आपण पैसे कमवण्यासाठी खूप मेहनत करतो. मात्र आपण कमावलेले पैसे व्यवस्थित गुंतवण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. कोणाच्या तरी सांगण्यावरून आपण निर्णय घेत असतो. त्यातूनच अनेक जणांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होत असते. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ साचवल्यास आपल्या खात्यात खूप रक्कम जमा होऊ शकते. भल्यामोठय़ा रकमांच्या मागे धावण्यापेक्षा छोटीछोटी गुंतवणूक आपल्याला लाभदायक ठरू शकते. त्यामुळे शिस्तबद्ध गुंतवणुकीची सवय आपण पहिल्यापासून लावायला हवी.
मंडळी, मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे, ते आहेत अनुभवाचे बोल आणि तेसुद्धा सर्वाच्या परिचयाच्या पोस्ट व बँक यामधील गुंतवणुकीशी संबंधित. शेअर बाजार, म्युच्युअल फंड यामध्येसुद्धा शिस्तबद्ध गुंतवणूक करून पैसे कमावता येतात, पण तो विषय नंतर कधीतरी. सध्या आपण पारंपरिक पद्धतीने शिस्तबद्ध गुंतवणूक कशी करता येईल ते पाहू. कारण ही गुंतवणूक करणे अत्यंत सोपी आणि सुलभ आहे.
सर्वप्रथम तुमचे मासिक अंदाजपत्रक आखा. म्हणजेच तुम्हाला दर महिन्याला मिळणारे मासिक उत्पन्न, मासिक खर्च आणि त्यातून उरणारी शिल्लक. ही शिल्लक नेहमीच कमी-जास्ती होत असते, पण तरीही काही किमान ठराविक शिल्लक असतेच. याच किमान शिलकीवर आपण लक्ष केंद्रित करू या.
बँका किंवा पोस्ट येथे तुम्ही रु. १०० इतक्या छोटया रकमेपासून गुंतवणूक करू शकता. उदाहरणार्थ आवर्ती जमा योजना, म्हणजेच रिकिरग डिपॉझिट. हे खाते एक वर्षापासून दहा वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी उघडता येते. दर महिन्याला रु. १०० रक्कम त्या कालावधीसाठी भरल्यास मुदत संपल्यानंतर व्याजासकट चांगली रक्कम हातात पडते. समजा तुम्हाला एक छान, गोड, छोटी १ वर्ष वयाची मुलगी आहे. जरी ती सज्ञान नसली, तरी तिचे पालक म्हणून तुम्ही तिच्या नावे हे खाते उघडू शकता. तिच्या शिक्षणाचा खरा खर्च सुरू होईल तोवर ती ९वीत गेल्यावर (१० वीची तयारी), म्हणजेच साधारण १४ वर्षाची झाल्यावर. त्यामुळे हे खाते दहा वर्षासाठी उघडावे. मुदतपूर्तीनंतर (मुद्दलाची १२० महिने गुणिले रु.१०० म्हणजे) रु. १२,००० अधिक चालू दराने लागू असलेले व्याज मिळून सुमारे
रु. १९,००० इतकी रक्कम तुमच्या हातात येईल. ती खर्च न करता तशीच्या तशीच तिच्या नावे तीन वर्षासाठी मुदत ठेवीमध्ये गुंतवा आणि या ठेवीवरील व्याज एकदम मुदतपूर्तीनंतर घ्या. आजच्या व्याजदरांच्या हिशोबाने तुम्हाला जवळपास रु. २४,००० मिळतील. दर महिन्याला किती रक्कम रिकिरग खात्यात टाकावी हे प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे ठरवावे. तसेच गरजेनुसार कालावधी कमी-अधिक करावा. ही रक्कम दर महिन्याला आपल्या बचत खात्यातून रिकिरग खात्यात वर्ग करण्यासाठी त्या बँकेस अथवा पोस्टाला तशी सूचना द्यावी म्हणजे विसरण्याची भीती नाही.
काही बँकांमध्ये अशी सुविधा आहे की त्यांच्याकडे उघडलेल्या रिकिरग खात्यात आपण दर महिन्याला किमान ठराविक रकमेबरोबरच काही जास्तीची रक्कमसुद्धा भरू शकतो. म्हणजे, समजा दर महिन्याला किमान रु. १०० नक्कीच भरता येत असतील, तर रु. १०० ही मूळ मासिक जमा असते; एखाद्या महिन्यात काही कारणाने जास्ती पैसे मिळाले, तर ही जास्तीची रक्कम आपण सदर खात्यात भरू शकतो. एक थोडा वेगळा प्रकार म्हणजे रिकिरग खाते एक वर्षासाठी उघडावे आणि मुदतीनंतर येणारी रक्कम आपल्या आवश्यकतेनुसार असलेल्या मुदतीसाठी मुदत ठेवीत ठेवावी. हे चक्र दरवर्षी जमेल तितकी वष्रे चालू ठेवावे. आपल्याला गरज भासेल तेव्हा एकरकमी निधी उपलब्ध होतो.
