मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत सतत काहीना काही नवीन घडत असतं. अनेक नव्या विषयांवरचे आव्हानात्मक चित्रपट येत असतात.
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीत सतत काहीना काही नवीन घडत असतं. अनेक नव्या विषयांवरचे आव्हानात्मक चित्रपट येत असतात. हे कार्य निरंतर सुरू असतं. भूतकाळातही असं चांगलं काम झालेलं आहे. जग हे एका चाकावर चालत असतं.
आजची म्हणजे वर्तमानातील गोष्ट भूतकाळात जाते. कालांतराने भूतकाळातून तीच गोष्ट पुन्हा वर्तमानाच्या रूपाने पुन्हा येत असते. चित्रपटांच्या बाबतीतही हेच सुरू असतं.
त्यामुळे अनेक जुन्या चित्रपटांचे एक तर पुढचे भाग बनतात किंवा त्या चित्रपटातल्या पात्रांच्या भोवती नवी कथा विणून तोच चित्रपट पुन्हा आपल्या भेटीला येतो. यातच आजच्या काळात फ्रँचायझी हा एक नवा प्रकारही अस्तित्वात आला आहे. गाजलेल्या चित्रकृतीच्या नावाचा दुसरा चित्रपट.
आजपासून साधारण अकरा वर्षापूर्वी ‘अगं बाई अरेच्चा’ हा चित्रपट आला होता. केदार शिंदे यांचा हा पहिलाच चित्रपट. त्याआधी केदार शिंदे यांच्या अनेक कलाकृती गाजल्या होत्या.
चित्रपट माध्यमात त्यांचं ते पहिलंच धाडस होतं. त्यावेळी केदार शिंदे यांचा आत्मविश्वास जबरदस्त होता. त्याच आत्मविश्वासाचं प्रतीक असलेला ‘अगं बाई अरेच्चा’ हा चित्रपट तुफान गाजला. त्या चित्रपटाने मराठी चित्रपटांना थेट व्यवसायाचं एक नवं दालन उघडून दिलं होतं.
या चित्रपटात सर्वकाही होतं. एक चांगली कथा होती. मांडणीत ताजेपणा होता. सुरेख फोटोग्राफी होती. त्याला जोड होती ती अजय-अतुल यांच्या सुरेख संगीताची. ‘अगं बाई अरेच्चा’ हा चित्रपट म्हणूनच गाजला, त्याचा दिग्दर्शक मोठा झाला.
मुख्य अभिनेता संजय नार्वेकर हा त्यानंतर मराठीतला ‘सुपरस्टार’ बनला. संगीतकार अजय-अतुल मोठे संगीतकार झाले. त्याच बरोबर मराठीत ‘आयटम साँग’ची फॅशन सुरू झाली. त्यानंतर अनेक आयटम साँग आली तरी ‘अगं बाई’मधील ‘छम छम करता है ये..’ या गाण्याची सर कुणाला येणार नाही.
‘अगं बाई अरेच्चा’ या चित्रपटाविषयी हे सारं काही आठवण्याचं कारण म्हणजे दिग्दर्शक केदार शिंदे हे या चित्रपटाचा दुसरा भाग घेऊन येत आहेत. ‘अगं बाई अरेच्चा-२’ या नावाने येणा-या चित्रपटाची कथा मात्र वेगळी आहे. तीही एका इतिहासाच्या पानावरून घेण्यात आली आहे. मात्र गुपित हे गुपित राहिलेलेच बरं.
या चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात तर केदारने जबरदस्त केली आहे. या निमित्ताने त्याने अनेक मान्यवरांचा सत्कार केला. ‘अगं बाई अरेच्चा’चा नायक हा महिलांच्या मनातलं ओळखू शकत असतो.
तोच धागा पकडून केदारने यावेळी विविध क्षेत्रांत काम करणा-या प्रतिभावंत महिलांच्या हस्ते अनेक अभिनेत्रींचा सत्कार केला. सुलोचना दीदींच्या सत्काराने या सोहळयाची उंची वाढली. यावेळी उपस्थितांनी त्यांना उभं राहून मानवंदना दिली.
केदारच्या ‘अगं बाई अरेच्चा-२’ची कथा एका स्त्रीभोवती फिरणारी आहे. कोकणातल्या एका मुलीच्या आयुष्याची सुरेख कथा यात मांडण्यात आली आहे. ही भूमिका केलीय सोनाली कुलकर्णी हिने. आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका केलेल्या सोनालीसाठीही हा चित्रपट फारच महत्त्वाचा आहे.
‘डॉ. प्रकाश आमटे’ चित्रपटातल्या मंदाताईंच्या भूमिकेनंतर सोनालीचा हा एक वेगळा प्रयत्न आहे, यात शंका नाही. सोनाली कुलकर्णीसह चारुशिला साबळे, ..आदी कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र फिरोदिया यांनी केली आहे.
प्रसिद्धीपूर्व कार्यक्रमादरम्यान आगामी चित्रपटाच्या सहा पोस्टर व गाण्यांचंही लाँचिंग करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता सचिन पिळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.