सिंगापूरमधील सर्वात भीषण हिंसाचारप्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून ५२ भारतीयांना सिंगापूर सरकारने मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंगापूर – सिंगापूरमध्ये गेल्या ४० वर्षातील सर्वात भीषण हिंसाचारप्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपावरून ५२ भारतीयांना सिंगापूर सरकारने मायदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
आठ डिसेंबरला सिंगापूरमध्ये दंगल झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने १६ जणांची चौकशी केली.
आठ डिसेंबरला सिंगापूरमधे एका भारतीय कामगाराचा रात्री अपघातात मृत्यू झाला आणि दंग्यांना सुरुवात झाली. पदपथावरून जाणा-या शक्तिवेल कुरुवेलू याला एका खासगी बसने चिरडल्यावर लिटल इंडिया या भारतीय वंशाच्या नागरिकांचे प्राबल्य असलेल्या भागातील लोक रस्त्यावर उतरले होते.
या हिंसाचारात गृह विभागाचे ३९ कर्मचारी तर २५ पोलिस जखमी झाले होते. तसेच पोलिसांच्या गाड्यांचेही नुकसान करण्यात आले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली भारतीयांना मायदेशात पाठविण्यात येणार आहे.
तसेच या प्रकरणी २०० द.आशियाई लोकांना पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. नियमांचे काटेकोर पालन करणा-यांनाच सिंगापूरमध्ये राहण्याची आणि काम करण्याची परवानगी मिळेल असे सिंगापूर सरकारने सांगितले.स्थलांतरित कामगार कायद्यानुसार दुस-या देशातील कामगार जर रोजगार पुरविणा-या देशाविरोधात काम करत असेल तर त्याला हद्दपार करण्याचे अधिकार सरकारला आहेत असे सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री के शानमुग्म यांनी सांगितले.