यंदा अनेक मंडळांनी गणरायाचे स्वागत ढोलताशांच्या गजरात केले गेले. गेली काही वर्षे गणपतीच्या सणात ढोलताशे वाजवणं हा जणू रिवाजच बनला आहे. ज्यात मुलं-मुली दोघेही तितक्याच हिरीरीने भाग घेतात. त्यांचा हा सहभाग पाहून तरुणांकडून संस्कृती जपली जातेय याचा आनंद वाटतो.
नुकताच सर्वत्र गणेशोत्सव साजरा झाला. यावेळी मिरवणुकांमध्ये ढोल-ताशा पथकांनी लाखो भक्तांना ठेका धरायला लावला. हे ढोलताशे वाजवणारे हात तरुण-तरुणींचे होते. या हातांमध्ये तरुणाईची ऊर्जा सळसळत होती. तरुण पिढी भारतीय संस्कृतीकडे डोळेझाक करते असं म्हणणा-या प्रत्येक व्यक्तीने या मुलांना पाहावं असं चित्र असतं.
ढोल-ताशा संस्कृती हे आपल्या कलासंस्कृतीचेच एक प्रतीक आहे. ढोल-ताशाचे लोण हळूहळू सर्व महाराष्ट्रात पसरू लागलंय. विशेष म्हणजे या पथकातून युवकांबरोबर युवतीही यात सहभागी झाल्या आहेत. ढोल आणि ताशा वाजविणे या एकेकाळच्या फक्त पुरुषांच्या मक्तेदारीला युवती आणि स्त्रियांनी आपल्या शिस्तबद्ध व कलात्मक ढोलवादनाने सुरुंग लावला आहे.
आपली वादन कला सादर करण्याच्या निमित्ताने तरुणांमधील कलेला यावेळी वाव मिळतो, व्यासपीठ मिळतं. शिवाय त्यांच्यातली एकता, संघटन क्षमताही यावेळी दिसून येते. वादन पथकांमध्ये शिस्तबद्धताही असते. तरुणांना शिस्त नाही म्हणून नेहमी ओरड असते, पण तसं चित्र या ढोलताशा वादनाच्या वेळी अजिबात दिसत नाही.
आपल्या भारतीय संस्कृतीचे हे देखणे रूप आवडल्याने, संस्कृतीवर प्रेम असल्यानेच तरुण-तरुणी मोठय़ा उत्साहाने यात दरवर्षी सामील होतात. पथकातील वादकांची संख्या दरवर्षी वाढते आहे. पारंपरिक पेहराव करायला देखील ही तरुण मंडळी तेव्हा विसरत नाहीत. इतर वेळी पाश्चिमात्य वेषभूषेत असणारे कित्येक जण सणावाराच्या प्रसंगी हमखास पारंपरिक वेषात दिसतात.
तर अशा प्रकारे ढोलताशाने तरुणाईला भूल पाडली आहे. त्यातील नादाने ही भूल निर्माण केलेली आहे. त्यांपैकी बरेच जण चांगले शिकलेले आहेत. पेशाने इंजिनीयर, डॉक्टर, सीए असणारे देखील रस्त्यावर उतरून ढोलताशे वाजवताना दिसतात. हे तरुण एक छंद म्हणून ढोल-ताशा वाजवायला म्हणून आपणहून पथकात सामील होतात. त्यांना ही वाद्ये वाजवण्यात कमीपणा वाटत नाही, उलट आवडीने वेळ काढून ते वादनासाठी सराव करतात. त्यामुळे सणांच्या निमित्ताने का होईना, युवावर्गातील जोश, ताकद आजमावणारी, त्यांना वादनाचा मनमुराद आनंद देणारी ढोल-ताशा पथके अल्पावधीतच तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहेत.
सततचे काम, स्पर्धा, ताणतणाव करिअर यात दबलेल्या तरुणाईला ढोल-ताशा पथकाच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करण्याचे माध्यम मिळाले आहे. टीव्ही, मोबाईल, सोशल मीडियाच्या मा-यामध्ये दिशाहीन झालेल्या तरुण पिढीला या माध्यमाने एकत्र आणण्याचे काम केले आहे. कृत्रिम साधनांमधून साधल्या जाणा-या संवादाच्या काळात वास्तवातील संवाद जपण्यासाठी ही पथकं कार्यरत आहेत. मराठी संस्कृती टिकवण्याचा प्रयत्न या तरुणाईकडून होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.
व्हर्च्युअल आनंद मिळविण्याच्या नादात आजची पिढी ख-या अर्थाने जगण्याचा आनंद हरवून बसली आहे. म्हणूनच एकत्र येणे, शिस्तबद्ध पद्धतीने काम करणे, सामाजिक बांधिलकी जपणे, सामाजिक समस्यांवर वास्तवात चर्चा व कृती करणे अशा अनेक गोष्टी ही ढोलपथके परंपरा जपण्यासोबतच करत आहेत. दिवसभर शिक्षण व नोकरी करून सरावाला येणे, हीच खरी यातील पॅशन तरुणांना आकर्षित करते आहे.
आपला वारसा नष्ट होत आहे, असे म्हणणाऱ्यांनी या मुलांकडे बघणे जरूरीचे आहे. आपली ताकद कुठे वळवायची, तरुणांना हे ठाऊक असणे गरजेचे आहे. ते या निमित्ताने घडते आहे. पबमध्ये दारू पिणे, फुकट वेळ वाया घालविणे, त्यापेक्षा तरुणांनी इथे येऊन वेळ घालविणे कधीही चांगले आहे. जगभरात सण-उत्सवांमध्ये वाद्ये वाजविली जातात. मग आपल्या तरुणांवर वाद्य वादनासाठी बंदी घालणं चुकीचं आहे. ढोल ताशाने तरुणाईला वेड लावले आहे.
ही पथकं म्हणजे केवळ पैसे मिळवण्यासाठी उभी केलेली नाहीत तर आपली संस्कृती जपण्यासाठी सुरू झालेली चळवळ आहे. त्यायोगे सत्कार्य व्हावे ही भावना पथकातील सभासदांची असते. ढोल-ताशाच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. शिस्त, वादनाची विशिष्ट पद्धत आणि ताल धरत दिवसेंदिवस या ढोल-ताशा पथकांचे स्वरूप बदलत आहे. त्यातून मिळणारा आनंद पाहता तरुणाई कोणत्याही प्रकारच्या मानधनाची अपेक्षा न ठेवता याकडे वळली आहे. ढोल-ताशा पथकांमुळे संस्कृतीची जोपासना करण्यासोबतच आनंदोत्सव साजरा करण्याचा चांगला पर्याय काम तरुण वर्गाने शोधलेला आहे.