रोजच्या धकाधकीच्या, धावपळीच्या जीवनात कधी ना कधी आपल्याला पुरुषांच्या घाणेरडय़ा मनोवृत्तीचा सामना हा करावा लागतोच. मात्र त्यातून येणा-या अनुभवांना घाबरून न जाता जर त्याला धाडसाने तोंड दिले तर नक्कीच प्रत्येक मुलीच्या महिलेच्या आत्मविश्वासात भरच पडेल. त्या अशा अनुभवांनी खचणार तर नाहीच, शिवाय पुन्हा अशा घटना घडल्या तर त्याला तोंड देण्याचे धैर्य त्यांच्यात येईल. त्यासाठी साथ द्यायला हवी, प्रत्येकीने प्रत्येकीला.
नाशिकहून कसा-याला पोहोचलेल्या शामलने घाईघाईने लोकल पकडली. समोर जो डबा दिसला त्यात चढून घेतलं. तो नेमका पुरुषांचा डबा होता. लोकल जणू शामलसाठीच थांबली होती, ती चढली आणि गाडी सुरू झाली. त्यामुळे उतरून स्त्रियांच्या डब्यात जाणे शक्य नव्हते. गर्दी असूनही तिला बसायला जागाही मिळाली. शामल तिस-या जागेवर बसली होती. तिच्या शेजारच्या बेंचवर चार जण बसले होते. त्यात सर्वात कडेचे मध्यमवयीन गृहस्थ शामलच्या दिशेने तोंड करून बसले होते. गाडी सुरू होताच त्यांची झोप सुरू झाली. झोपले होते की सोंग घेतले होते ते काही समजत नव्हते कारण थोडय़ा थोडय़ा वेळाने त्यांचा तोल जाऊन ते शामलच्या दिशेने पडू लागले. तीन-चार वेळा शामलनेच त्यांना जागे करून व्यवस्थित बसण्याची कल्पनाही दिली, मात्र झोपेचे सोंग घेतलेल्यांना जागे कसे करणार? शेवटी शामलसमोर बसलेल्या आजीबाईंना त्या गृहस्थाचा इरादा लक्षात आला. बरेच पावसाळे बघितलेल्या आजीबाई हुशार होत्या, त्यांनी दोन बेंचमध्ये त्यांच्या समोर उभ्या असलेल्या एका मुलाला शामल आणि त्या गृहस्थाच्या मध्ये उभे केले. त्यानंतर मात्र तो झोपेत पडला नाही.
जैती नेहमी वरळीहून महालक्ष्मीला जाण्यासाठी बस पकडायची. तिथे कॉलेजच्या सात ८ ते ९ मुलांचा एक घोळका असायचा. सर्वाची बस ठरलेली असायची. काही दिवसांपासून जैतीला त्या मुलांच्या वागण्याचा त्रास होत होता. बस आली की त्या मुलांपैकी दोघे जण दाराच्या दोन्ही बाजूला उभे राहायचे. इतर प्रवासी असतील तर त्यांना प्रथम चढण्याची संधी ते देत. जैतीला मात्र जाणीवपूर्वक चढू दिले जायचे नाही, आणि जैती चढायला लागली की, हे सगळे टोळके एकदम तिला घेरून बसमध्ये चढण्याची घाई करायचे. त्यात जैतीला धक्काबुक्की केली जायची. चढण्याच्या घाईत ती काहीच करू शकत नसे. जैतीला लक्षात आल्यानंतर तिने आठवडाभर हा त्रास सहन केला. शेवटी ती त्या बसस्टॉपवरून जाणारी एकटीच मुलगी असल्याने तिने लवकर निघून दुस-या बसस्टॉपवरून बस पकडणे सुरू केले.