दिवाळीचा बोनस, नवीन वेतन करार झाल्यावर मिळणारी थकबाकी, अशासारखी मोठी रक्कम मिळाली की खरेदीसाठी आवश्यक असलेली रक्कम बाजूला ठेवून उर्वरित रक्कम अल्प मुदतीच्या ठेवीत ठेवावी. एव्हढेच कशाला, बचत खात्यात जर मोठी शिल्लकअसेल आणि त्या पैशांची लगेच आवश्यकता नसेल, तर त्यातील काही रक्कम अल्पमुदत ठेवीमध्ये वर्ग करावी. बँका अगदी सात दिवसासाठीसुद्धा अल्प मुदतीच्या ठेवी स्वीकारतात आणि त्यावरील व्याज हे बचत खात्यावर मिळणा-या व्याजापेक्षा जास्त असते. तुम्ही जर इंटरनेट बँकिंगची सुविधा वापरत असाल, तर या गोष्टी अगदी घरबसल्यासुद्धा ‘मॅनेज’ करता येतात.
कर वाचवण्यासाठी तुम्ही राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात गुंतवणूक केली असेलच. यातसुद्धा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करता येते. जशी काही रक्कम रिकिरगमध्ये, तशीच दर महिन्याला काही ठराविक रक्कम ठरउ मध्ये गुंतवावी. सध्या ठरउ च्या दोन मालिका चालू आहेत. ८ वी मालिका पाच वर्षाची असून तिच्यात गुंतवलेले रु. १०० मुदतपूर्तीनंतर रु. १५१.६२ होतात. ९ वी मालिका दहा वर्षाची असून तिच्यात गुंतवलेले रु.१०० मुदतपूर्तीनंतर रु.२३६.६० होतात. ८व्या मालिकेत दर महिन्याला समजा एक हजार रुपये गुंतवले, तर पाच वर्षानी प्रत्येक महिन्याला त्याचे रु. १,५१६.२० मिळतील. या रकमेपैकी रु. २,५०० परत /फठरउ मध्ये गुंतवावेत. कारण पाच वर्षानंतर आपल्या खिशातून काहीच जात नाही, उलट मिळणारी पूर्ण रक्कम परत गुंतवली जाते. हे चक्र शिस्तबद्ध पद्धतीने पाळले, तर नोकरी / व्यवसायातून निवृत्त झाल्यावर ठरउ ची रक्कम परत गुंतवण्याऐवजी परत घ्यायला सुरुवात करावी. दर महिन्याला मिळणारी ठराविक रक्कम हे एक प्रकारचे पेन्शनच झाले, नाही का? जे तरुण असतील आणि ज्यांना दहा वर्षाचे चक्र पाळता येणे शक्य असेल, त्यांनी ९व्या मालिकेमध्ये पैसे गुंतवावेत.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी हासुद्धा एक आकर्षक पर्याय आहे. पोस्टाप्रमाणेच बँकांमध्येही हे खाते उघडता येते, अगदी आपल्या अज्ञान मुलांच्या नावेसुद्धा. या खात्याची मुदत १५ वष्रे इतकी ठरलेली असते व ती पूर्ण व्हायच्या आधी अर्ज करून परत पाच वर्षासाठी वाढवता येते. या खात्यात दरवर्षी किमान रु. १००० भरण्याची शिस्त पाळावी लागते, अन्यथा दंड होतो. यावर मिळणारे व्याज त्याच खात्यात वर्षातून एकदा जमा होते आणि ते करमुक्त आहे. तुम्ही करदाते असलात तर याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. मात्र यात पैसे भरणे, पैसे काढणे, याबद्दलचे नियम काहीसे क्लिष्ट आहेत, ते नीट समजावून घ्यावेत. ही योजना अत्यंत चांगली व चक्रवाढ व्याज देणारी आहे. याच रक्कमेतून तुम्हाला मोठय़ाप्रमाणावर भविष्यासाठी निधी उभारता येऊ शकतो.
या व्यतिरिक्त तुम्हाला काही वेगळ्या कल्पना सुचत असतील तर त्या अंमलात आणा आणि आम्हालाही कळवा. मात्र पुढील काही गोष्टी करायला विसरू नका, त्या म्हणजे खाते जोडीदारासह उघडा, वारसदाराच्या नावाची नोंद बँकेकडून / पोस्टाकडून करून घ्या आणि या सर्वाची एक नोंदवही ठेवा. त्यात या गुंतवणुकीची संपूर्ण माहिती देय दिनांकासकट लिहा. महिन्यातून एकदा तरी या सर्व नोंदींचा आढावा घ्या. जिथे लागू असेल, तिथे व्याज वेळच्या वेळी मिळत आहे किंवा नाही ते तपासा, पासबुक नियमितपणे भरून घ्या. तुमच्याकडे मोबाईल असेलच. ज्या ठेवींची मुदत संपत आली आहे, ती लावून ठेवा आणि वेळच्यावेळी या ठेवींचे काय करायचे तो निर्णय घ्या. तुमच्या अंदाजपत्रकानुसार शिस्तबद्ध गुंतवणुकीचे वेळापत्रक आखा आणि ते तितक्याच शिस्तीने पाळा. लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होईल.