दोन महत्त्वाच्या गोष्टी कायम दुर्लक्षिल्या जातात. एक म्हणजे गुंतवणूक ही केवळ कर वजावटीसाठीच होत असते. या बचतीतून भविष्यासाठी पुंजी निर्माण होत नसते. दुसरे म्हणजे, कर वजावटीचे गुंतवणूक पर्याय हे बहुतांश दीर्घ मुदतीचे असतात. यामुळे पैसा दीर्घकाळासाठी अडकला जातो. त्यामुळे जोवर हा मुदतबंद (लॉक-इन) कालावधी संपत नाही, तोवर तुमच्या या गुंतवणूक निर्णयावर फेरविचाराची मुभाही नसते. जर तसा निर्णय केलाच तो तोटा पदरी घेऊनच करावा लागेल.
मिळकतीला बसणा-या करांच्या कात्रीची धार कमी करण्यासाठी गुंतवणूक कुठे कुठे करायची, याबाबतचा विचार एव्हाना सुरू झाला आहे. सुरुवातीलाच या संबंधाने विचार सुरू झाल्याने उपलब्ध पर्यायांपैकी साजेशी निवड फुरसतीने आणि पुरती चाचपणी करून तुम्हाला करता येईल.
प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अन्वये कर वजावटीसाठी बहुतेक मंडळी सरधोपट मार्गच निवडताना दिसतात. जसे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ), करबचतीच्या ठेवी आणि अर्थातच विमा पॉलिसी आहेतच.
पण हे करीत असताना दोन महत्त्वाच्या गोष्टी कायम दुर्लक्षिल्या जातात. एक म्हणजे तुमची गुंतवणूक ही केवळ कर वजावटीसाठीच होत असते, तुमच्या वरकडीतील बहुतांश हिस्सा तीच फस्त करते. याचा अर्थ तुम्ही करीत असलेल्या या बचतीतून भविष्यासाठी पुंजी निर्माण क्वचितच होतच नसते.
खरेच हे होते का ते तुम्हीच बारकाईने तपासून पाहा. दुसरे म्हणजे, कर वजावटीचे गुंतवणूक पर्याय हे बहुतांश दीर्घ मुदतीचे असतात. याचा अर्थ तुमचा पैसा दीर्घ काळासाठी त्यात अडकला गेला आहे. त्यामुळे जोवर हा मुदतबंद (लॉक-इन) कालावधी संपत नाही तोवर तुमच्या या गुंतवणूक निर्णयावर फेरविचाराची मुभाही नसते. जर तसा निर्णय केलाच तो तोटा पदरी घेऊनच करावा लागेल.
या दोन घटकांमधून एक गोष्ट स्पष्ट होते की, तुम्हाला करांच्या दृष्टीने कार्यक्षम आणि तुमच्यासाठी संपत्ती निर्माणाचे साधनही बनेल अशा सर्वोत्तम पर्यायाची तुम्ही निवड करायला हवी. म्हणूनच कर वजावटीसाठी वर उल्लेख केलेल्या स्थिर उत्पन्न पर्यायांमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला भविष्यासाठी निश्चित केलेली आर्थिक उद्दिष्टे गाठता येणे कदापि शक्य नाही.
ईएलएसएस-कर बचत करणारा संपत्ती निर्माता
अत्यंत साधारण आणि नियमनाच्या अधीन असलेले हे उत्पादन म्हणजे करबचत करणारे म्युच्युअल फंड (ईएलएसएस) होय. जे तुम्हाला कर वजावटीचा लाभ देण्याबरोबरच दीर्घावधीत इच्छित पुंजी बनवून तुमचे आर्थिक लक्ष्यही साधते. खालील तक्त्यातून ईएलएसएसशी पारंपरिक गुंतवणूक पर्यायांशी तुलना केली गेली आहे. उत्तम तरलता (किमान लॉक-इन कालावधी) आणि दुहेरी कर वजावटीचा लाभ देण्यात ते अन्य सर्व पर्यायांपेक्षा सरस ठरल्याचे स्पष्टपणे दिसते.
हे कसे शक्य झाले? एक, वर्षाला कमाल १.५ लाख रुपयांपर्यंत तुमच्या करपात्र उत्पन्नातून वजा होईल इतकी रक्कम तुम्ही गुंतवू शकाल. हा प्रारंभिक गुंतवणुकीतून कर वजावटीचा फायदा. दुसरे म्हणजे तुम्ही या गुंतवणुकीतून अंतिमत: (ही एक समभागसंलग्न (इक्विटी) योजना असल्याने आणि एक वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी युनिट्स बाळगण्याने विक्रीतून होणारा लाभ करमुक्त असतो) म्हणजे विक्री करताना तुम्ही जो लाभ कमवाल तोही तुम्हाला करमुक्त मिळेल.
