प्रादेशिक वाद व संकुचितपणाला येथे थारा नसल्यानेच एकसंघपणासाठी महाराष्ट्र संपूर्ण देशासमोर आदर्श असल्याचे ठाम मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
मुंबई- दुष्काळातून सावरत असताना राज्यावर अतिवृष्टीचे संकट ओढवले. विदर्भासह राज्याच्या इतर भागांत पावसाने थैमान घातले आहे. या कठिण प्रसंगी तात्कालिक व कायमस्वरूपी योजना आखण्यात येत आहेत. महाराष्ट्र हा प्रत्येक संकटाला एकसंघपणे सामोरा गेला आहे. प्रादेशिक वाद व संकुचितपणाला येथे थारा नसल्यानेच एकसंघपणासाठी महाराष्ट्र संपूर्ण देशासमोर आदर्श असल्याचे ठाम मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काढले.
स्वातंत्र्याच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयाच्या प्रांगणातील ध्वजवंदनानंतर जनतेला संदेश देताना ते बोलत होते. आपल्या भाषणाच प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी आयएनएस सिंधुरक्षकच्या दुर्घटनेबद्दल संवेदना व्यक्त करत, गरज भासल्यास नौदलाच्या मदतीसाठी राज्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले.
नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला असो वा राज्याचा विकास यासाठी प्रत्येक निर्णयामागे मानवी चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुनियोजित नागरिकरण, शिक्षणाचा दर्जा वाढवणे, राज्य पाणी टंचाईमुक्त करणे, कोरडवाहू शेतीचे शाश्वत शेतीत रूपांतर व संतुलित औद्योगिक विकास यांना प्राधान्य देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मागील चार वर्षात मुंबईत पायाभूत विकासासाठी सर्वाधिक कामे झाली. यंदा पाच हजार कोटींचे प्रकल्प पूर्ण होणार आहेत. आर्थिक क्षेत्रात मंदीच्या छायेतून बाहेर येण्यासाठी उद्योग-व्यवसायांचा विकास व कायमस्वरूपी रोजगारनिमिर्तीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नव्या औद्योगिक व वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी करून ते साध्य करता येणार आहे. उद्योगधंदे व शेतीसाठी आवश्यक वीज पुरेशी व अखंडितपणे देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या वेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, महापौर सुनील प्रभू, मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल, मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह, तिन्ही दलांचे वरिष्ठ अधिकारी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी व कमर्चारी उपस्थित होते.