शाश्वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल, असा गोल रिंगणाचा अनुपम्य सोहळा सदाशिवनगर शुक्रवारी झाला.
पंढरपूर- शाश्वत सुखाचा आनंद देणारा स्वर्गालाही लाजवेल, असा गोल रिंगणाचा अनुपम्य सोहळा सदाशिवनगर येथे शुक्रवारी झाला. सायंकाळी ढगाळ वातावरणात हा सोहळा माळशिरस मुक्कामी विसावला. शनिवारी हा पालखी सोहळा वेळापूरकडे मार्गस्थ होणार आहे.
नातेपुते येथे शुक्रवारी पहाटे सोहळा प्रमुख डॉ. शिवाजीराव मोहिते यांच्या हस्ते माऊलींची पूजा व आरती झाल्यानंतर सकाळी साडेसहा वाजता माऊलींसह लाखो वैष्णवभक्तांनी नातेपुते नगरीचा निरोप घेतला. सुमारे एक ते दीड लाखांच्या पायदळासह भागवत धर्माची पताका फडकावत श्री ज्ञानराज माऊलींच्या पालखी सोहळ्याने पहिल्या रिंगण सोहळ्यासाठी सदाशिवनगरकडे कूच केली. दुपारचा नैवेद्य आणि विश्रांतीसाठी हा सोहळा सकाळी नऊ वाजता मांडवे ओढा येथे पोहोचला. मांडवे ओढा येथे पालखी खांद्यावर घेऊन ती ओढयाच्या दुस-या काठावर आणण्यात आली.
त्यानंतर पालखी रथात ठेवून दुपारी १२ वाजता सोहळा सदाशिवनगरकडे मार्गस्थ झाला. पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवल्याने व वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवल्याने पालखी सोहळ्याला नातेपुते ते माळशिरस या वाटचालीत कोठेच अडचण आली नाही.
सादशिवनगर येथे श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात गोल रिंगणासाठी मैदान तयार करण्यात आले होते. सुरुवातील रथापुढील १ ते २७ दिंडया रिंगणात आल्या. त्यापाठोपाठ माऊलींची पालखी रिंगणात आणण्यात आली. रिंगणाला एक प्रदक्षिणा पूर्ण करून माऊलींची पालखी रिंगणाच्या मधोमध उभारण्यात आलेल्या शामियानात आली.
सदाशिवनगर येथील हा नेत्रदीपक रिंगण सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते. अश्वांची पूजा झाल्यानंतर जरीपटक्याच्या भोपळे दिंडीच्या ध्वजाने रिंगणाला २ प्रदक्षिणा पूर्ण केल्या. त्यानंतर चोपदारांनी अश्वांना रिंगण दाखवले. त्यानंतर स्वाराचा अश्व रिंगणासाठी सोडण्यात आला. त्याच्यापाठोपाठ माऊलींचा अश्व धावला आणि लाखो भाविकांनी माऊली.. माऊली.. नामाचा जयघोष सुरू केला. या जयजयकारातच हा रिंगण सोहळा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा अकलूजमध्ये प्रवेश
अकलूज येथील सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात देवाच्या व स्वाराच्या अश्वाने नेत्रदीपक दौड करून लाखो वारक-यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या निरा स्नान झाल्यानंतर सोहळा अकलूज मुक्कामाकडे मार्गस्थ झाला. सकाळी साडेनऊदरम्यान सोहळा गांधी चौक येथे पोहोचला. या वेळी खासदार विजयसिंह मोहिते -पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर सदाशिवराव माने विद्यालयाच्या वारकरी दिंडी समवेत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील दिंडय़ा सदाशिवराव माने महाविद्यालयाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. टाळ, मृदंगाचा गजर व हरिनामाच्या जयघोषात शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. शनिवारी हा सोहळा माळीनगरकडे मार्गस्थ होईल. माळीनगर येथे सोहळ्यातील उभे रिंगण होईल. त्यानंतर सोहळ्याचा बोरगाव येथे मुक्काम असेल.