‘‘केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सुडाचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी आपण अनेक सरकारं पाहिली परंतु त्यांनी कधी सत्तेचा गैरवापर विरोधकांना संपविण्यासाठी केला नाही.
मुंबई – ‘‘केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून सुडाचे राजकारण सुरू आहे. यापूर्वी आपण अनेक सरकारं पाहिली परंतु त्यांनी कधी सत्तेचा गैरवापर विरोधकांना संपविण्यासाठी केला नाही. हे सरकार ते करीत आहे,’’ असा घणाघाती हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारवर केला. यापूर्वी महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाचे युतीचे सरकार होते. तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि नारायण राणे होते. मात्र ते कधी असे आकसाने वागले नाहीत, असेही पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अंमलबजावणी संचालनालयाच्या वतीने सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर तोफ डागली. समीर भुजबळ यांना झालेली अटक आणि छगन भुजबळ यांच्या मालमत्तांवर टाकले जाणारे छापे याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करताना पवार म्हणाले की, महाराष्ट्र सदनच्या बांधकामासंदर्भात जे निर्णय घेण्यात आले ते फक्त एकटय़ा छगन भुजबळ यांनी घेतलेले नाहीत. तर तो संपूर्ण मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय आहे.
मग त्यात एकटय़ा भुजबळांचीच चौकशी का केली जात आहे? छगन भुजबळ यांच्याविरोधात ज्या काही तक्रारी आहेत, त्याची चौकशी होण्यात हरकत नाही. मात्र त्यांच्या विरोधात तक्रार करणारी व्यक्ती ही भाजपाचा खासदार आहे. त्यांच्या इशा-यावरूनच तपास यंत्रणा इतक्या तत्परतेने कारवाई करीत आहे. हे सुडाचे राजकारण आहे, असा टोला त्यांनी भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांचे नाव न घेता लगावला. ते पुढे म्हणाले की, भुजबळ कुटुंबाला जाणूनबुजून टार्गेट केले जात आहे. एकाच प्रकरणात तीन-तीन छापे टाकले जात आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेच्या हेतूबद्दल शंका घेण्यास बराच वाव आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक सरकारे आली. काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचे सरकार राज्यात होते. त्यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालील युतीचे सरकार होते. मनोहर जोशी, त्यानंतर नारायण राणे मुख्यमंत्री झाले. मात्र त्यांनी कधीही विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात अशी आकसाने कारवाई केली नाही, असा टोला पवार यांनी लगावला.
हे तर षडयंत्र – समीर भुजबळ
मला झालेली अटक ही भुजबळ कुटुंबीयांच्या विरोधात रचण्यात आलेले षडयंत्र आहे. मला अटक होणार हे भाजपाचे खासदार किरीट सोमय्या हे अगोदरच कसे छातीठोकपणे सांगू शकतात. याचा अर्थ पुरावे असो अगर नसो, कारवाई करायची हे त्यांचे ठरलेले होते. मी चौकशीला पूर्ण सहकार्य करीत असून सर्व पुरावे अंमलबजावणी संचालनालयाला दिले आहेत. ते मला निर्दोष सिद्ध करण्यास पुरेसे आहेत, अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी वैद्यकीय तपासणीनंतर न्यायालयात हजर करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांकडे व्यक्त केली.
जबाबावर जबरदस्तीने सह्या- छगन भुजबळ
महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात माझा, पंकजचा किंवा समीरचा कोणताही संबंध नाही. या प्रकरणात विकासकाला पैसे सरकारने दिलेले नाहीत अथवा जमीनही दिलेली नाही. जो काही व्यवहार झाला आहे तो मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या संमतीने झालेला आहे. मात्र या प्रकरणात आम्हाला जबरदस्तीने गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी हवा तो जबाब लिहितात आणि त्याच्यावर आमच्या जवळच्या नातेवाइकांच्या जबरदस्तीने सह्या घेतात, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला आहे.
[EPSB]
समीर भुजबळ यांना अटक
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी अटक केली. [/EPSB]