व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्य, साहित्यातच नाही तर एकूण त्या त्या प्रदेशाच्या, देशाच्या संस्कृतीत भर घालीत असते. साहित्य हे संस्कृतीच्या परिघातील अनेक गोष्टींबरोबर संवाद साधत त्या संस्कृतीच्या प्रवाहीपणासाठी संघर्ष करीत असते. मराठीमध्ये १९७० मध्ये अशा प्रकारे व्यवस्थेशी संघर्ष करणारे साहित्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह आकाराला येऊ लागले. जाती व्यवस्थेमुळे भारतीय माणसाची घडणच अशा प्रकारची होते की, त्याला त्याच्या पलीकडचे फारसे काही दिसत नाही. शिक्षणाच्या माध्यमातून विषमता पसरवली जात आहे, असे अनेक मुद्दे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले. चिपळूणमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या ८६ व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षीय भाषणाचा हा गोषवारा.
कोकण प्रदेशातल्या लेखकांनी मराठी साहित्याच्या समृद्धीमध्ये मोठी भर घातली आहे. केशवसुत, लो. टिळक, एस. एम. जोशी, साने गुरुजी, पं. महादेवशास्त्री जोशी, र. वा. दिघे, श्री. ना. पेंडसे, हमीद दलवाई, जयवंत दळवी, मधु मंगेश कर्णिक, रत्नाकर मतकरी, मामा वरेरकर, ज. वि. पवार, बेबी कांबळे, ऊर्मिला पवार, सदानंद रेगे, अ. ना. पेडणेकर, माधव कोंडविलकर आणि चिं. त्र्यं. खानोलकरांनी मराठी साहित्यात मोठी भर घातली आहे. मराठी कादंबरीकार कोण असे म्हटले तर श्री. ना. पेंडसे हेच एकमेव नाव पुढे येते. चिं. त्र्यं. खानोलकरांनी कविता, कथा आणि कादंबरी समृद्ध केली आहे. विशेषत: नियतीने पिडलेला माणूस त्यांनी फार समर्थपणे उभा केला आहे. सा- देशाला स्वातंत्र्याचे भान देणारे लो. टिळक आणि करुणेचे भान देणारे साने गुरुजी याच लाल मातीतील आहेत. केशवसुतांनी तर काव्यामध्ये क्रांतीच केली आहे. ती परंपरा आजही चालू आहे. चिपळूणचा तर विशेष उल्लेख करावा लागतो तो कवी माधव यांच्यामुळे. त्यांनी तळकोकणाचे जे चित्र उभे केले आहे ते केवळ अविस्मरणीय असे आहे.
साहित्य विविध रूपांमध्ये आविष्कृत होते. राग, लोभ, मद, मत्सर अशा विकारांचा जसा आविष्कार होतो, त्याप्रमाणेच प्रेम, वात्सल्य अशा भावनाही आविष्कृत होतात. समाजामध्ये वावरत असताना येणारे बरे-वाईट अनुभव त्यातून प्रकट होतात. पण आविष्कार कुठलाही असो त्या त्या समाजाची एक चौकट तेथे असतेच. किंबहुना समाजाशिवाय साहित्य असूच शकत नाही. त्या त्या समाजातले श्रेयस आणि प्रेयस त्यातून प्रकट होत राहते. त्या त्या समाजाची मूल्यव्यवस्थाही प्रकट होत राहते. त्याला त्या त्या समाजाच्या मूल्यव्यवस्थेची चौकट असतेच.
साऱ्याच कला मानवी जीवनाशी संबंधित असतात. प्रत्येक कलेचे स्वत:चे एक माध्यम असते. त्या कुठल्या तरी संवेदनेवर भर देणा-या असतात. प्रत्येक कलेची काही सामर्थे असतात आणि काही मर्यादाही असतात. त्यामुळे कलांमध्ये श्रेष्ठ कला, कनिष्ठ कला असा भेदभाव करण्याचे कारण असत नाही. परंतु, तो केला जातो. जीवनाच्या उत्थापनाच्या दृष्टीने विचार करता साहित्य हीच कला सर्वश्रेष्ठ आहे, असे मला वाटते. ती कुठल्याही एक संवेदनाचा आश्रय न करता सर्वच संवेदनांचा वापर करून घेते. त्यातून ती वाचकांना सर्वागांनी भारावून, भारून टाकते. समाजाचे भावजीवन घडवते. विचार प्रवृत्त करते. त्यातूनच संस्कृतीच्या नव्या दिशा ती ध्वनित करीत जाते. संस्कृती नावाची गोष्ट अधिकाधिक विशुद्ध व्हावी, यासाठी प्रयत्न करीत असते. मानवी जीवनाचे उत्थापन हेच तिचे ध्येय असते. म्हणून ती बोधाच्या पुढे जाते. काही उपदेश करण्यापेक्षा एकूणच नवी मूल्यव्यवस्था ती तीव्र प्रत्ययी स्वरूपात सूचित करीत जाते. त्यामुळेच साहित्य ही श्रेष्ठ कला आहे, असे म्हणावयास मुळीच प्रत्यवाह नाही.
