राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्या, आम्ही कोकण विकासाची जबाबदारी घेतो, तुम्ही फक्त पाठीशी राहा व डॉ. निलेश राणे यांना मतदान करा, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
चिपळूण- शिवसेनेच्या जन्माला ४८ वर्षे झाली. मात्र, मराठी तरुण आज बेकारच आहे. त्यांनी बेरोजगारी संपविण्यासाठी कोणता कार्यक्रम दिला? पोटाचा प्रश्न सोडविण्यासाठी काय केले? तरुणांच्या हातात फक्त दगड मारा.. आंदोलने करा आणि जेलमध्ये जा व अंगावर खटले घ्या, एवढेच यांनी शिकवले. यामुळे केवळ ‘मातोश्री’चा विकास झाला, तरुणांचा नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून धर्मनिरपेक्ष कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला साथ द्या, आम्ही कोकण विकासाची जबाबदारी घेतो, तुम्ही फक्त पाठीशी राहा व डॉ. निलेश राणे यांना मतदान करा, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी चिपळूण तालुक्यातील दसपटीमधील आकले येथील प्रचारसभेत केले.
राणे यांनी रविवारी चिपळूण तालुक्याचा दौरा केला. या वेळी दसपटीची कुलस्वामिनी श्री रामवरदायिनी देवीचे दर्शन घेतले. यानंतर आकले येथील प्रचारसभेत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
राणे म्हणाले, विरोधकांकडे विकासाचा मुद्दाच नाही. त्यांच्याकडे काहीही सांगण्यासारखे नाही. कोणतेही विकासकाम नाही. काय केले.. काय करतो आहोत आणि काय करणार? हे सांगण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे विरोधकांचे फक्त राणे, सोनिया गांधी, शरद पवार हेच टार्गेट आहेत. त्यांचे कोकणसाठी योगदान काय? हे आधी सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे आम्ही विकासाला निधी देऊ शकतो, जनतेचे प्रश्न सोडवू शकतो. सेना जन्माला येऊन ४८ वर्षे झाली. मात्र, त्यांनी मराठी माणसासाठी काय केले? मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेला आहे. याला जबाबदार कोण? यांनी गिरण्या विकू देणार नाही म्हणता-म्हणता गिरण्या बंद झाल्या. त्यांच्या जमिनी विकल्या. लोक गावी आले. मात्र, गावात करणार काय? अशी अवस्था कोणी केली? विरोधकांनी मराठी माणसाच्या प्रगतीचा कार्यक्रम घेतला नाही. मात्र, आपण गेली २५ वर्षे कोकणच्या राजकारणात आहोत. अनेक योजना कोकणात आणल्या. कोकणचे दारिद्रय़ संपविण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत, असे उद्योगमंत्र्यांनी सांगितले.
विरोधी उमेदवार कधी कोकणात आले काय? फयान, पूर अशा संकटाच्या वेळी ते होते कुठे? त्यांनी येथील जनतेला मदत केली का? आता नुसती मते मागण्यासाठी वणवण भटकत आहेत. यांचे विकासात योगदान नाही. त्यामुळे अशांचा विचार करायचा नाही. सेनेला कोकणातून हद्दपार केल्याशिवाय विकास होणार नाही, असेही राणे म्हणाले.
गुजरातमध्ये दंगली झाल्या, ट्रेन पेटवली. एका काँग्रेस खासदाराला सहकुटुंब जाळले. मात्र, मोदीने या कुटुंबाचे साधे सांत्वनही केले नाही. असे उमेदवार पंतप्रधानपदासाठी आहेत. ४५ वर्षानी त्यांना पत्नीची आठवण झाली. मग कसली महिला सुरक्षा? आणि जनतेची आठवण, असा सवाल उपस्थित करताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
इकोसेन्सेटिव्ह झोनबाबत बोलताना ते म्हणाले की, सेनेचे माजी खासदार सुरेश प्रभु यांचेच हे पाप आहे. त्यामुळे या विषयावर विरोधक बोलत नाहीत. या झोनमुळे कोकण विकासाला खिळ बसणार आहे. या विरोधात खा. डॉ. निलेश राणेंनी आवाज उठविला, आंदोलन केले. लोकसभेसाठी उभे असलेले विरोधी उमेदवार लायक नाहीत. त्यांची पात्रता नाही, त्यामुळे ते पराभवाची हॅटट्रीक करतील व डिपॉझिट जप्त होईल. त्यांची पात्रता व गुणवत्ता पाहा आणि योग्य निर्णय घ्या, असे आवाहन केले. या सभेला व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत, खासदार डॉ. निलेश राणे, आ. निरंजन डावखरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश कीर, जि.प. अध्यक्षा मनीषा जाधव, कुणबी सेनेचे दादा बैकर, अशोक कदम, दादा साळवी, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते आदी मान्यवर उपस्थित होते.
‘शिवसेनेला हद्दपार करण्याचा संकल्प’
पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच आता यापुढील निवडणुका आघाडीच्या माध्यमातूनच लढवायच्या आहेत. जर एकत्र लढलो तर विरोधकांचे पाचही लोकप्रतिनिधी दिसणार नाहीत. त्यामुळे सेना हद्दपार करण्याचा आपण संकल्प करूया. सर्वानी हातात हात घालून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचेच काम करायचे आहे. सावंतवाडी येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे डॉ. निलेश राणेंना आशीर्वाद देण्यासाठी आले होते. धाडसी व तरुणांचे नेतृत्व करणारे डॉ. निलेश राणे यांनाच जनतेने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. विरोधक आघाडीमध्ये कसे साप सोडू शकतात याचे उदाहरण सर्वाना रत्नागिरीत दिसले. या प्रसंगावरून अनेकांनी अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. पक्षाध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाप्रमाणे आघाडीचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांना मतदान करा आणि मोठय़ा मताधिक्याने विजयी करून धर्मनिरपेक्ष उमेदवारालाच साथ द्या, असे आवाहन सामंत यांनी केले.
‘विरोधक लोकांना भडकावताहेत’
खासदार डॉ. राणे म्हणाले की, या आधी आपण सर्वानी आशीर्वाद देऊन देशाच्या सर्वोच्च सभागृहात आपल्याला पाठवलेत आणि काम करण्याची संधी दिलीत, त्यामुळेच दसपटीसारख्या भागात पंतप्रधान ग्रामसडक योजना, राष्ट्रीय पेयजल यांसारखी विकासकामे करता आली. असुर्डे येथे रेल्वेविरोधात आंदोलन केले. आता कोकण रेल्वेचे दुपदरीकरण आणि विद्युतीकरण होणार आहे. तसेच अनेक प्रश्न मार्गी लागत आहेत. कोकणात राज्यराणी एक्स्प्रेसही आपण केलेल्या आंदोलनामुळे सुरू झाली. आपण दिल्लीत गेलो. पण तेथील नुसते राजकारणात करण्यातच रमलो नाही तर येथील जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना विकास दिसत नाही. दसपटीमध्ये विरोधी उमेदवार कधी दिसले नाहीत. मात्र, आता ते मते मागण्यासाठी आता फिरत आहेत. त्यांना गेली पाच वर्षे कुठे होतात, हा प्रश्न विचारा. धर्माच्या तसेच जातीच्या नावावर ते लोकांना भडकावत आहेत. आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पक्षाची स्थापना केली, त्या पक्षावर आज कॉर्नरसभा घेण्याची वेळ आली आहे. याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत येथील माता-भगिनींनी मतदान करून आपणाला आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन खासदार डॉ. निलेश राणे यांनी केले.