उपरी वा-याचा भडिमार आणि त्यात केंड माशांचा उपद्रव यामुळे मागील काही दिवसांपासून राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार संकटात आले आहेत.
नाटे – उपरी वा-याचा भडिमार आणि त्यात केंड माशांचा उपद्रव यामुळे मागील काही दिवसांपासून राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार संकटात आले आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमुळे मासे मिळणे कठीण झाले असून, माशांची दुष्काळी परिस्थिती उद्भवल्याने माशांचे दर गगनाला भिडले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून साखरीनाटे बंदर आणि समुद्र पसिरात उपरी वा-याची लाट आली आहे. या वा-यामुळे मासेमारी नौका समुद्रात नेणे कठीण होत आहे. त्यामुळे अनेक नौका किना-यावरच विसावल्या आहेत. त्यामुळे अनेक खलाशांना काम नसल्याने त्याचा भरुदड मच्छीमारांना सहन करावा लागत आहे. याशिवाय मागील काही दिवसांपासून समुद्रात केंड माशांचा मोठा उपद्रव होऊ लागला आहे.
सध्या तारली आणि म्हाकूळ जातीची मासळी समुद्रात मिळू लागली आहे. परंतु, ही मासळी फस्त करण्यासाठी केंड माशांच्या झुंडीच्या झुंडी समुद्रात वावर करू लागल्या आहेत. ही केंड माशांची धाड तारळी आणि म्हाकूळ फस्त करत असल्याने मच्छीमारांना मासे मिळेनासे झाले आहेत. तर केंड मासे पर्सनेट जाळी कुरतडत असल्याने तोही फटका मच्छीमारांना बसत आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सध्या मच्छीमार सापडले आहेत.
माशांच्या दरात वाढ झाल्याने मासेखवय्यांच्या चिकनवर उडय़ा पडू लागल्या आहेत. त्यामुळे चिकनचे दर भडकले असून, सध्या प्रतिकिलो १३० रुपये दराने चिकन विकले जात आहे.
मागील काही महिन्यांपासून मच्छीमार विविध संकटात सापडले असून, मासे दुष्काळामुळे उपासमारीची वेळ आल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. सरकारने या परिस्थितीचा विचार करून मच्छीमारांना आर्थिक साहाय्य द्यावे, अशी मागणी साखरीनाटे मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष वजूद बेबजी, मजिद सायेकर, माजी सरपंच शहादत हबीब आदींनी केली आहे.