छत्तीसगड, झारखंड आणि देशातील इतर नक्षलग्रस्त राज्यातील नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलिस आणि निमलष्करी दलाच्या अनेक जवानांचा बळी गेल्यानंतरही ही समस्या सनदशीर मार्गाने सोडवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. पण झारखंडमधील लातेहार येथे नक्षलवाद्यांनी विध्वंस घडवण्यासाठी जे तंत्र वापरले ते पाहता सरकारला अशा नक्षलवाद्यांविरोधात कठोर पावले उचलावी लागणार आहेत. कोणत्याही युद्धतंत्रामध्ये न बसणा-या, मरण पावलेल्या जवानांच्या शरीरांचा वापर विध्वंसासाठी करण्याच्या त्यांच्या कृतीला तोडीस तोड उत्तर देण्याची गरज शहीद जवानांच्या सहका-यांकडून व्यक्त होत आहे.
झारखंडमधील लातेहार येथे नक्षलवाद्यांनी ७ जानेवारीला केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर केलेल्या हल्ल्यात निमलष्करी दलाचे केवळ दहा जवानच शहीद झाले नाहीत, तर त्यामध्ये चार नागरिकदेखील मरण पावले. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी जे केले ते त्यांनी यापूर्वी कधीही केले नव्हते. गोळीबारात मरण पावलेल्या एका जवानाच्या मृतदेहामध्ये प्रेशर बॉम्ब ठेवून आणखी जास्त बळी घेण्याचा प्रयत्न नक्षलवाद्यांनी केला.
नक्षलवाद्यांकडून मानवतेचे उल्लंघनन नक्षलवाद्यांकडून जास्तीत जास्त विध्वंस घडवण्यासाठी टोकाची पावले उचलली जात असल्याचे लातेहारच्या हल्ल्यामध्ये दिसून आले. कोणत्याही संघर्षात जे लढवय्ये मरण पावतात, त्यांच्या मृतदेहांना योग्य तो सन्मान देण्याचा सर्वसाधारण नियम आहे. परंतु लातेहारमध्ये नक्षलवाद्यांनी गोळीबार करून ज्या जवानांना मारले त्यांच्या मृतदेहांचा वापर बॉम्ब लपवण्यासाठी करून सर्व प्रकारच्या नियमांना बाजूला सारले आणि माणुसकीला काळिमा फासला.
डॉक्टरांच्या दक्षतेमुळे विध्वंस टळला
या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाचा मृतदेह रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांना या जवानाच्या मृतदेहावर गोळीबाराच्या अनेक खुणा तर आढळल्याच पण विचित्र पद्धतीचे टाके दिसल्यामुळे त्यांचा संशय बळावला. या मृतदेहाचे स्कॅनिंग केल्यावर आत बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. हा बॉम्ब निकामी करण्यासाठी बॉम्बनाशक पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी सुमारे चार तासांच्या अथक प्रयत्नांनतर हा बॉम्ब निकामी केला. मानवी शरीरातील बॉम्ब निकामी करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉम्बची तीव्रता या जवानाच्या मृतदेहामध्ये आढळलेला बॉम्ब सर्वसाधारण नव्हता तर तर ते एक आयईडी(इम्प्रोवाइज्ड एक्सप्लोझिव डिवाइस) नावाचे शक्तिशाली स्फोटक होते. सुमारे १० मीटर त्रिज्येच्या परिघात विध्वंस घडवण्याची त्याची क्षमता होती. पोलिसांची बुलेटप्रूफ गाडी उडवू शकेल इतकी ताकद असलेले हे एलईडी सुमारे अडीच किलो वजनाचे होते.