लेखक ज्या भाषेत लिहीत असतो, त्या भाषेचा संबंध लेखनाशी असणे हे उघडच आहे. परंतु, त्या भाषेची सांस्कृतिक पार्श्वभूमी, ती भाषा बोलणा-या समाजाच्या परंपरा, इतिहास आणि एकूण मनाची ठेवण या सा-याच गोष्टी लेखनामध्ये आपोआप विरघळलेल्या असतात. त्या इतक्या एकरूप झालेल्या असतात की, त्या वेगळ्या करता येणार नाहीत. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या त्या भाषेतील एकूण वाङ्मयीन परंपरा, त्या साहित्य प्रकाराच्या परंपरा आणि आतापर्यंत झालेली त्या साहित्य प्रकाराची सारीच जडणघडण या गोष्टीही लेखनामध्ये मुरून गेलेल्या असतात. कुठल्याही लेखनाचे वेगळेपण पाहताना या सगळ्याच गोष्टी त्यातून ध्वनित होत जातात. साहित्यातला शब्द नेहमीच्या वापरातला असतो. परंतु, आपण वाचायला लागलो की, त्या शब्दांमध्ये निद्रिस्त असणा-या असंख्य गोष्टी जाग्या होऊन आपल्याशी संवाद करायला लागतात. हा संवाद वाचकांच्या व्यक्तिमत्त्वावरही पुष्कळच अवलंबून असतो. तरीही कलाकृती ही कलाकृती म्हणून जेव्हा सिद्ध होते तेव्हा या सा-याच गोष्टी जाणवायला लागतात. लेखकाच्या जीवनदृष्टीच्या अनुषंगाने, त्याच्या उन्नत जीवनाच्या संकल्पचित्राच्या अनुषंगाने कलाकृती आकाराला येतात. प्रत्येक काळात निर्मिती होतच असते. आपल्या भोवतीच्या असंख्य कलाकृती या भूतकाळात लिहिल्या गेलेल्या असतात, तशी आपल्या समकालातीलही असतात. अशा सा-या कलाकृतींची आपण वेगवेगळ्या प्रकारे वर्गवारी करतो. वाङ्मय प्रकाराच्या अनुषंगाने, प्रवाहांच्या अनुषंगाने, लेखकांच्या, अनुभवांच्या, काळाच्या अनुषंगाने अशी अनेक प्रकारे आपण वर्गवारी करू शकतो. परंतु, वाङ्मयाची वर्गवारी आणखी एकप्रकारे करता येऊ शकते. ती म्हणजे समाजव्यवस्थेच्या अंगाने. काही कलाकृती या समाजव्यवस्थेशी स्वत:ला जोडून घेणा-या असतात. प्रस्थापित व्यवस्थेचे गुणगान करणा-या असतात. त्या अवस्थेतील जो काही चांगुलपणा असेल तो दाखवण्याचा प्रयत्न करणा-या असतात. व्यवस्थेशी संघर्ष न करता, त्या व्यवस्थेमध्येच कसा कल्याणार्थ दडलेला आहे हे सांगणा-या असतात. त्या व्यवस्थेतील आंतरविरोधाकडे दुर्लक्ष आहे, हे सांगणा-या असतात. आम्ही लेखक आहोत, समाजाशी आमचे काही देणेघेणे नाही, आम्ही स्वायत्त व स्वतंत्र आहोत, अशी भूमिका घेतात. त्या व्यवस्थेतील जो कुरुपपणा असेल, त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे कळतनकळत व्यवस्थेचे समर्थनच करतात. यात रंजक साहित्य मात्र येत नाही.
