कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरांमध्ये मुंबईत घरे बांधली गेली पाहिजेत, या मागणीसाठी गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने घर हक्क आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
मुंबई – कामगार, नोकरदार आणि सर्वसामान्यांना परवडतील, अशा दरांमध्ये मुंबईत घरे बांधली गेली पाहिजेत, या मागणीसाठी गिरणी कामगार संघर्ष समितीच्या वतीने घर हक्क आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र आणि कामगार दिनानिमित्ताने गुरुवारी दादरमध्ये सुरेंद्र गावस्कर सभागृहात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सर्वसामान्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कामगार नेते आणि गिरणी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दत्ता इस्वलकर यांनी केले आहे.
औद्योगिक नगरी म्हणून मुंबईची ओळख आता इतिहासजमा झाली असून आता सेवा क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देणारी नगरी अशी मुंबईची ओळख बनली आहे. मुंबईत कोणतीही छोटीमोठी नोकरी मिळू शकते. मात्र, राहायला घर मात्र मिळत नाही. सर्वसामान्यांपासून उच्च मध्यमवर्गीयांनाही आता मुंबईत घरे घेणे शक्य होत नाही, असे सांगत इस्वलकर यांनी या आंदोलनामागील भूमिका स्पष्ट केली.
मुंबईत सर्व आर्थिक स्तरातील वर्गाना घरे घेता यावीत, यासाठी दीपक पारेख यांनी दिलेल्या अहवालातील शिफारशींनुसार सर्वसामान्यांसाठी घरे बांधण्यात यावीत, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सध्या टॉवरचेच बांधकाम सुरू असून त्यामुळे मुंबईतील सर्वसामान्य मुंबईतून हद्दपार होईल आणि मुंबई फक्त श्रीमंतांसाठीच उरेल.
चाळ आणि टॉवरमध्ये मोठी दरी निर्माण झाली असून त्याने मुंबईत पेचप्रसंग निर्माण होईल, अशी भीतीही इस्वलकर यांनी व्यक्त केली. मुंबईत सेवा क्षेत्रात काम करणा-या कामगारांची संख्या ही ६० टक्के इतकी मोठी आहे.
ही माणसे जाणार कुठे, असा प्रश्न करून त्यांच्या निवा-याची व्यवस्था मुंबईतच केली जावी. सरकारने गिरणी कामगारांना टप्प्याटप्प्याने घरे देणे सुरू केले आहे. त्यांच्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका सकारात्मक असून त्याच धर्तीवर सर्वसामान्यांच्या हिताचाही सरकार योग्य तो विचार करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.