श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांची सध्या भीषण दुष्काळाशी झुंज सुरू आहे. आपल्या डाळिंबाच्या फळबागा जगवण्यासाठी शेतक-यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.
श्रीगोंदा- श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांची सध्या भीषण दुष्काळाशी झुंज सुरू आहे. आपल्या डाळिंबाच्या फळबागा जगवण्यासाठी शेतक-यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत. डाळिंब बागा जगवण्यासाठी शेतकरी टँकर विकत घेत असून, तेही खूप दूरवरून पाणी घ्यावे लागत असल्याने शेतक-यांना मोठा खर्च करावा लागत आहे. या पावसाळ्यात पाऊस न झाल्यास शेतक-यांना फळबागा पाण्याअभावी सोडून द्याव्या लागणार आहेत.
श्रीगोंदा तालुक्यात गेल्या अनेक वर्षापासून पुरेसा पाऊस न झाल्याने अनेक गावे दुष्काळाचा सामना करत असून, येथे भीषण पाणीटंचाई आहे. पिण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या पूर्ण परिसरात अंदाजे २०० हेक्टरच्या वर डाळिंबाच्या फळबागा असून; शेतक-यांनी मोठय़ा आशेने डाळिंबाचे पीक घेतले आहे. या फळबागांच्या उभारणीसाठी शेतक-यांनी लाखो रुपये खर्च केले असून, तीन-चार वर्षापासून पाऊस होत नसल्याने शेतक-यांना या डाळिंबाच्या फळबागांना टँकरने पाणी आणून ते ठिबक सिंचनाद्वारे द्यावे लागत आहे.
अनेक शेतक-यांनी कर्ज घेऊन स्वत:चे टँकर विकत घेतले आहेत. त्यासाठी लाखो रुपयांच्या डिझेलचा खर्च करावा लागत आहे. विविध ठिकाणांहून शेतकरी पाणी आणत असून शेतक-यांच्या खासगी विहिरीवर जावे लागत असून टँकर भरण्यासाठी ३०० ते ६०० रुपये द्यावे लागत आहेत. तसेच काही शेतकरी १०ते १२ हजार लिटरचा टँकर १५०० ते ३००० रुपयांना विकत घेत आहेत. यामुळे फळबागांचा उत्पादन खर्च वाढत आहे. अनेक शेतक-यांच्या बागांतील फळे सध्या काढणीला असून; डाळिंबाला पुरेसा भाव नसल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहेत.
केवळ २५ ते ३० रुपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. दरम्यान, अनेक भागात डाळिंब शेती उत्पादकांना भाव मिळत नसल्याने आर्थिकदृष्टय़ा तोटय़ात चालली आहे. त्यातच आता डाळिंब जगवण्यासाठी शेतक-यांना टँकरचा आधार घेण्यासाठी धडपड करावी लागत असल्याने उत्पादन खर्चात वाढ सुरूच आहे. मात्र डाळिंबाला अजूनही पाहिजे, तसा भाव मार्केटमध्ये मिळत नसल्याने डाळिंब उत्पादक चिंताग्रस्त आहे. सध्या डाळिंब शेती या भागात मोठय़ा प्रमाणावर आहे.
अनेक शेतक-यांनी डाळिंब बाग जगवण्यासाठी मेहनतीपासून केलेला खर्च विचार करायला भाग पाडणारा आहे. शेतक-यांनी डाळिंब बागा केल्या आहेत; परंतु हमीभाव मिळत नसल्याने डॉलर म्हणून ओळखले जाणारे डाळिंब शेतक-यांना न परवडणारे बनले आहे.
फळबागा झाल्या सरपण!
पाण्याअभावी अनेक शेतक-यांच्या फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. बागायती पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने वाढत्या उन्हामुळे झाडे शेवटच्या घटका मोजत आहेत. त्यांना जगवण्यासाठी शेतकरी उन्हाची तमा न बाळगता शेतातच ठाण मांडून शर्थीची झुंज देत आहेत.
वडवाळी येथील शेतकरी युवराज औटे, पांडुरंग जाधव, बबन बाबर यांच्यासह इतरांनी बागायती पीक घेऊन, मोसंबीची लागवड केली होती. ती पूर्णत: वाळून गेल्याने सरपण म्हणून विक्रीसाठी बाजारात नेण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.