भारतीय संस्कृतीच्या संदर्भात संपूर्ण वारकरी परंपरा असेल अगर महानुभाव परंपरा असेल; ते व्यवस्थेला प्रश्न करतात. कबिरासारखा महाकवी व्यवस्थेला प्रश्न विचारतो. बसवेश्वरसारखा रचनाकार व्यवस्थेला प्रश्न विचारतो. या सा-यांनीच प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारले जात परमेश्वनिर्मित आहे का? कुळ परमेश्वनिर्मित आहे की मानवनिर्मित आहे? विटाळ-चांडाळ या कल्पना मानवनिर्मित आहेत की, नाहीत आणि संपत्तीची विषम वाटणी माणसानेच केली आहे ना? स्त्रियांना गुलाम करण्याचे षड्यंत्र माणसानेच रचले ना? आपले हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी श्रेष्ठ, कनिष्ठ भाव माणसानेच निर्माण केले ना? हे आणि यांसारखे असंख्य प्रश्न उपरोक्त परंपरेतल्या महामानवांनी आपल्या साहित्यातून उपस्थित केले. ते साहित्य त्याच्या आंतरिक सामर्थ्यांने सुंदरही झाले आणि विचारप्रवर्तकही झाले. असे मानवी विचारांना आवाहन करणारे साहित्य माणसाच्या सौहार्दपूर्ण जगण्याचे चित्र रेखाटू शकते. ते माणसाच्या अंत:करणाच्या गाभ्याला आवाहन करते. ते माणसाच्या माणुसपणाला आवाहन करीत असते. अशा प्रकारचे साहित्य तुमच्या प्रस्थापित जीवनावर ओरखडे ओढत असते. प्रस्थापित व्यवस्थेच्या मर्यादा दाखवीत असते. प्रस्थापित व्यवस्थेतील दंभ आणि दमनही दाखवीत असते. म्हणूनच पुढच्या काळातील लोक त्याचा स्वीकार करीत असतात. ज्या संतांचा त्यांच्या वर्तमानात छळ झाला, त्यांना पुढील पिढ्या आदर्श रूपात पूजायला लागतात. त्याने सांगितलेल्या विचारांचा थोडा तरी परिणाम पुढच्या जगण्यावर होत असतो. म्हणजे पुढे येणारी संस्कृती बदललेली असते. आधीच्या पेक्षा चांगली असते. माणसाचे जगणे अधिक उन्नत आणि अर्थपूर्ण करण्यात तिचा सहभाग असतो. म्हणूनच व्यवस्थेला प्रश्न विचारणारे साहित्य साहित्यातच नाही तर एकूण त्या त्या प्रदेशाच्या, देशाच्या संस्कृतीमध्ये भर घालीत असते.
कधी कधी साहित्य हे धर्मसदृश्य असल्याची भूमिका मांडली जाते. ही बाब मात्र तितकीशी मान्य करता येऊ शकेल, असे वाटत नाही. कारण कधीकधी साहित्याला प्रचलित धर्माचेही संकेत अमान्य करावे लागतात. संत ज्ञानेश्वर, चक्रधर आणि संत तुकारामांसारख्या महात्मा कलावंतांनी ते इतिहासामध्ये केले आहेच. याचा अर्थ असा की, साहित्य हे संस्कृतीच्या परिघातील अनेक गोष्टींबरोबर संवाद साधत त्या संस्कृतीच्या प्रवाहीपणासाठी संघर्ष करीत असते. परंतु व्यवस्थेशी संघर्ष करणा-या साहित्याला खरा बहर आला तो १९७० नंतर. