राजीव शुक्ला यांच्यानंतर गोवा, आसाम क्रिकेट मंडळानेही श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
नवी दिल्ली – आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी बुधवारी बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन यांना राजीनामा देण्यासाठी दबाव टाकल्यानंतर आता गोवा आणि आसाम क्रिकेट बोर्डानेही त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे.
आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी माझ्यावर कोणताही दबाव नाही. बीसीसीआय माझ्यापाठी मागे उभ आहे असा दावा श्रीनिवासन यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केला होता. मात्र आता चित्र उलट दिसू लागले आहे.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी श्रीनिवासन यांचा जावई मय्यपनला अटक झाली आहे. त्यामुळे स्पॉट फिक्सिंग प्रकरणात चेन्नई सुपर किंग्जचे संघमालक असलेल्या श्रीनिवासन यांनीही आपल्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी गोवा क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष शेखर सलकार यांनी केली आहे. सलकार यांच्या या भूमिकेला आसाम क्रिकेट बोर्डाचे गौतम रॉय यांनीही पाठिंबा दिला आहे.
बीसीसीआयच्या विश्वासर्हतेच्या दृष्टीने तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत श्रीनिवासन यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. या प्रकरणात निर्दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाची धूरा पुन्हा सांभाळावी असे सलकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनीही बुधवारी श्रीनिवासन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.