हाय मित्रांनो, ‘हॅप्पी श्रावण’! आश्चर्य वाटलं का, अशा शुभेच्छा वाचून? पण आपला ‘श्रावण महिना’ सगळ्यांना हॅपी करणाराच आहे की! श्रावण महिना उजाडेपर्यंत पावसात मनसोक्त भिजून झालेलं आहे. ऊन-पावसाचा सुरू झालेला खेळसुद्धा आपला मूड एकदम फ्रेश करून टाकतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणात सुरू झालेली सणांची रेलचेल! छान छान कपडे घालणं, गोडाधोडाचं जेवण हे सगळं अनुभवण्याची संधी आपल्याला ‘श्रावण’ महिन्यामुळेच मिळते. या श्रावणात येणा-या सणांविषयी ही रंजक माहिती.
सामान्यत – श्रावणातला पहिला सण येतो तो नागपंचमी. या सणाला स्त्रिया नागोबाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात. नागपंचमीच्या दिवशी आईने वेगवेगळ्या कथा वाचलेल्या तुम्ही ऐकल्या असतील. या कथा काय बोध देतात? ‘नागाची पूजा का केली जाते?’ पावसाळ्यात नागाचं घर पाण्याने भरतं. त्यामुळे नाग गावात येतात. भारतीय संस्कृतीत घरी आलेल्या पाहुण्याबाबत ‘अतिथी देवो भव:’ असं म्हटलं जातं. म्हणजेच अतिथी हा देवासमान असतो. त्यामुळे या स्त्रिया घरी आलेल्या नागोबाची मनोभावे पूजा करतात. शिवाय आपल्या भारतात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. उंदीर, घूस हे उपद्रवी प्राणी अनेकदा शेताची नासाडी करतात. पण नाग मात्र या कीटकांपासून शेताचं संरक्षण करतात. मग आपल्या व्यवसायाचं रक्षण करणा-या आपल्या या मित्राचं आणि त्याच्या माणसाला उपयुक्त ठरणा-या गुणांचं पूजन करायला नको का?
श्रावणी अमावस्या म्हणजेच बैलपोळा हा सण. काही ठिकाणी या सणाला ‘बेंदूर’ असंही म्हणतात. मोहेंजोदडोमध्ये उत्खननाच्या वेळीही बैलाची चित्रं-शिल्प सापडली आहेत. त्यामुळे भारतात फार पूर्वीपासून बैलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे, असं दिसून येतं. शेतकरी हा सण मोठया उत्साहात साजरा करतात. बैलांना तेल लावतात, त्यांना सजवतात, त्यांची पूजा करतात. या दिवशी बैलांना खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. संध्याकाळी वाजंत्री बोलावून त्यांची मिरवणूक काढली जाते. आजही शेतक-यांच्या जीवनात बैलाचं फार मोठं स्थान आहे. शेतीच्या सर्वच कामांत शेतक-याला त्याची मदत होत असते. त्यामुळे या दिवशी त्याला विश्रांती देणे, त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे यासाठी हा सण साजरा केला जातो. आपल्याला ज्या गोष्टींची मदत होते, त्या गोष्टींबाबत ऋणी राहावं, ही शिकवण आपल्याला बैलपोळा हा सण देतो.
श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे आपल्यासारख्या धम्माल पोरांसाठी एक सुवर्णसंधीच असते. ‘गोविंदा रे गोपाळा’ म्हणत तुम्हीही या दहीहंडीत सामील होत असाल. पण दोस्तांनो, श्रीकृष्णाच्या खोडकरपणाच्या अनेक कथा आपण ऐकल्या असल्या तरी तो अनेक चांगल्या गुणांसाठीही तो ओळखला जात असे. श्रीकृष्ण हा एक कुशल राजनीतिज्ञ होता, अतिशय हुशार विचारवंत होता. आपल्या समाजाची तो उत्तम काळजी घेत असे, तो कर्तव्यदक्ष होता, अन्याय सहन न करणारा, दुर्जनांचा नाश करणारा होता. अशा सर्वगुणसंपन्न श्रीकृष्णाचे हे गुण आपल्याही अंगी यावेत, यासाठी आपण श्रीकृष्णाकडून प्रेरणा घेतली पाहिजे.
‘रक्षा करणे’ म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संरक्षणाची जबाबदारी घेणे. ‘राखी’ या प्रतीकाद्वारे भाऊ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारतो. यामागे आपुलकीची, प्रेमाची, कल्याणाची भावना असते. प्राचीन काळी रजपूत स्त्रिया मोठया धैर्याने युद्धप्रसंगी शत्रूच्या छावणीत जात आणि आपल्या पती, भावाविरोधात युद्ध करणा-या सैनिकांना आपला भाऊ मानून राखी बांधत. त्यामुळे युद्धप्रसंग टळत. आज आपण ‘रक्षाबंधन’ सण साजरा करत असतानाच स्वत:सुद्धा स्वत:च्या रक्षणाची जबाबदारी घ्यायला हवी. जेणेकरून लहान-मोठया कोणत्याही संकटात आपण स्वत:चं रक्षण करू शकू. रक्षाबंधनाच्या दिवशी किंवा त्याच्या दुस-या दिवशी नारळीपौर्णिमेचा सण असतो. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करून मासेमारीसाठी आपल्या होडया पुन्हा समुद्रात सोडतात.