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये विविध प्रवाह आकाराला येऊ लागले. दलित साहित्य हा त्यातील प्रमुख आणि महत्त्वाचा प्रवाह आहे. दलित साहित्य प्रवाहाने संपूर्ण व्यवस्थेशी आणि परंपरांशीही संघर्षाची भूमिका घेतली. ती घेणे आवश्यकच होते. स्वातंत्र्यानंतरची पिढी भारतीय समाजाला आणि संस्कृतीला प्रश्न विचारू लागली. भारतीय घटनेने दिलेले समतेचे आणि बंधुतेचे नेमके काय झाले, हा तो मुख्य प्रश्न होता. पण त्याबरोबरच जीवनातील श्रेष्ठ मूल्ये कोणती, असाही प्रश्न या साहित्याने उपस्थित केला होता. साहित्यातील मूल्ये कोणती, असाही त्यांचा प्रश्न होता. हे आणि यांसारखे प्रश्न पूर्वी मार्क्सशवादी लेखक कवींनी उपस्थित केलेले होते. पण दलित साहित्य चळवळीने ते ऐरणीवर आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना केंद्रस्थान देऊन ही चळवळ कार्यरत झालेली होती. त्यामुळे साहित्याच्या स्वरूपापासून प्रयोजनांपर्यंत आणि मूल्यांपासून सौंदर्यापर्यंत विविध बाबींची चर्चा पुन्हा सुरू झाली. खरे म्हणजे ही बंधुत्वाची, समतेची मागणी करणारी चळवळ होती. याच सुमारास साहित्यात दलित, सवर्ण असे काही नसते, साहित्य हे साहित्य असते, असा प्रतिवादही होऊ लागला. साहित्याच्या प्रांतात वेगळय़ा चुली कशाला, अशा भाषेतही बोलले जाऊ लागले. खरे म्हणजे या वेगळ्या चुली नव्हत्याच. जाती व्यवस्थेसंबंधीचा हा उद्रेक होता आणि आपण सगळेच एका चुलीवर शिजवू, खाऊ, एकत्र येऊ, असे या चळवळीचे म्हणणे होते. माणुसकीला आवाहन करण्याचा प्रयत्न होता. जातींमधून बाहेर पडून माणूस ही मोठी व्यापक ओळख स्वीकारण्याचा प्रयत्न होता. खरे म्हणजे दलित साहित्याने जाती व्यवस्थेसंबंधी पुनर्विचार केला पाहिजे, ही व्यवस्था खिळखिळी केली पाहिजे आणि समाजात निकोप मानवी संबंध निर्माण झाले पाहिजेत, हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता. या दिशेने इतर लेखकांनी व विचारवंतांनी, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणा-यांनी जाती व्यवस्थेसंबंधी चिंरतर करण्याची आवश्यकता होती. कारण जाती व्यवस्था तर आपल्या सा-यांनाच वेढून राहिलेली आहे आणि ती आपल्या सा-यांना परस्परांपासून दूर लोटत आहे. आज तर जातीच्या अर्हता इतक्या टोकदार होत आहेत की, यातून संवादच संपून जाईल, असेही वाटते. लेखकाला जीवनाचे चौफेर आकलन करता आले पाहिजे. त्याला सर्वदूर पाहता आले पाहिजे. परंतु जाती व्यवस्थेच्या भिंतींमुळे लेखकाच्या निरीक्षणावर मर्यादा पडतात, त्याला जीवन सर्वार्थाने पाहताच येत नाही, असे कथाकार बाबुराव बागुल यांनी म्हटले होते. या मुद्दय़ाचा नीट विस्तार करायचा झाला तर असे म्हणता येईल की, जाती व्यवस्थेमुळे भारतीय माणसाची घडणच अशी होते की, त्याला त्याच्या पलीकडचे फारसे काही दिसत नाही.
आपल्याकडच्या बहुसंख्य लेखकांचे साहित्य पाहिले तर ते आपल्याला जातींच्या कक्षेत कसे अडकले आहे, ते दिसून येईल. प्रेमाच्या कादंब-या आपल्याकडे विपुल लिहिल्या गेल्या. परंतु प्रेम करणारी जोडपी जणू जात पाहूनच प्रेम करतात, असे चित्रण येते किंवा अगदीच क्वचित आंतरजातीय स्त्रीपुरुष जवळ आले तर त्यांचा विवाह कसा होणार नाही, याची चिंता लेखकालाच पडलेली असते!
