थोर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या जीवाला सनातन व अन्य दहशतवादी संघटनांकडून गंभीर धोका असून त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
मुंबई- थोर इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांच्या जीवाला सनातन व अन्य दहशतवादी संघटनांकडून गंभीर धोका असून त्यांना संपूर्ण सुरक्षा पुरविण्यात यावी, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात झालेल्या विचारवंतांच्या हत्येमागील सूत्रधाराचा शोध घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
अध्यात्माच्या नावाखाली सनातन या संस्थेने लोकशाहीला धोका निर्माण होईल, अशी कृत्य केली आहेत. या संस्थेचे काम हे आयसिस आणि तालिबानसारखे देशद्रोही आहे. आतापर्यंत अनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर, ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे लेखक कॉ. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या थोर विचारवंतांच्या हत्या झाल्या आहेत.
डॉ. दाभोळकर हत्या प्रकरण आणि स्फोटक प्रकरणात ज्यांना तपास यंत्रणांनी ताब्यात घेतले आहे, त्यांचे सूत्रधार कोण आहेत, हे तातडीने शोधून काढणे आगत्याचे आहे, अशी मागणी श्रीमंत कोकाटे यांनी केली आहे. कोकाटे इतिहासाचे सतत सत्यशोधन करीत आहेत. त्यावरून सनातन संस्थेच्या नियतकालिकात कोकाटे यांना मारण्याबाबतचे लेखन करण्यात येत आहे. त्याबाबत कोकाटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्याबाबतचा गुन्हाही दाखल झाला आहे.
सनातनने आतापर्यंत केलेल्या हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या जीवितास धोका आहे. त्यांना मागील तीन वर्षापासून सुरक्षा देण्यात आली असली तरी ती अगदीच जुजबी स्वरूपाची आहे. कोकाटे यांच्या जिवितास असलेला एकंदर गंभीर धोका लक्षात घेऊन त्यांना राज्यात आणि देशात संपूर्णपणे पुरेशी सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ज्या विचारवंतांच्या हत्या झाल्या आहेत, त्यांच्या सूत्रधारांनाही तातडीने अटक करावी, अशी मागणीही नितेश राणे यांनी केली आहे.