ईएलएसएससारख्या योजनांतून संपत्ती निर्माण किती वेगाने घडते याचीही गुंतवणूकदारांना पुरेपूर कल्पना असल्याचे दिसत नाही. भांडवली बाजाराशी संलग्न असलेली ही योजना असल्याने करबचतीचे फंड हे इक्विटी फंडच असतात. त्यामुळे ते दीर्घ मुदतीत समभागांसारखाच परतावा देत असतात. याचा अर्थ ते दिवसागणिक वाढण्याची क्षमता असणारे असतात आणि हा लाभ प्रत्येक दिवसाअखेर फंडाच्या बदललेल्या एनएव्हीवरून तुम्हाला लावता येईल.
खालील आलेखातून प्रत्येक एक लाख रुपयांप्रमाणे १५ वर्षासाठी पीपीएफ आणि ईएलएसएस योजनांत केलेल्या गुंतवणुकीत कशी कशी वाढ होत आली आहे ते दर्शवले गेले आहे. आलेखातून स्पष्टपणे दिसून येते की, पीपीएफमधील गुंतवणुकीतून १५ वर्षाअखेर जी पुंजी निर्माण होते, ती ईएलएसएसमधील केवळ सहा वर्षाच्या गुंतवणुकीतून उभी राहिली आहे. तर संपूर्ण १५ वष्रे गुंतवणूक करीत राहिल्यास, ईएलएसएसचा परतावा हा पीपीएफच्या तुलनेत तब्बल चारपटीने अधिक असल्याचे दिसून येईल.
पीपीएफच्या त्या त्या काळातील प्रत्यक्ष व्याजदर गृहीत धरला आहे. करबचतीचा फंड म्हणून आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल टॅक्स प्लॅनची कामगिरी सोबतच्या उदाहरणात ध्यानात घेतली आहे. दोहोंचा १ एप्रिल २०१५ पर्यंतचा परतावा लक्षात घेतला आहे. मागील परतावा कामगिरी ही भविष्यात तशाच कामगिरीची हमी देत नाही. योजनेसंबंधीचा संपूर्ण तपशील व अन्य संलग्न दस्तऐवज तपासून पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेतला जावा.
पीपीएफ ही एक १५ वष्रे कालावधीपर्यंत सुरू राहणारी गुंतवणूक असली तरी व्याज उत्पन्न हे १६व्या वर्षी जमा होते आणि १६व्या वर्षीच तिची मुदतपूर्ती होते. त्यामुळे वरील उदाहरणात तौलनिक परतावा कामगिरी त्याच आधारे मांडली आहे.
करबचतीच्या फंडांमध्ये गुंतवणूक कशी करावी?
तसे पाहता आजही कर-बचतीचे फंड अथवा ईएलएसएस यांना शेअर बाजाराशी सांगड घातली गेल्याने उच्च जोखीमयुक्त योजना मानले जात असल्याने, सामान्य गुंतवणूकदार त्यापासून फटकून असतो. तथापि, या जोखमांपासून गुंतवणूकदारांना खालीलप्रमाणे दिलासा मिळू शकेल.
एक-जरी ईएलएसएस योजनांचा लॉक-इन कालावधी हा तीन वर्षाचा असला, तरी सामान्यत: गुंतवणूकदारांनी किमान पाच वर्षे वा अधिक कालावधीसाठी त्यात गुंतवणूक कायम ठेवावी, जेणेकरून बाजारातील चढ-उतारांचा धोका टळेल व परतावा खात्रीने चांगला राहील. दुसरे, गुंतवणुकीचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे एसआयपीचा वापर करावा, ज्यामुळे बाजाराच्या वर-खाली हेलकाव्यांतून गुंतवणुकीचे सरासरी मूल्य साधले जाईल. यातून तुम्ही त्या त्या वर्षातील कर-वजावटीची गुंतवणूक ही टप्प्याटप्प्याने नियमित स्वरूपात करू शकाल आणि अंतिम क्षणी करवजावटीसाठी घिसाडघाईने गुंतवणूक होणार नाही.
(लेखिका फंड्स इंडिया डॉट कॉमच्या म्युच्युअल फंड
संशोधन विभागाच्या प्रमुख आहेत.)