नक्षलवाद्यांवर चित्रपटांचा प्रभाव
मानवी शरीरात स्फोटके लपवून त्यांचा स्फोट घडवण्याचे तंत्र ‘नो मॅन्स लँड’ सारख्या काही चित्रपटांमधून प्रदर्शित करण्यात आले आहे. काहीसा तसाच प्रकार या हल्ल्यामध्ये दिसून आला. कारण एका जवानाच्या मृतदेहामध्ये त्यांनी स्फोटके लपवल्याचे डॉक्टरांच्या दक्षतेमुळे लक्षात आले असले तरी त्यापूर्वी नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे मृतदेह उचलताना काही गावकरी मरण पावले होते. त्यावेळी त्या मृतदेहांच्या खाली सुरुंग पेरण्यात आले होते किंवा त्यांच्या शरीरात अशाच प्रकारे स्फोटके ठेवण्यात आली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हल्ल्यामागे अरविंदजीचा हात
लातेहारमध्ये झालेल्या हल्ल्याचे नेतृत्व देव कुमार सिंह ऊर्फ अरविंदजीने केले होते, असे म्हटले जात आहे. २०११ मध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झालेला नक्षलवाद्यांचा म्होरक्या किशनजी याचा तो उजवा हात समजला जातो. यापूर्वी सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेल्या अनेक हल्ल्यांचा तो सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आयईडी व भूसुरुंगांचा स्फोट घडवणारा तज्ज्ञ अशी त्याची ओळख असून पोलिसांनी त्याच्यावर १२ लाख रुपयांचे इनाम लावले आहे.
नक्षलवाद्यांमध्ये वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश?
नक्षलवाद्यांनी स्फोटके लपवण्यासाठी मानवी शरीराचा वापर करण्याचा घृणास्पद प्रकार करताना शरीरशास्त्राची माहिती असलेल्या तज्ज्ञांचा वापर केला असल्याचे पोलिसांना वाटत आहे. कारण या जवानांच्या मृतदेहांमध्ये स्फोटके लपवून अतिशय कमी वेळेत ते शिवण्याचे काम म्हणावे तितके सोपे नाही.
तोडीस तोड उत्तर देण्याची गरज
या हल्ल्यामध्ये नक्षलवाद्यांचा मोठा गट सक्रिय होता आणि ते उंचावर असल्याने सुरक्षा दलाच्या जवानांना त्यांच्याशी लढण्यात अडचणी येत होत्या. त्यातच ज्या जवानांनी जंगलामध्ये झाडाच्या आड राहून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला तो पूर्णपणे अपयशी ठरला. कारण त्या झाडांवर स्वत: नक्षलवादीच लपलेले होते. वरच्या बाजूने जवानांवर हल्ला करणे त्यांना सहज शक्य झाले. या हल्ल्यानंतर मरण पावलेल्या सहका-यांचे मृतदेह आणणा-या जवानांनाही हौतात्म्य पत्करावे लागल्याने मृतदेह उचलण्याबाबतही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नक्षलवाद्यांच्या या युद्धतंत्रामुळे सीआरपीएफच्या अधिका-यांमध्ये चीड निर्माण झाली आहे. जर ते सर्व नियम धाब्यावर बसवणार असतील तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याची आवश्यकता असल्याचे सुरक्षा दलाच्या जवानांकडून बोलले जात आहे.
प्रत्युत्तर देण्यामध्ये अडचणी
नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्याची अपेक्षा सुरक्षा दलाकडून व्यक्त होत असली तरी त्यामध्ये अजूनही ब-याच अडचणी आहेत. जे जवान या भागात नक्षलविरोधी मोहीम राबवत आहेत, त्यांचे गुप्तचरांचे जाळे फारसे बळकट नाही. सुरक्षा दलांना नक्षलवादी कोणत्या भागात आहेत हे शोधण्यासाठी पूर्णपणे तर्कशास्त्रावर अवलंबून राहावे लागते. एखाद्या गावातील गावक-यांचे वर्तन वेगळे वाटणे, जंगलामध्ये पावलांच्या ठशांचा माग काढणे आणि इतर अशाच प्रकारच्या खुणांचा वापर ते करत असतात.
उलट नक्षलग्रस्त भागात तेथील गावक-यांच्या सहकार्याने सुरक्षा दलाच्या प्रत्येक हालचालीची माहिती नक्षलवाद्यांना मिळत असते. त्यामुळे मोहीम राबवण्याआधीच नक्षलवादी सावध होतात आणि मोहिमा अपयशी ठरतात. झारखंडमधील नक्षलवादी गटांना लवकरात लवकर प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा दलाचे मनोधैर्य खच्ची झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अवस्थेत नक्षलवाद्यांच्या आणखी हल्ल्यांना ते तोंड देऊ शकणार नाहीत. त्यामुळे एक मोठी आणि प्रभावी मोहीम राबवली गेली पाहिजे.