आषाढ संपून श्रावणाचे वेध लागले की, विविध सणांची आखणी मनात सुरू होते. श्रावणातील उपवासापासून ते विविध नवनव्या पदार्थाच्या गोडव्यापर्यंत सारा बेतही आखून झालेला असतो.
श्रावणात बरसणा-या पावसाच्या सरी.. ऊन-पावसाचा खेळ, प्रजक्ताचा सडा, दरवळून उठणारं केतकीचं बन, सणासुदीच्या दिवसांनी निर्माण होणारं सात्त्विक वातावरण एकंदरच घर आणि परिसराला श्रावणी रूप देणारं ठरतं.
श्रावणी ऊनं सुखावतात मनाला, तसाच पाऊसही बहरवतो मनाला. निसर्गाचं नवं रूपही यावेळी अनुभवास मिळतं. श्रावणातील हिरवळीचा रंग न्याहाळतानाच ऊन-पावसाच्या खेळात नभात होणारी रंगांची उधळण, इंद्रधनूच्या नवलाईचे क्षण अंतरी ठसतात. जपली जाणारी सात्त्विकता ही मंदिरापासून घरापर्यंत भक्तिरसाचा नाद निर्माण करतो. सण, उत्सवांनी सजणारा श्रावण मनाला तितकाच भावणारा ठरतो.
श्रावणात जसं उपवासांचं महत्त्व आहे, तसंच घरात धार्मिक कार्यानादेखील तितकंच महत्त्व दिलं जातं. घरातील देवादिकांचे पूजन, दरवर्षी घरात होणारी श्रावणातील सत्यनारायणाची पूजा, मांसाहार वज्र्य करून हा महिना संपूर्ण शाकाहारी स्वरूपात त्याचे पालन केले जाते.
श्रावण म्हणजे भक्तिरसाने न्हाऊन निघालेला महिना, श्रावणात उमटणारे ग्रंथवाचनाचे सूरही पारंपरिक धार्मिक ग्रंथांची ओळख घडविणारे. देवादिकांच्या कथा, दैत्यांसोबत देवांची होणारी युद्ध आणि सत्याचा होणारा विजय यातूनच आजच्या आधुनिक युगाला काही ज्ञान मिळणारे ठरते. आधुनिक पिढीलाही यातून ग्रंथांची ओळख होऊन त्या काळातील कथांचा परामर्ष कळतो. गेल्या दोन दशकांपूर्वी घराघरात, गावांमध्ये ग्रंथवाचन केले जायचे आणि बहुतांशी वृद्धांसमवेत, तरुणाईचाही समावेश असायचा, आज थोडासा फरक दिसून येतो.
पण आजही काही घराण्याची परंपरा म्हणून ग्रंथवाचन हमखास केले जाते. नवनाथ भक्तिसार, हरिविजय, आदी ग्रंथांचे वाचन केले जायचे. आजही काही घरांमध्ये, मंदिराच्या ठिकाणी, तर ग्रुपमधून ग्रंथांचे वाचन केले जाते आणि काळ बदलला तरी आजही सात्त्विकतेने त्या ग्रंथांच श्रवण करण्यासाठी उपस्थिती दिसून येते. ग्रंथ वाचनाला प्रारंभ करण्यापूर्वी ‘रघुपती राघव राजाराम..’ आणि वाचन झाल्यानंतर ‘हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा..’ या भजनांचा घुमणारा सूर श्रावणाचं महत्त्व पावन करून टाकणारा असायचा.
श्रावणातील मंगळागौर म्हणजे स्त्रियांचा उत्साहाचा सण, मंगळागौर पूजनावेळी खेळल्या जाणा-या फुगडय़ा, मंगळागौरीची गाणी ही उत्साहाचं रूप जपणारी. श्रावण महिना हा अखंड उपवासाचा. प्रत्येकाच्या मनानुसार या उपवासांची आखणी असते. कुणी संपूर्ण महिनाही हा उपवास करतात, तर काहीजण ठरावीक वारांचे उपवास करतात. श्रावणी सोमवाराला उपवासाचे असणारे महत्त्व पाहता, शंकराच्या मंदिरात होणारी भक्तांची गर्दी पाहता, संपूर्ण श्रावण महिन्यात भक्तिरसाचा सूर जपताना दिसतो.
नागपंचमी, रक्षाबंधन आदी सणांना माहेरवाशिणींचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा ठरतो. फुगडय़ा, गाणी, घरात नांदणारा उत्साह, नात्यांचे जोडले जाणारे बंध आणि श्रावणी उत्साही वातावरणाबरोबरच भाद्रपद महिन्याचे लागलेले वेध हे श्री गणरायाच्या आगमनाची चाहुल देणारे ठरतात. एकंदरीतच श्रावणाचं नवं रूप अंतरी ठसणारं ठरतं.