काही घराणी विलक्षण असतात. त्या कुटुंबाचा जिव्हाळा, कुटुंबाचे ऐक्य आणि कीर्ती सगळेच काही विलक्षण असते. अशा या घराण्यांच्या यादीत पृथ्वीराज कपूर यांचे घराणे एक विलक्षण घराणे आहे. ते स्वत: एक उच्च दर्जाचे अभिनेते होते.
त्यांच्या नावाची ‘पृथ्वी थिएटर’ ही संस्था. त्यांचे कर्तृत्वसंपन्न सुपुत्र, निर्माते, दिग्दर्शक, कथाकार, संगीतकार, अभिनेते राज कपूर. त्यांचे दुसरे सुपुत्र शमी कपूर, तिसरे सुपुत्र शशी कपूर. त्यानंतर तिस-या पिढीतले रणधीर कपूर, ऋषी कपूर असे एकाच घराण्यातले तीन पिढय़ांतले सारे कलावंत अभिनेते. राज कपूरची तर कोणाशीच तुलना करता येणार नाही. असा अवलिया होणे नाही. त्याचा ‘मेरा नाम जोकर’ पाडला गेला. त्या काळी करोडो रुपयांच्या तोटय़ात गेलेला राज कपूर ‘बॉबी’ चित्रपटानंतर पुन्हा आयुष्यात उभा राहिला.?त्याचा ‘आवारा’, त्याचा ‘जागते रहो’, ‘बुटपॉलिश’, ‘श्री ४२०’, ‘मेरा नाम जोकर’, ‘संगम’, ‘बॉबी’, ‘जिस देश में गंगा बहती है’, असे एकसे एक, आशयप्रधान चित्रपट होते. केवळ भारतीय प्रेक्षकांना नव्हे तर, परदेशातल्या प्रेक्षकांनाही राज कपूरने वेड लावले आणि ते वेड अजूनही टिकून आहे. अजूनही मॉस्कोच्या एकाच ठिकाणी असलेल्या तीन चित्रपटगृहात एकाच वेळी ‘जागते रहो’, ‘बुटपॉलिश’ आणि ‘श्री ४२०’ हे चित्रपट लागतात आणि त्याला गर्दी होते. भारतीय चित्रपटसृष्टीत राज कपूरचे स्थान हे अव्वलच आहे. अभिनयाचा हा वारसा त्याने पिताश्री पृथ्वीराज कपूर यांच्याकडून घेतला. पृथ्वीराज कपूर यांनी ‘मुघल-ए-आझम’मध्ये उभा केलेला अकबर बादशाह हा जणू खराखुरा अकबर वाटतो. खरा अकबर आपण कोणी पाहिलेला नाही. पण तो असाच असेल, असे पृथ्वीराज कपूर यांचा अभिनय पाहून सतत वाटत राहतो. त्याच कपूर घरण्यातील शमी कपूर हे काहीसे भिन्न प्रकृतीचे कलावंत. त्यांनी वेगळी वाट धरली. राज कपूर किंवा शशी कपूर यांच्यापेक्षा एक वेगळा भन्नाट अभिनय त्यांनी जन्माला घातला. त्यामुळेच त्यांचा ‘जंगली’ गाजला, ‘याहू’ गाजले. त्याचा ‘राजकुमार’ गाजला. ‘लव इन पॅरीस’ आणि ‘कश्मीर की कली’ हाही गाजला. ‘जानवर’ आजही गर्दी खेचतो आणि जुन्या प्रेक्षकांना एका वेगळय़ा अभिनयाचा असलेला ‘उजाला’ आजही मनाला भिडतो.
शमी कपूरच्या पाठीवरचा भाऊ शशी कपूर. राज कपूरची विविधता, शमीची विलक्षणता शशीमध्ये नाही. पण कपूर घराण्याची अभिनयाची संपदा त्यांच्याकडे पुरेपूर आहे. त्यामुळेच ‘कभी कभी’ पासून ‘दिवार’पर्यंत ११६ चित्रपटांनी त्यांना नावलौकिक मिळवून गेले. काहीसा अवखळ, काहीसा उत्साही आणि अगदी अलीकडच्या काळापर्यंत ‘शारीरिकदृष्टय़ा फिट’ असलेला शशी कपूर आता व्हिलचेअरवर आहे. त्याचा एक काळ होता आणि तो त्याने विलक्षण अभिनयाने गाजवलेला आहे. ‘दिवार’मुळे तर तो कीर्तीमान झाला. अमिताभसमोर उभे राहणे, ही सोपी गोष्ट नव्हती. अमिताभ ‘जंजीर’मुळे शिखरावर गेला होता. अमिताभच्या आक्रमक स्वभावाला शोभेल, अशी नेमकी भूमिका त्याला ‘दिवार’मध्ये मिळाली. ‘दिवार’ हे अनेक हिंदी कथांमधले तुकडे जोडून केलेले मिश्रण आहे. अमिताभने ते मिश्रण भासू दिले नाही.?त्या अमिताभसमोर आणि?त्याच्या प्रश्नांवर ‘मेरे पास बँक बॅलंस है, बंगला है, गाडी है, तुम्हारे पास क्या है?’ या भेदक प्रश्नावर शशी कपूरने गंभीर स्वरात दिलेले उत्तर ‘मेरे पास माँ है..’ त्या क्षणाला मन गदगद हलून जाते. मातेची महत्ता, थोरवी कोणत्याही संपत्तीशी तुलना करून मोजता येणार नाही. आईपुढे सारे जग फिके आहे. गाडी, बंगला, घोडे आणि बँक बॅलंस हे सगळे आईपुढे तुच्छ आहे. एका वाक्यात शशी कपूरने ज्या पद्धतीने व्यक्त केले आहे, त्याला तोड नव्हती. त्याच चित्रपटातील ‘मेरे पास डिग्री है, लेकीन शिफारीश नही..’ हे त्याचे वाक्यही आजच्या समाजजीवनातले जळजळीत सत्य सांगणारे आहे. अशा या शशी कपूरला त्यांच्या पिताश्रींप्रमाणेच आणि राज कपूरप्रमाणेच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला. हा त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान आहे. एका घराण्यात तीन व्यक्तींना हा सन्मान अजून कुठेही मिळालेला नाही.