साहित्याने जाती व्यवस्थेचाही वेध घेतला आहे. स्त्रीवादी चळवळीने व्यवस्थेशी संघर्ष मांडला आहे. परंतु पुरुषसत्ताक जीवनपद्धतीच्या मागे ठामपणे उभ्या असलेल्या जाती व्यवस्थेला समजून घेतल्याशिवाय खरा लढा पूर्णत्वास जाणार नाही, याचेही भान स्त्रीवादी चळवळींनी बाळगले पाहिजे. शिवाय जागतिकीकरणामध्ये अर्थकारण केंद्रस्थानी आले आहे आणि ते स्त्रियांची गुलामी अधिक घट्ट करू पाहते आहे. त्याचेही भान स्त्रीवादी चळवळीला आले तर या चळवळीने व्यवस्थेशी मांडलेला संघर्ष अधिक तीव्र होऊ शकेल. या चळवळीच्या पाठोपाठ किंवा आगेमागेच आदिवासी साहित्याची चळवळ मराठीमध्ये सुरू झाली. या चळवळीनेही प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष सुरू केला. एका प्रकारे या चळवळीनेही प्रस्थापित व्यवस्थेविरोधात बंडाचे निशाण उभे केले आहे. व्यवस्थेशी संघर्ष करणा-या साहित्य प्रवाहांमध्ये मुस्लिम, मराठी साहित्याचाही आवर्जून निर्देश करावा लागेल. हे साहित्य भोवतीच्या प्रस्थापित समाजव्यवस्थेविरुद्ध झोंबी घेण्याचा प्रयत्न करीत आहे. ते जेव्हा धर्म कल्पनांशी झोंबी घ्यायला लागेल, तेव्हा ते अधिक समर्थ आणि समृद्ध होईल. येथे महानुभाव- वारकरी चळवळीतील साहित्यापासून दलित आदिवासी चळवळीपर्यंतच्या सर्व चळवळींचा निर्देश केला आहे. चळवळीच्या बाहेर राहूनही एकाकीपणे व्यवस्थेशी संघर्ष करणारे आणि नव्या व्यवस्थेची मागणी करणारे लेखक नाहीत, असे नाही. वसंत आबाजी डहाके, राजन खान, भारत सासणे असे काही लेखक आहेतच. ही संख्या वाढू शकते. परंतु त्यांच्या दृष्टीवर उदारमतवादी, परिवर्तनवादी मूल्यांचा प्रभाव असतो हे मात्र आवर्जून नोंदवावे लागते. कारण जीवनाला उन्नत करणा-या मूल्यांशिवाय कुणालाही प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करता येत नाही. माणूस जन्माला आला म्हणजे तो माणूस होतोच, असे नाही. माणसाला ‘माणूस’ होण्यासाठी साधना करावी लागते. आपल्या विकारांवर, स्वार्थावर मात करीत विश्वाशी तद्रुप होण्यातच त्याचे माणुसपण असते. त्यासाठी साधना करावी लागते. ती जीवनातील श्रेष्ठतर मूल्यांची. त्यासाठी त्याला प्रस्थापित व्यवस्थेशी संघर्ष करावा लागतो. त्यातून मुक्तही व्हावे लागते. या बंडखोर साहित्य प्रवाहांनी माणसाच्या मुक्तीचा जाहीरनामाच उद्घोषित केला आहे.
स्वातंत्र्याच्या, नव्या राज्यघटनेच्या आणि माणुसपणाच्या प्रकाशात एकूण समाजाकडे आणि मानवी जीवनाकडे स्वातंत्र्यानंतर जन्मलेला लेखक पाहू लागला, तेव्हा त्याला काय दिसले? भोवती जन्मजात आणि आर्थिक विषमतेचा घोर अंधार पसरलेला आहे. हा अंधार कसा दूर करायचा हा त्याच्या पुढचा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता. तेव्हा १९७० नंतर साहित्यात आलेल्या लेखकांनी आणि चळवळींनी व्यवस्थेची चिरफाड केली आणि व्यापक अशा भूमिका स्वीकारल्या. खरे म्हणजे या भूमिकांमुळेच त्याला व्यवस्थेची चिरफाड करता येऊ शकली. ही चिरफाड करताना आणि नवी मूल्ये मांडताना त्याला मग मार्क्ससवाद जवळचा वाटला असेल किंवा आंबेडकरवाद जवळचा वाटला असेल. स्त्रीवाद्यांना जगभरातील स्त्री मुक्तीच्या भूमिका मांडणारे कलावंत आणि विचारवंत जवळचे वाटले असतील. शेवटी हे सारे वाद म्हणजे तरी काय आहेत?
