केंद्र सरकारने वाढवलेले आयातशुल्क अत्यंत कमी असून ते किमान २५ टक्के असायला हवे, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे.
लातूर- केंद्र सरकारने वाढवलेले आयातशुल्क अत्यंत कमी असून ते किमान २५ टक्के असायला हवे, अशी मागणी साखर उद्योगाने केली आहे. देशात साखरेचे मुबलक प्रमाणात उत्पादन झाले असून साखरेचा मोठा साठा शिल्लक आहे. बाजारात साखरेला भाव नसल्याने हा उद्योग अडचणीत आहे. अशा परिस्थितीत साखर आयात केली जात असल्याने स्थानिक साखरेला उठाव नाही, त्यामुळे साखर उद्योग संकटात आहे.
राज्यात साठ लाख टन साखर होईल असा अंदाज होता. पण ७९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. देशात २४५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून मोठय़ा प्रमाणात साखर शिल्लक आहे. ऑक्टोबरमध्ये साखरेचे दर वाढल्यानंतर शेतकरी संघटनेने आंदोलन केल्याने उसाला २००० ते २५०० भाव द्यावा लागला. नंतर साखरेचे भाव कोसळले. यामुळे कारखान्याचे मोठे नुकसान झाले. सरकारने किमान ४० टक्के आयात शुल्क वाढवणे गरजेचे होते, अशी माहिती नॅचरल शुगरचे बी.बी. ठोंबरे यांनी दिली.
आयात शुल्क किरकोळ वाढवल्याने उद्योगाला फार मोठा फायदा होणार नाही. भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन आगामी काळात सरकार ही वाढ करू शकते. सरकारने विचार करूनच ही वाढ केली असावी. याचा काही प्रमाणात फायदा होईलच. साखरेच्या भावात घसरण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, अशी माहिती विकास सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ. अमित देशमुख यांनी सांगितले.
उसाला चांगला भाव देणारे साखर कारखाने अडचणीत आहेत. लातूरसारख्या जिलत आम्ही ऊसाला दोन हजार २५० रूपये भाव दिला. ज्यावेळेस साखर 32०० रूपये िक्वटल होती. आज साखरेचे भाव कमी झाले आहेत. भावातील हा फरक कसा भरून काढायचा हा प्रश्न आहे. त्यामुळे साखर कारखानदारी अडचणीत आहे. यात साखर शिल्लक असताना साखरेची आयात झाली तर साखर उद्योगावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे किमान २५ टक्के आयात शुल्क वाढल्यास स्थानिक साखरेला मागणी येणार आहे. केंद्र सरकारने याचा विचार करायला हवा, असे मत सिद्धी शुगरचे अध्यक्ष आ. बाबासाहेब पाटील मत नोंदवताना म्हणाले,
केंद्राने साखरेवरील आयात शुल्क केवळ पाच टक्के वाढवून साखर उद्योगाचे डोळे पुसण्याचे काम केले आहे. हे शुल्क तीस टक्के वाढवावे अशी साखर संघाची मागणी होती. पण त्याकडे दुर्लक्ष केले. शेतक-यांच्या ऊसाला वाढीव भाव, वाढता उत्पादन खर्च, गेटकेनच्या ऊसामुळे वाहतुक खर्चात वाढ होत आहे, असे माांजरा साखर कारखान्याचे चेअरमन धनंजय देशमुख म्हणाले.
शेतक-यांच्या ऊसाला अडीच हजार रूपयापर्यंत भाव दिला जात आहे. साखरेचे दर २८०० रूपये आहेत. मोठय़ा प्रमाणात साखर शिल्लक आहे. अशा परिस्थितीत साखर आयात होत असल्याने स्थानिक साखरेला उठाव नाही. साखर कारखाने अडचणीत आहेत. शॉर्टमार्जिनमध्ये कारखाने सुरू आहेत. चाळीस टक्क्यांपर्यंत आयात शुल्क वाढायला हवे होते,असे रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशवंत पाटील सांगितले.