पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिस-या दिवशीही विरोधकांचा गदारोळ सुरु राहिल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
नवी दिल्ली – पावसाळी अधिवेशनाच्या सलग तिस-या दिवशीही विरोधकांचा गदारोळ सुरु राहिल्याने लोकसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्षांनी परराष्ट्रव्यवहार मंत्री सुषमा स्वराज, ललित मोदी प्रकरण, व्यापम प्रकरणांवरुन लोकसभेत गोंधळ घातल्याने लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.
दोन दिवस कामकाजाविना संपल्यानतंर तिस-या दिवशी अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर लगेचच काँग्रेससह इतर पक्षांनी संसदेत जोरदार घोषणाबाजी केली. घोषणा फलक दाखवत, काळ्या फिती लावून त्यांनी सरकारविरोधात निषेधही प्रकट केला.
त्यामुळे प्रश्नोत्तराचा संपूर्ण तास या गदारोळात वाहून गेला. त्यामुळे दुपारपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ सुरुच राहिला. राजीनाम्यांच्या मागणीने विरोधकांची सभागृह दणाणून सोडले.
राजीनामा नाही तोपर्यंत चर्चा नाही ही भूमिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि आप, झारखंड मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी घेतली होती.