मिताली आणि तिच्या सहा सात मैत्रिणी नेहमी सकाळी १०.३० वाजता परळला उतरायच्या. तेथे बाहेर पडण्यासाठी एकच पूल असल्याने कार्यालयीन वेळांत नेहमीच गर्दी असायची. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात एक कुजबूज सुरू होती. पूल चढताना शेवटी जी राहायची ती कावलेली असायची. सहा सात दिवस झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की सगळ्यांना एकाच त्रासाला सामोरं जावं लागतं होतं. एक मुलगा जिना चढताना मुद्दाम त्यांच्या पायांना धक्के मारायचा. खूप गर्दी असल्याने ब-याचदा मागे वळून बघता अथवा बोलता यायचं नाही. हाच अनुभव सर्वाना आल्यावर त्यांच्या लक्षात आलं की त्रास देणारा मुलगा एकच होता. झालं त्या सर्वानी एक योजना आखली. दुस-या दिवशीही त्या नेहमीप्रमाणे घाईघाईने जिना चढायला लागल्या. मिताली आणि तिची मैत्रीण स्नेहा जोडीने जात होत्या. पुढे सातजणी होत्या. त्याने नेहमीप्रमाणे धक्के मारायला सुरुवात करताच मिताली फक्त मुलींनो म्हणत गर्रकन मागे वळली. तो मुलगा धक्का मारण्याच्या तयारीत होता. त्याला ही कृती अनपेक्षित होती. मितालीने फाटकन त्याच्या पायावर मारलं तसा तो गडबडला आणि पळू लागला. मात्र वरती सगळ्याजणींनी घेरत त्याला चांगलचं बदडलं.
दिवा स्टेशनहून डोंबिवलीला शाळेत येणारी नववीतील ज्योती सध्या रोज आईलाच बरोबर न्यायला लागली आहे. त्याचं झालं असं की ज्योती आणि तिच्या शेजारची लहान मुलं शाळेत जायला एकत्र निघायची. त्यांच्या डब्यात नेहमी एक फेरीवाला मुलगा चढायचा. कदाचित तो मुंब्रापासून येत असावा. तोही डोंबिवलीलाच उतरायचा. सकाळची वेळ असायची. डाउन मार्गाकडे जाणा-या गाडयांना गर्दी कमीच असते. त्यावेळी तो मुलगा इकडे तिकडे जाण्याच्या बहाण्याने ज्योतीला धक्का मारून जायचा. एक दोनदा दुर्लक्ष केल्यावर ज्योतीने त्याला फटकारले. त्यावर त्याने इतका तमाशा केला की बिचा-या ज्योतीचीच चूक असल्यासारखी तिची अवस्था झाली. शेवटी तिला गाडी चुकवून चालणार नव्हते. तिनेसोबत आईला नेण्यास सुरुवात केली. तिच्या आईने लांब राहून हा सर्व प्रकार पाहिला आणि चंडिकेचा अवतार धारण केला. मग काय त्या मुलाची हिंमत झाली नाही पुन्हा त्या डब्यात पाऊल टाकण्याची.
खरं तर कमी अधिक प्रमाणात हेच अनुभव सगळ्यांनाच येत असतातच. मात्र प्रत्येकीने त्यातून आपापल्या परीने उपाय शोधलेले असतात. हे सगळे अनुभव अगदी लहान वयात आले की मुली जणू फुलण्यापूर्वीच मिटून जातात. तर महिलांना मग प्रत्येक वेळेला सोबतीला कोणी ना कोणी हवे असते. आपण एकटीने बाहेर पडून काम करू शकतो हा आत्मविश्वासच त्या गमावून बसतात. मिताली, शामलला भेटलेल्या आजी यांच्यासारख्या युक्तींचा वापर करून या घटनांना सामोरे गेले तर समोरचाही पुन्हा वाटेला जाण्याची हिंमत करत नाही. ज्योतीच्या आईने दाखवलेलं धाडसही महत्त्वाचे ठरते. नाही तर अनेकदा अनेक मुलींचे पालक अशा घटनांमध्ये घाबरून मुलींनाच गप्प करतात, किंवा त्यांच्याच वावरण्यावर बंधनं आणतात. असं न करता मुलींच्या मागे आत्मविश्वासाने आणि ठामपणे उभे राहिले तर प्रत्येक प्रसंगाला तेवढय़ाच ताकदीने सामोरे जाण्याचे बळ मुलींना, महिलांना येईल.
अनेकदा अशा घटना घडतात तेव्हा इतर महिला, मुली बघ्याची भूमिका घेतात. मला काय त्याचे किंवा मी नाही त्यातली असं काहीसं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसं जर केलं नाही तर महिला एकजुटीसमोर प्रत्येकाला झुकावेच लागेल आणि महिलांकडे, मुलींकडे त्रास देण्याच्या नजरेनं बघणा-यांच्या नजरेत भीती दिसेल. यासाठी तरी साथ द्यायला हवी, प्रत्येकीने प्रत्येकीला.