बौद्धकाळ असो की, मध्ययुगातील संतांच्या चळवळीचा काळ असेल किंवा फ्रेंच राज्यक्रांतीनंतरचा कालखंड असेल. त्या सर्वच कालखंडात प्रस्थापित व्यवस्था आणि त्या विरुद्धचा सुप्त प्रकट संघर्ष असेल. हा संघर्ष वेगवेगळ्या रूपात व्यक्त होतो. साहित्यादी कलांमधूनही तो व्यक्त होतो. तेव्हा मुख्य मुद्दा असतो, भूमिकांचा. लेखक कोणत्या भूमिका घेतात हेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच लेखकांच्या जीवनदृष्टीला, विश्वभानाला साहित्यामध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. ती किती व्यापक आहे याला महत्त्व प्राप्त होते. लेखक कुठल्याही कालखंडातील असेल, कुठल्याही देशातला असेल आणि तो कुठल्याही वाङ्मय प्रकारात लिहीत असेल; तो कोणती भूमिका मांडतो हे महत्त्वाचे असते. साहित्यकृतीमध्ये भाषेचे विभ्रम असतात. प्रतिमांप्रतिके व अलंकार असतात, जीवनानुभव असतो, व्यक्ती आणि घटना प्रसंग असतात, जीवनातले ताण असतात, समाजातले पेच असतात, अशा अनेक गोष्टी साहित्यकृतीमध्ये असतातच; पण महत्त्वाचे असते ती त्याची भूमिका. म्हणजे लेखकाने केलेला उपदेश नसतो की, बोधही नसतो. तो प्रचारही नसतो. तर तुमचे जगण्याचे भान विकसित करणारे, माणुसपण अधोरेखित करणारे काहीतरी आमोलिक अशी मूल्यात्मक स्वरूपाची जाण असते आणि ही जाण रुजवण्याचे कार्य लेखक, कलावंत करीत असतात. थोडेसे अलंकारिक भाषेत बोलायचे तर लेखक हा शेतक-यासारखाच असतो. शेतकरी भूमीची मशागत करून, योग्य वेळ येताच त्यात बीजाचे रोपण करतो. कलावंत लेखकही वाचकांच्या मनाची मशागत होईल, अशा सगळ्या गोष्टी करतो. माणुसकीसंबंधीची नवी जाण येते आणि ही जाणच नि:शस्त्र असलेल्या सामान्य माणसाला जगण्याचे बळ देत असते.
साहित्य आणि कलांची निर्मिती ही सांस्कृतिक परिघातच होत असते. परंतु प्रस्थापित व्यवस्थेशी जे साहित्य संघर्ष मांडते, तेच साहित्य संस्कृती समृद्धीच्या दृष्टीने मोलाचे असते. अशी सांस्कृतिक समृद्धी करण्यासाठी उपदेश नाही, प्रचार नाही आणि बोधही नाही तर मानवी जाणिवांचा स्तर उंचावण्यासाठी लेखकांना भूमिका घ्यावा लागतात. अर्थात या भूमिका एक तर व्यवस्थेच्या बाजूने तरी असतात किंवा व्यवस्थेशी संघर्ष घेणा-या तरी असतात. व्यवस्थेशी संघर्ष घेणा-या भूमिका समाजाला पुढे नेणा-या असतात. सामान्य आणि शोषित माणसाला जगण्याचे बळ देणा-या असतात आणि व्यापक अर्थाने दुरितांचे तिमीर जावे, यासाठी प्रार्थना करणा-या असतात. सर्वत्र ज्ञानाचा प्रकाश व्हावा आणि ‘सर्वे सुखिन: संतू’ अशी भूमिका घेणा-या असतात.
लेखन हे त्या भाषेचे वैभव असते. एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राचे वैभव कोणते असे विचारले तर वैचारिक स्वरूपाचे लेखन असे नि:संदिग्धपणे सांगता येते. परंतु एकोणिसाव्या शतकामध्ये वैचारिक लेखनाची जशी सघन परंपरा होती, तशी सघन परंपरा स्वातंत्र्यानंतर मात्र उरली नाही. म्हटली तर ही परंपरा विरळ झालेली आहे. शिवाय समाजाच्या स्थितीगतीसंबंधी, श्रद्धा अंधश्रद्धांसंबंधी, राजकीय संस्कृतीसंबंधी, जागतिकीकरणासंबंधी आणि त्याचे सामान्य माणसांवर होणा-या परिणामाविषयी कुणी फारसे लिहिताना दिसत नाही. समाजासंबंधीचे वैचारिक स्वरूपाचे लेखन येणे गरजेचे असते. हे लेखन समाजाला आकार देण्यासाठी उपयोगी तर ठरतेच; पण लेखकांना जीवनदृष्टी देण्यामध्येही अशा वैचारिक लेखनाचा मोठा वाटा असतो. महात्मा फुले आणि आगरकर नसते तर केशवसुत आणि हरिभाऊ आपटे निर्माण झाले असते की, नाही या विषयी शंकाच येते. निदान या विचारवंतांमुळे लेखक, कवींना अधिक बळ मिळाले, असे तरी नक्कीच म्हणता येते.
