बहुतांश कामे अर्धवट स्थितीत, कारभाराबाबत साशंकता
वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालय प्रकाशगड-मुंबई येथून खासगी कंपनीला दुरुस्तीचा ठेका दिला असून सदर कंपनीचे कार्मचारी काम करत नाहीत. शिवाय स्थानिक अधिका-यांना जुमानत नसल्याने जिल्ह्यातील वीज वितरण कंपनीबाबत ग्राहकांनी संताप व्यक्त केला असून जिल्हय़ातील बरीच कामे अर्धवट स्थितीत पडून आहेत.
जिल्ह्यातील वीजवितरण संदर्भात संपूर्ण जीर्ण लाईन बदलून नवीन जोडणे, घरगुती वीज कनेक्शन देणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे व काही ट्रान्सफॉर्मची ताकद वाढविणे आदी विविध कामे वीजवितरणच्या मुख्य कार्यालयाकडून खासगी कंपनीला दिली आहेत. मात्र या कंपनीकडून वीज ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेळच नसल्याने वीजवितरणच्या कारभाराबाबत साशंकता निर्माण केली जात आहे. अधिका-यांना विचारल्यानंतर खासगी कंपनी काम करते असे सांगितले जाते. मात्र खासगी कंपनीशी ग्राहकांचा कोणताही संबंध येत नसल्याने ग्राहक त्यांना विचारू शकत नाहीत. वीजवितरण कंपनीकडे लाईटची बिले भरली जातात या कारणामुळे ज्या लोकांची कामे होत नाहीत, असे वीज ग्राहक संबंधित अधिका-यांना धारेवर धरतात. याबाबत लोकप्रतिनिधींनी आवाज उठविण्याची गरज आहे. कारण ज्या खासगी कंपनीला ठेका दिला जातो व तो ठेका मुख्य कार्यालयाकडून दिला जातो.
याबाबत आमदार खासदार यांनी लक्ष देण्याची खरी गरज आहे. सध्या संपूर्ण जिल्हय़ात वीजवितरणच्या कामाबाबत गोंधळ निर्माण झाला असून ग्राहकांकडून पैसे भरून घेऊनही त्यांना कनेक्शन मिळत नाही. तर काही ठिकाणी बंद पडलेली लाईट किंवा पोल पाडल्यानंतर त्याची दुरुस्ती तातडीने होत नसल्याने ग्राहकांच्या वीजवितरण विरोधात तक्रारी वाढल्या आहेत. या सर्व गोष्टींबाबत संबंधित कंपनीविरोधात कडक पावले उचलून कारवाई करणे भाग आहे. सध्या जिल्हय़ात वीजवितरणचा चाललेला सावळागोंधळ लक्षात घेऊन सर्व अधिका-यांची बैठक खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ विश्रामगृहावर घेतली होती. मात्र या बैठकीनंतर ज्या अधिका-यांना कामे दिली ती त्यांनी पूर्ण केली का? याबाबतचा पाठपुरावा खासदार साहेबांनी न घेतल्यामुळे जिल्हय़ातील वीजवितरणचा सावळागोंधळ चालू आहे. याबाबत शासन स्तरावर तातडीने कारवाई झाल्यास वीजवितरणची योग्य व सुटसुटीत अशी सुविधा ग्राहकांना मिळण्यास मदत होणार आहे.