केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर राज्यात भाजपा आमदारांची संख्या शिवसेना आमदारांपेक्षा जास्त आहे. तेव्हा आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपा मोठा भाऊ असल्याचे शिवसेनेने मान्य करावे.
मुंबई – केंद्रात भाजपाची एकहाती सत्ता आहे. तर राज्यात भाजपा आमदारांची संख्या शिवसेना आमदारांपेक्षा जास्त आहे. तेव्हा आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपा मोठा भाऊ असल्याचे शिवसेनेने मान्य करावे, असा पुणेरी टोला भाजपाचे ज्येष्ठ नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी शिवसेनेला लगावला.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. त्याचा वचपा गिरीश बापट यांनी शनिवारी काढला.
‘मंदिर वही बनायेंगे, लेकिन तारीख नही बतायेंगे, असे सांगत ठाकरे यांनी भाजपाला अनेक वर्षापासून भिजत पडलेल्या राममंदिर मुद्दय़ावरून चांगलेच फटकारले होते. गोमांसाचे राजकारण करण्यापेक्षा महागाईकडे बघा, असे सांगत मोदी सरकारमुळेच महागाई वाढल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. तर दादरी प्रकरणामुळे देशाची मान खाली गेली असल्याचा टोलाही त्यांनी भाजपाला लगावला.
त्यामुळे सत्ताधारी भाजपामध्ये पुन्हा शिवसेनेविरोधात खदखद निर्माण झाली आहे. संधी शोधत भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांनी पुन्हा एकदा आपल्या पुणेरी शैलीत शिवसेनेवर शरसंधान सांधले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेत एकहाती सत्ता भाजपाची आली आहे. तसेच राज्य विधिमंडळातसुद्धा शिवसेनेपेक्षा भाजपाचे आमदार अधिक आहेत. तेव्हा आपणच मोठे भाऊ म्हणून मिरवणा-या शिवसेनेने भाजपाच मोठा भाऊ असल्याचे मान्य करावे, अशा शब्दांत त्यांनी खदखद व्यक्त केली आहे.
शिवसेना-भाजपा सरकारला एक वर्ष होण्यास अवघा आठवडा राहिला आहे. गेल्या वर्षभरात भाजपाने शिवसेनेचा अपमान करण्याची एकही संधी सोडलेली नाही. सरकारच्या प्रत्येक निर्णयात भाजपाचे वर्चस्व राहिले असून मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांना टाळत आहेत.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई कोस्टल रोड, मरिन लाइन्सवर एलईडी दिवे या मुद्दय़ांवर दोन्ही पक्षांमध्ये मोठी खडाजंगी झाली. सरकारला अडचणीत आणण्यासाठी शिवसेनेने अनेक आंदोलने केली. मात्र त्याची दखलही घेतलेली नाही. उलट पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाला पोलीस संराक्षण पुरवले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावरून शिवसेना-भाजपामध्ये खडाजंगी झाली आहे. दसरा मेळाव्यानिमित्त हा वाद उद्धव ठाकरे यांनी चव्हाटय़ावर आणला आहे. मात्र, भाजपाने या टीकेची जराही दखल घेतली नाही. भाजपाने शिवसेनेला पूर्णपणे झिडकारल्याचे यातून दिसून येते.