मुंबईतील महालक्ष्मी परिसरात शक्ती मिल येथे छायाचित्रकार तरूणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना मुंबई सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
मुंबई- महालक्ष्मी येथील शक्ती मिलमध्ये छायाचित्रकार व टेलिफोन ऑपरेटर तरुणींवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी विजय जाधव, कासिम शेख आणि सलीम अन्सारी यांना सत्र न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. देशात पहिल्यांदाच कलम ३७६ (ई) अंतर्गत ही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
[poll id=”610″]
दरम्यान, छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील चौथा आरोपी सिराज खान याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सत्र न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी यांनी हा निकाल दिला.
शक्ती मिल परिसरात २२ ऑगस्ट २०१३ रोजी छायाचित्रकार तरुणीवर या तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. याच आरोपींनी जुलैमध्ये एका टेलिफोन ऑपरेटरवर बलात्कार केला होता. त्या प्रकरणी न्यायालयाने विजय जाधव, कासिम शेख, सलीम अन्सारी यांच्यासह अश्फाक शेख याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी अश्फाक शेख वगळता बाकी तिघांचा छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणातही सहभाग होता. त्यामुळे या तिघांना नवे कलम ३७६ (ई)अंतर्गत शिक्षा देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केली होती. तेव्हा, या कलमाअंतर्गत नव्याने आरोप ठेवण्यास सत्र न्यायालयाने परवानगी देत गुरुवारी न्यायालयाने या तिघांनाही ३७६ (ई) कलमाअंतर्गत दोषी ठरवले.
अखेर शुक्रवारी झालेल्या अंतिम युक्तिवादानंतर त्यांना फाशी सुनावण्यात आली. ज्या परिस्थितीत हा गुन्हा घडला त्याचा विचार करता आरोपींना अधिकाधिक शिक्षा म्हणून फाशीची मागणी निकम यांनी न्यायालयाकडे केली होती.
दोन सामूहिक बलात्कार प्रकरणी न्यायालयाने पाच जणांना दोषी ठरवले होते. त्यात सिराज खान याला छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दरम्यान दोन्ही गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या जाधव, खान आणि अन्सारी यांनी ३७६(ई) कलमाअंतर्गत दाखल केलेल्या नव्या आरोपांच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, त्या वेळी उच्च न्यायालयाने या प्रकरणी हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता.
या आरोपींसाठी फाशीची शिक्षाच योग्य आहे. बलात्कारातील पीडित तरुणी जिवंत असताना आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या निकालामुळे अपप्रवृत्तींना योग्य संदेश जाईल. – उज्ज्वल निकम, विशेष सरकारी वकील