नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रणरागिणीच्या रूपात पाहिले.
नागपूर- नागपूरच्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानाने काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना रणरागिणीच्या रूपात पाहिले. सोमवारी सायंकाळी एक लाखापेक्षा अधिक लोकांपुढे बोलताना सोनिया गांधी कडाडल्या, दलित आणि ओबीसींचे आरक्षण धोक्यात आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या शक्तींविरुद्ध लढले त्या शक्ती आज या देशाचे तुकडे करू पाहत आहेत.
धर्मनिरपेक्षता संपवून समाजात फूट पाडून लोकशाही ठेचू पाहत आहेत. गरिबांच्या कल्याणाच्या योजनांना कात्री लावत आहेत. हे सारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशा-यावरून होत आहे आणि नरेंद्र मोदी गप्प आहेत. या शक्तींना रोखण्याची आम्हा सा-यांची जबाबदारी आहे, असे सोनिया-राहुल यांनी सांगताना ‘जय हिंद, जय भीम’चा नारा दिला तेव्हा जनसागराने एकच जयघोष केला.
भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती वर्ष समारोपानिमित्त काँग्रेसने नागपुरात या सभेचे आयोजन केले होते. कडक उन्हात झालेली ही सभा अपेक्षेपेक्षा यशस्वी झाली. नागपूरच्या संघभूमीत गांधी मायलेकांनी संघ आणि मोदींविरोधात हल्ला चढवताना धम्म हुंकारही साधला.
नागपुरात आल्यावर प्रथम सोनिया गांधी आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या पवित्र दीक्षाभूमीवर गेल्या. तिथे मिळालेल्या प्रेरणेने केलेल्या त्यांच्या भाषणाला लोकांनी घोषणा देत मोठा प्रतिसाद दिला. सोनिया आणि राहुल यांच्या भाषणातले अनेक मुद्दे समान होते. मोदी सरकार गरिबांच्या विरोधात काम करीत आहे, असे या दोघांनी सांगितले.
आंबेडकर आणि जोतिराव फुले यांना अभिवादन करून सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. घटनानिर्मितीत ज्यांचे कसलेही योगदान नव्हते ती मंडळी आज आंबेडकरांना डोक्यावर घेत आहेत. पण त्यांचे षड्यंत्र वेगळे आहे.
लोकशाही पद्धतीने निवडून आलेले उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशचे सरकार या शक्तींनी बरखास्त केले. इतर सरकारेही ते पाडू पाहत आहेत. पंचायत राज संपवण्याचा यांचा डाव आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये पंचायत निवडणूक लढवण्याचा महिलांचा अधिकार हिसकावून घेण्यात आला आहे.
संघ परिवाराच्या दुटप्पीपणावर घणाघात करताना सोनिया म्हणाल्या, आरक्षण संपले पाहिजे असे यांच्यातले काही लोक सांगतात. पण त्यांच्यातलेच काही जण वेगळे बोलतात. हा कुटिल डाव ओळखला पाहिजे. राहुल गांधी यांनी मोदी आणि भाजपावर टीका करताना म्हटले की, या शक्ती मनुवादी विचारांचे रक्षण करू पाहत आहेत. देशाला हा मोठा धोका आहे.
आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिलेली वाक्ये वाचून दाखवत राहुल म्हणाले, शाळेत असताना आंबेडकरांना दाबण्याचा प्रयत्न झाला. आजही तेच सुरू आहे. दलितांना दाबले जात आहे. बोलाल तर मारून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. हैदराबादमध्ये रोहित वेमुला या विद्यार्थ्यांने याविरोधात आवाज उठवला तेव्हा त्याचा आवाज दाबण्यात आला. त्याने आत्महत्या केली नाही, त्याने कुर्बानी दिली. दोन प्रकारचा भारत निर्माण करण्याचे कारस्थान सुरू आहे. एक गरिबांचा आणि दुसरा श्रीमंतांचा.
गरिबांना चांगल्या कॉलेजात जाता येऊ नये असे प्रयत्न सुरू आहेत. मोक्याच्या संस्थांच्या जागी संघाने आपली माणसे घुसवली आहेत. मंत्रिमंडळ नव्हे तर एकटे मोदी आणि संघ हे सरकार चालवत आहेत. मोदींना दलितांशी काही घेणे-देणे नाही. त्यांना मनुवादी शक्तींना बळ द्यायचे आहे. मोदी मेक इन इंडियाची गोष्ट करतात. पण मुंबईत शेकडो गरिबांचा रोजगार मारला जात आहे.
या सभेच्या निमित्ताने पूर्ण देशभरातली काँग्रेस नागपुरात एकवटली होती. सुमारे दीडशे नेते आले होते. सभेसाठी बनवलेल्या विशाल व्यासपीठावर हे नेते दिसत होते. मल्लिकार्जुन खग्रे, सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंग, मुकुल वासनिक, नारायण राणे, विखे-पाटील, विलास मुत्तेमवार प्रभृती नेत्यांची मांदियाळी अवतरली होती.
देशाच्या कानाकोप-यातून कार्यकत्रे-नेते आले होते. प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची धावपळ पाहण्यासारखी होती. सभा थोडी उशिरा सुरू झाली. पण लोकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. भीमगीतांनी सुंदर वातावरणनिर्मिती केली होती.