आणि विनयभंगांच्या गुन्हय़ांत वाढ होतच राहिली. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत वृत्तपत्राच्या छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई आणि देश पुन्हा हादरला. पण बलात्कारांप्रमाणेच उच्चपदस्थांकडून होणारे स्त्रियांचे लैंगिक शोषण हाही चिंतेचा विषय बनला आहे.
गेल्या काही वर्षापासून महिलांविरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. बलात्कार, बलात्कार करून खून, विनयभंग, छेडछाड आणि आमिष दाखवून, उच्च पदावर आहे म्हणून लैंगिक शोषण करणे, असे या गुन्ह्यांचे प्रकार आहेत. समाजात वाढत गेलेल्या अशा गुन्ह्यांमुळे फक्त महिलांबरोबरच नागरी समाजाच्या मनातही भीतीची पाल चुकचुकत आहे. २०१२मध्ये दिल्लीत खासगी बसमध्ये एका तरुणीवर झालेला बलात्कार व तिच्या हत्येमुळे देशभरात संतापाची लाट उसळली. सर्वसामान्यांच्या उद्रेकाची सरकारने दखल घेऊन अशा गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल, अशी कायद्यात दुरुस्ती करावी लागली. पण महिलांवरील अत्याचारांविरुद्ध देशभर एवढा प्रक्षोभ होऊनही हे गुन्हे कमी तर झाले नाहीतच, उलट बलात्कार आणि विनयभंगांच्या गुन्हय़ांत वाढ होतच राहिली. काही महिन्यांपूर्वीच मुंबईत वृत्तपत्राच्या छायाचित्रकारावर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने मुंबई आणि देश पुन्हा हादरला. पण बलात्कारांप्रमाणेच उच्चपदस्थांकडून होणारे स्त्रियांचे लैंगिक शोषण हाही चिंतेचा विषय बनला आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयातील उच्चपदस्थ अधिकारी, शिक्षण क्षेत्रातील उच्चपदस्थ व राजकारणातील बडय़ा हस्ती हे आपल्या पदाचा गैरवापर करून महिलांचे कसे शोषण करतात, याची अनेक प्रकरणे उघडकीला येत असतात. पण अशा गुन्हय़ांपैकी फारच थोडे गुन्हे उजेडात येतात. उच्चपदस्थांचा दबाव व दबदबा, लोकापवाद, पैशाचा वापर यामुळे फारच थोडय़ा उच्चपदस्थांच्या गुन्हय़ांविरुद्ध आवाज उठतो. ‘तहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांना नुकतीच महिला सहकर्मचा-याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही घटना ज्या वेळी घडली त्या वेळी त्याची माहिती त्या तरुणीने व्यवस्थापकीय संपादक शोमा चौधरी यांना दिली होती. मात्र, त्यांनी तेजपाल यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. तेजपाल यांनी मात्र, आपल्याकडील झालेल्या या ‘चुकी’बद्दल सहा महिन्यांसाठी राजीनामा देऊन स्वत:लाच शिक्षा करून घेण्याचे नाटक केले आणि हे प्रकरण उघडकीला येऊ नये, याची काळजी घेतली. प्रकरण उघडकीला आल्यानंतर तरुणीच्या संमतीनेच हे घडले, असा कांगावा केला. तसेच प्रकरण दडपण्यासाठी तरुणीच्या कुटुंबीयांवर दबावही आणला. मात्र, शेवटी त्यांना अटक झाली आणि त्यांची रवानगी पोलिस कोठडीत झाली. समाजातील व राजकीय क्षेत्रातील बडय़ा हस्तींचे बुरखे फाडण्यासाठी सरसावलेल्या व्यक्तींनी आपले पाय चिखलात किंवा दलदलीत बुडणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. पण दुस-यांची लफडी-कुलंगडी काढण्याच्या अभिनिवेशात व धुंदीत आपण काय करतो आहोत व आपला पाय कुठे घसरतो आहे, हे ही मंडळी पाहत नाहीत. अशी मंडळी आपल्याला हवे ते करण्याचा अधिकारच पोहोचतो, अशा मस्तीत वावरत असतात. ही मस्तीच त्यांच्या अंगलट येते. मग अशा व्यक्ती हा स्टंट आहे, कुभांड आहे, हितशत्रूंनी केलेले कारस्थान आहे, असा कांगावा करतात. तेजपाल यांनीही अटक टाळण्यासाठी दबाव टाकला आणि कायदेशीर पळवाटाही शोधल्या. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आणि पश्चिम बंगालच्या मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष ए. के. गांगुली यांच्याविरोधातही लैंगिक शोषण केल्याचा आरोप विद्यापीठातील एका प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनीने केला. ही बाब प्रकाशात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तीन न्यायाधीशांची समिती नेमली आणि त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यात प्रथमदर्शनीच गांगुली दोषी आढळले आहेत. मात्र, त्यांच्यावर पुढील कारवाई करणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाने सर्वोच्च स्थानी काम केलेल्या आणि मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष असलेल्या व्यक्तीला दोषी तर ठरवले. मात्र, न्यायालयाने पुढील कारवाई करायला नकार देणे, हे सर्वात जास्त धोकादायक वाटते. गांगुलींनीही मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांकडे माझ्या मुलांप्रमाणे पाहतो, असा कांगावा करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा कांगावा फार काळ टिकला नाही. ‘विप्रो’ कंपनीतील विपणन विभागाचे तत्कालीन प्रमुख फनीश मूर्ती यांच्यावर त्यांच्या महिला सहकर्मचा-याचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दोनदा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पदाचा दुरुपयोग करून लैंगिक शोषण करणा-या व्यक्ती पकडल्या गेल्या की, जे घडले ते सहमतीने घडले, असा कांगावा तरी करतात किंवा तो मी नव्हेच असेच भासवून न्यायालयाची दिशाभूल करतात. पूर्वीचे राजे-महाराजे तसेच सरंजामदार, संस्थानिक सर्वसामान्यांची पिळवणूक करत, महिलांवर बलात्कार करत. त्यांना शिक्षा करता येत नसे. मात्र, आज आपल्या पदाच्या जोरावर लैंगिक शोषण करणा-या प्रत्येकाला शिक्षा होऊ शकते. पदाच्या अहंकाराने ‘राजा’ बनलेल्या अशा विकृत मनोवृत्तीला आळा घालणे, आवश्यक आहे. कायदा, कायद्याची कठोर अंमलबजावणी होत असल्याचे पाहून आज अनेक पीडित तरुणींनी आपल्या तक्रारी नोंदवायला सुरुवात केली आहे. सरकारनेही बलात्कारविरोधी ‘निर्भया कायदा’, कामाच्या ठिकाणचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी विशाखा मार्गदर्शक तत्त्वे जारी करून महिलांना संरक्षण दिले आहे. उच्च पदावरील व्यक्ती या सुशिक्षित, कायद्याची, शिक्षेची माहिती असलेल्या आहेत. तेजपाल, माजी न्यायमूर्ती ए. के. गांगुली, फनीश मूर्ती ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे म्हणायला हवीत. त्यामुळे ज्यांना या कायद्याची, शिक्षेची माहिती आहे, अशा उच्च पदावरील व्यक्तींकडून होणारे लैंगिक शोषण हे जास्त धोकादायक आहे. आमिष दाखवून लैंगिक शोषण करणे तसेच कार्यालयातील किंवा कामानिमित्ताने भेटायला येणा-या महिलेचे, तरुणीचे लैंगिक शोषण करणे, बलात्कार करणे हे एखाद्या सराईत गुन्हेगाराच्या गुन्हय़ासारखेच कृत्य आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पूर्वनियोजित कट गुन्हेगार रचतो आणि लैंगिक शोषण करत असतो. म्हणून अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. पद, बढती, लग्न किंवा इतर अनेक आमिषे दाखवून महिला बधत नसेल तर तिचा अपमान करणे, तिचा पाणउतारा करणे, तिला नोकरी सोडण्यासाठी भाग पाडणे, असे प्रकारही केले जातात. तसेच नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी देऊन लैंगिक शोषण करणे, असे प्रकारही घडतात. त्यामुळे अशा उच्च पदावरील भक्ष्यकांवर कठोर कारवाई करून त्यांना जरब बसेल, अशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. दिल्लीनंतर आता मुंबईतही बलात्काराचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढले आहे. यात बलात्कार आणि सामूहिक बलात्काराचाही समावेश आहे. अशा प्रकरणांमध्ये योग्य ती कारवाई करून आरोपींना शिक्षाही होते. काही प्रकरणे जलदगती न्यायालयात दाखल करून तिथे त्यांचा निकाल लवकर दिला जातो. मात्र, उच्च पदावरील व्यक्तींची लैंगिक शोषणाची अनेक प्रकरणे उघडकीला येत नाहीत किंवा आली तरी असे खटले अनेक वर्षे प्रलंबित राहतात. तेजपालप्रमाणे अशा व्यक्ती साम, दाम, दंड, भेद वापरून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतात. मात्र, माध्यमे आणि समाजाच्या दबावामुळे हे शक्य होत नाही. अशा भक्ष्यकांना कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे.
[EPSB]
एका संघर्ष पर्वाचा अंत
दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपिता, गो-यांच्या वर्णद्वेषी आणि जुलमी राजवटीपासून देशाला मुक्त करण्यासाठी आयुष्यभर लढा देणारे झुंझार लढवय्ये व आपल्या मानवतावादी कार्याने सा-या जगाला आदरणीय असलेले एक महान व्यक्तिमत्त्व नेल्सन मंडेला यांनी गुरुवारी या जगाचा निरोप घेतला.
[/EPSB]