कपूर घराण्याप्रमाणेच मंगेशकर घराणेही विलक्षण. एकाच घराण्यातल्या तीन पिढय़ा तानपु-याच्या सुरांमध्ये वाढल्या. ही गोष्टही अतिशय विलक्षणच. पंडित दीनानाथ मंगेशकर, त्यांच्या सुकन्या लतादिदी, मग आशाताई, मग उषा आणि मीना आणि बंधु हृदयनाथ. हृदयनाथांची सुकन्या राधा, या तिस-या पिढीपर्यंत ही गायकी आली. कपूर घराण्याचा अभिनय जसा तिस-या पिढीपर्यंत पोहोचला त्याचप्रमाणे मंगेशकर घराण्याची गायकी तिस-या पिढीने उन्नत केलेली आहे. लतादिदी आणि आशा या तर विलक्षणच आहेत. आशाताईंची विविधता इतकी प्रचंड आहे की, अशी गायिका जन्माला येणे नाही. या सगळय़ामध्ये एक तपश्चर्या असावी लागते. एक रियाझ असावा लागतो आणि संगीताची आराधना असावी लागते. अभिनय असेल किंवा संगीत असेल, या कलादालनात ज्यांना आपला संचार प्रभावीपणे करायचा आहे, त्याला तपश्चर्येची जोड असायलाच हवी. चित्रपट पाहताना किंवा गाणे ऐकताना, त्यामागची मेहनत किंवा श्रम याची सामान्य माणसाला कल्पना येत नाही; पण अविश्रांत मेहनतीची ही कामे आहेत. ‘मुघल-ए-आझम’मध्ये एकेका शॉटसाठी आठ आठ तास शुटिंग चालले होते. ज्यांची गायकी समृद्ध आहे ते तानपुरा हातात घेऊन तासनतास रियाज करत असतात. या घराण्यांचा लौकिकाचा सुगंध त्यामुळेच आसमंतात पसरतो. अशी ही घराणी भारतीय जनमानसाच्या मनात कायमचे आदराचे स्थान घेऊन जागा निर्माण करतात. अभिनय पाहून जीवनातील दु:ख विसरून जाणारी जशी लाखो माणसे आहेत, तशी संगीताच्या सुरांनी व्यक्तिगत जीवनातील दु:ख गळून पडलेली माणसे आहेत. म्हणून अशा घराण्यांनी भारतीय जीवन आणि भारतीय संस्कृती समृद्ध केलेली आहे.
राजकारणातल्या समृद्ध घराण्यांची चर्चा करायची तर पंडित मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी अशी फार मोठी परंपरा आहे. नेहरू घराण्याचे टीकाकार खूप आहेत. पण या देशासाठी नेहरू घराण्याचा त्यागही फार मोठा आहे. अलाहाबादचे कोटय़वधी रुपयांचे ‘आनंदभवन’ किंवा दिल्लीचे ‘त्रिमूर्ती भवन’ देशाला देऊन टाकणारी ही घराणी आहेत. गडगंज श्रीमंती असताना जाडाभरडा खादीचा सदरा अंगावर चढवून पंडितजी स्वातंत्र्य संग्रामात उतरले आणि इंदिराजीही त्या काळात वानरसेनेचे नेतृत्व करू लागल्या. ज्या देशात टाचणी होत नव्हती, त्या देशात पोलादाची भट्टी पेटली आणि भाक्रा नानगलसारखे प्रचंड धरण उभे राहिले. या देशाला दिशा देण्याचे काम नेहरू-गांधी घराण्यांनीच केलेले आहे. आज दिल्लीत गांधी घराण्याच्या नावावर स्वत:चे एक घर नाही. या घराण्याचा त्याग एवढा मोठा आहे की, आई आणि तिचा सुपुत्र देशाच्या ऐक्याच्या विरोधातील शक्तींनी मारले.? या बलिदानालाही तोड नाही. अशा या समृद्ध घराण्याचा इतिहास देशाचा इतिहास होतो आणि उद्याच्या पिढीला हा इतिहास सुयोग्य रस्ता दाखवू शकतो.
[EPSB]
काँग्रेस – संस्कृती!
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नारायण राणे मंगळवारी जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, तेव्हा वांद्रे पूर्वच्या महामार्गावरील चहुबाजूला काँग्रेसचे झेंडे फडकताना दिसले. दहा महिन्यांनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांना ज्यामुळे बळ येईल, अशी ही मंगळवारी दुपारची वांद्रे येथील हवा होती.
[/EPSB]