महिलांच्या प्रती केवळ मुस्लीमच नाही सर्वच धर्म, संप्रदायांमध्ये करण्यात येत असलेला भेदभाव नष्ट झाला पाहिजे, यासाठी महिलांना समान वर्तणूक मिळाली पाहिजे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
मुंबई – इस्लाम धर्मात कुठेही महिलांना विषमतेची वागणूक देणारी शिकवण नसताना धर्माची मक्तेदारी घेतलेल्या काही मुल्ला आणि मौलवींनी स्त्रियांना असमानतेची वागणूक देत अनेक ठिकाणच्या धर्मस्थळात प्रवेश नाकारला असून त्याविरोधात आम्हाला आमचा हक्क द्यावा, या मागणीसाठी बुधवारी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुस्लीम महिलांनी मुल्ला-मौलवींविरोधातच हल्लाबोल करत आझाद मैदानात जोरदार निदर्शने केली.
‘बंधन तोडो हक्क मांगो’ या नावाखाली हे आंदोलन करण्यात आले. यात संघटनेच्या महिला प्रतिनिधी आणि ज्येष्ठ विचारवंत सुधींद्र कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई, पूजा बेडेकर यांच्यासह, पत्रकार, विचारवंतांनीही सहभाग घेतला होता.
महिलांच्या प्रती केवळ मुस्लीमच नाही सर्वच धर्म, संप्रदायांमध्ये करण्यात येत असलेला भेदभाव नष्ट झाला पाहिजे, यासाठी महिलांना समान वर्तणूक मिळाली पाहिजे, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. तर ‘महिलांना धर्मस्थळांवर जाण्यापासून रोखणा-या पुरुषी धर्माधतेचा निषेध असो’, ‘इस्लाम का मजाक उडाना बंद करो’, ‘हाजीअली दरगाह, शनिमंदिर, जाना हमारा बुनियादी हक्क है’, ‘कठपुतली नही बनेंगे, धर्म के नाम पर नही लडेंगे, हिंदू हो या मुसलमान सब महिला एक समान’ अशा घोषणा लिहिलेले फलक महिलांकडून झळकवण्यात येत होते. या वेळी कुळकर्णी यांनी जगभरात स्त्री-पुरुष समानतेचे विचार मोठय़ा प्रमाणात रुजलेले असताना आपल्याकडे धार्मिक स्थळांमध्ये महिलांप्रती होणारा भेदभाव कायमस्वरूपी नष्ट झाला पाहिजे, अशी मागणी केली.