भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे, तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
मुंबई – भारतीय जनता पक्षाने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू केली आहे. परंतु यावेळेस काँग्रेस नव्हे, तर शिवसेना पहिल्या क्रमांकाचा शत्रू असून लोकसभा निवडणूक शिवसेनेविरोधात लढण्याचा आदेश खुद्द अमित शाह यांनी भाजप नेत्यांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत ५४० जागा निवडून आणण्याचे लक्ष्य ठेवले असून सर्वांना १०० टक्के प्रयत्न करावाच लागणार असल्याची स्पष्ट ताकीद अमित शाह यांनी मुंबईच्या बैठकीत दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या बैठकीत अमित शहा यांनी सांगितले की, निवडणुकीसाठी काँग्रेसला शत्रू मानू नका. काँग्रेस आता कमजोर झाली आहे, तिला पुन्हा उभारी मिळण्याची शक्यता नाही. शिवसेना हाच आता आपला पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे. येणारी लोकसभा निवडणूक आपल्याला स्वबळावर लढवायची असून ५४० जागा हे आपले लक्ष्य आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागण्याचे आदेश शहा यांनी दिल्याचे या सूत्रांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आदींनी जबाबदारी निश्चित केली असून सर्वानी जनतेपर्यंत पोहोचविण्याची सूचना त्यांनी केली आहे. ब्लॉक लेव्हलला काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची विशिष्ट फळी तयार करण्यात आली असून त्यांच्यावर मतदारांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. मतदारांचे मत भाजपलाच पडेल यासाठी हे कार्यकर्ते काम करतील. या कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वेगळी यंत्रण निर्माण करण्यात आली असून राज्यातील घडामोडींचा दैनंदिन अहवाल पक्षाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात पाठविण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले.
अमित शहा यांनी सुचविलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी मुंबई १ नोव्हेंबरला बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक तीन दिवस चालणार असून यावेळी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्षांच्या कामकाजाचा स्वतंत्र आढावा घेण्यात येणार असल्याचेही सुत्रांनी स्पष्ट केले.