इंग्रज राज्यकर्त्यांशी व्यवहार करताना इंग्रजी ही भाषा संवादासाठी वापरली जात होती. त्यासाठी भारतीय लोक इंग्रजी शिकले. त्यात ग्रंथ लिहू लागले. पत्रव्यवहार इंग्रजीत करू लागले. हे एवढेच झाले असे, मात्र नाही. इंग्रजी राज्यकर्त्यांची भाषा असल्यामुळे तिला प्रतिष्ठा होतीच. आता इंग्रजी येणा-या भारतीय माणसालाही प्रतिष्ठा मिळू लागली. त्याला मानमरातब आणि आर्थिक फायदेही मिळू लागले. समाजातील तो उच्चवर्गीय समजला जाऊ लागला. एका प्रकारे इंग्रजी ही प्रतिष्ठेची, तसेच इंग्रजी न येणा-यांच्या शोषणाचे हत्यार बनली. भाषेच्या आडून करावयाच्या राजकारणाचे हत्यार बनली. एक प्रकारे भाषा हे शोषणाचे कसे हत्यार बनू शकते व सांस्कृतिक राजकारणामध्ये ते कसे प्रभावी होऊ शकते याचे इंग्रजी हे एक उत्तम उदाहरण आहे. श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी शाळा आणि गरिबांच्या मुलांसाठी मराठी शाळा, अशी आता विभागणी झाली आहे. हे वास्तवही या संदर्भात लक्षात घ्यावे लागते. खरे म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून आज विषमता पसरवली जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मातृभाषेतून दिलेले शिक्षण अधिक प्रभावी असते हे जगभर मान्य झालेले तत्त्व आहे. चीन, रशिया, जपान, जर्मनी इत्यादी राष्ट्रांमध्ये इंग्रजी शाळा आहेत का? तरीही ते देश प्रगतीच्या दृष्टीने भारताच्या पुढे आहेत. आता तर आपण पहिलीपासूनच्या इंग्रजी शिक्षणाची सोय केली आहे. तेव्हा मराठी शाळा समृद्ध होण्याची गरज आहे. मराठी शाळांमधून चांगले शिक्षक, सर्व शैक्षणिक सुविधा आणि उत्तम शैक्षणिक पर्यावरण निर्माण होण्याची गरज आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे ती अशी की, आज जागतिक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावणारे सर्व भारतीय शास्त्रज्ञ आपापल्या मातृभाषेतून शिकलेले आहेत. भाषेची खरी आणि व्यापक पातळीवरील ओळख तिच्यामध्ये किती मोठे साहित्य निर्माण होते त्यावरून होत असते. ज्ञानपीठाच्या स्थापनेपासून मराठीच्या वाट्याला केवळ तीन वेळाच हा सन्मान आलेला आहे. या उलट कन्नड भाषेतील लेखकांना मात्र सहा वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे. हिंदीला हा मान त्याहून अधिक वेळा प्राप्त झाला आहे. हा भारतीय पातळीवरील पुरस्कार देताना काही अधिक उणे होत असेल, हे गृहित धरूनसुद्धा असे म्हणावे लागते की, भारतीय पातळीवर मराठी साहित्य नीट असे पोचत नाही. दलित साहित्याच्या प्रारंभीच्या काळात पुष्कळ आत्मकथनांचे आणि ललित साहित्यकृतींचे अनुवाद जगभर झाले. परंतु, यानंतर तेही प्रमाण कमी होत गेले. इतर भाषेत अनुवाद होण्यामध्ये खूप अडचणी येतात हे गृहित धरूनही हे चित्र काही फारसे चांगले आहे, असे मात्र नाही. याउलट इंग्रजीतील आणि इतर पाश्चिमात्य भाषांमधील गाजलेली पुस्तके मोठ्या प्रमाणात मराठीत येत आहेत. याचा मराठी लेखकांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. आज माहितीपर पुस्तके जरूर खपतात. तीही समाजाची गरज आहे. परंतु सामाजिक उन्नतीमध्ये, सांस्कृतिक उन्नतीमध्ये ललित साहित्याचा मोठा वाटा असतो. त्यामुळे वाचन संस्कृती विकसित करण्यासाठी अनेक उपक्रम आयोजित करण्याची आवश्यकता आहे.